म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
व्यापार क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ होत असून त्यात आणखी वृद्धी होण्यासाठी सरकारने देशांतर्गत व्यापार धोरण सरकारने जाहीर करावे, अशी आग्रही अपेक्षा शहरातील व्यापाऱ्यांनी आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमिवर व्यक्त केली आहे. व्यापाऱ्यांना कमी व्याज दरात कर्ज द्यावे, 'जीएसटी'च्या दरात कपात करावी, आदी मागण्या व्यापारी करत आहेत.
\Bदेशांतर्गत व्यापारी धोरण हवे\B
सरकारने देशांतर्गत व्यापार धोरण तातडीने जाहीर करणे आवश्यक आहे. या धोरणासाठी अनेक वर्षांपासून व्यापारी पाठपुरावा करत आहेत. देशात सुमारे सात कोटी व्यापारी असून त्यावर सुमारे २५ कोटी जणांचा रोजगार अवलंबून आहे. देशातील सर्वसामान्य व्यापाऱ्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. व्यापारी जगला पाहिजे, व्यापार क्षेत्र वाढले पाहिजे, या क्षेत्राला संरक्षण देण्यासाठी कामगार, उद्योग आदी क्षेत्राप्रमाणे देशांतर्गत व्यापार धोरण आवश्यक आहे. रिटेल व्यापारात थेट परकीय गुंतवणुकीला (फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट: एफडीआय) परवानगी असता कामा नये. ई-कॉमर्स प्रमाणे कॉर्पोरेट सेक्टरला रिटेल व्यवसाय करण्याची परवानगी देऊ नये. त्यासाठी नियम तयार करावेत. तसेच कॉर्पोरेट सेक्टर व किरकोळ व्यापाऱ्यांना वस्तू खरेदी दर सारखाच असावा. कॉर्पोरेट सेक्टरमध्ये मोठी खरेदी करत असल्याने त्यांना दर कमी असू नये.
- अजय शहा, राज्य प्रतिनिधी, कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट)
\B'जीएसटी' दर कमी करावेत \B
'जीएसटी'मधील कराच्या दराची पातळी आणखी कमी करणे अपेक्षित आहे. पेट्रोल, डिझेल, मद्य या वस्तू 'जीएसटी'च्या कक्षेत आणाव्यात. 'जीएसटी'अंतर्गत असलेल्या ई-वे बिल नियमाचे उल्लंघन झाल्यास आकारण्यात येणारा दंड कमी करावा. ही प्रणाली नवीन असल्याने काही वर्षे तरी अशी सवलत आवश्यक आहे. देशांतर्गत व्यापार धोरण जाहीर करून त्यांची काटेकोर अंमलबजावणी करा, या मागणीसाठी अनेक वर्षांपासून आमचा पाठपुरावा सुरू आहे. देशात लाखो छोटे-मोठे व्यापारी, व्यावसायिक आहेत. व्यापार धोरण लागू झाल्यास व्यापाऱ्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करता येईल. व्यापार धोरण लागू करण्याकरिता सरकारने सर्वेक्षण करावे, त्यात व्यापारी प्रतिनिधींचा समावेश असावा.
-प्रफुल्ल मालाणी, अध्यक्ष मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्स
\Bकमी व्याजाने कर्ज मिळावे \B
रिटेल व्यापारासाठी राष्ट्रीय धोरण आखावे. बहुसंख्य व्यापाऱ्यांच्या विविध वित्तीय गरजांसाठी धावपळ करावी लागते. बँकांकडून कर्ज मिळतेच, असे नाही. त्यामुळे नातेवाइक आणि ओळखीपाळखीवर अवलंबून राहावे लागते. हातउसने घ्यावे लागतात. मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करणाऱ्या व्यापार क्षेत्रालाही बळकटी देण्यासाठी व्यापाऱ्यांना कमी अथवा विशेष व्याजदराने कर्ज देण्यात यावे. व्यापार वृद्धीसाठी पायाभूत सुविधांवर अधिक भर द्यावा. जीएसटी रिर्टन वर्षातून दोनदा भरण्याची तरतूद करावी. देशातील छोटा व्यापारी जगला पाहिजे, यासाठी अधिक प्रयत्न सरकाराने करावेत.
- जगन्नाथ काळे, अध्यक्ष जिल्हा व्यापारी महासंघ
\Bव्यवसाय कर रद्द करा \B
वस्तू व सेवा करामुळे 'वन नेशन, वन टॅक्स' ही संकल्पना प्रत्यक्षात उतरेल, असे सांगण्यात आले. असे असतानाच पुन्हा व्यवसाय कर का घेतला जातो. व्यवसाय कर रद्द झाला पाहिजे.
-विजय जैस्वाल, उपाध्यक्ष, जिल्हा व्यापारी महासंघ