मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत मार्च २०१९ अखेरपर्यंत ५० हजार शेतकऱ्यांना वीजजोडणी देण्याचे महावितरणचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. या योजनेला राज्यातील शेतकऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. या योजनेसाठी महावितरणने पोर्टल सुरू केल्यानंतर केवळ १५ दिवसांत सौर पंपासाठी सुमारे २८ हजार २८५ अर्ज ऑनलाईन दाखल करण्यात आले. औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयातून सर्वाधिक १८ हजार २३५ प्राप्त झाले आहेत.
\Bराज्यात २८ हजारांवर अर्ज\B
शेतकऱ्यांना पारंपारिक वीजजोडणी मिळण्यात अडचणी येत असल्यामुळे अशा शेतकऱ्यांना प्राधान्याने सौर कृषिपंप देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महावितरणच्या पोर्टलवरून अर्ज केलेल्या २६ हजार शेतकऱ्यांपैकी दोन हजार शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे सर्वेक्षण करण्यात आले असून, दोन हजार २९३ शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. याशिवाय अर्ज भरताना काही त्रुटी असलेल्या ४१९ अर्ज सध्या नामंजूर करण्यात आले आहेत. या शेतकऱ्यांना अर्जातील माहिती दुरुस्त करून पुन्हा भरण्याची संधीही महावितरणाच्या पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना कृषिपंपांसाठी महावितरणने पोर्टल सुरू केले आहे. दोन फेब्रुवारीपर्यंत राज्यातील सुमारे २८ हजार शेतकऱ्यांनी सौर कृषिपंपासाठी अर्ज केले आहेत. विशेषत: मराठवाड्यातील शेतकऱ्यांकडून या योजनेला मोठा प्रतिसाद मिळत असून, गेल्या १५ दिवसांत १६ हजार ९६० शेतकऱ्यांनी आपले अर्ज या पोर्टलवरून भरले आहेत.
\Bमराठवाड्यातील अर्जदार
\Bऔरंगाबाद : ९४५
बीड : १०९३
हिंगोली : ५५२२
जालना : ६८२६
लातूर : ५५१
नांदेड : १५९४
उस्मानाबाद : ३७५
परभणी : १३२९
औरंगाबाद विभाग : १८,२३५
…
उर्वरित राज्यातून आलेले अर्ज
अमरावती विभाग : ३२९०
कोकण विभाग : २५२
……नागपूर विभाग : - २६४९
……नाशिक विभाग : २३२६
……पुणे विभाग : १५५४
\Bअर्जासोबत ही कागदपत्रे आवश्यक
\B- अनुसूचित जाती व जमातीच्या लाभार्थींसाठी जातीचे प्रमाणपत्र आवश्यक
- दुष्काळ प्रभावित क्षेत्र असल्यास संबंधित खात्याचा ना-हरकत दाखला आणि शेतजमीन, विहीर, पाण्याचा पंप सामाईक असल्यास इतर भागीदाराचे ना-हरकत प्रतिज्ञापत्र
- विहीर / बोअरवेल शेतात असल्यास ७/१२ उताऱ्यावर नोंद आवश्यक
- शेतकऱ्यांनीही ७/१२ उतारा, आधार कार्ड, आवश्यकता असल्यास जातीचे प्रमाणपत्र व इतर अनुषांगिक ना-हरकत प्रमाणपत्र महावितरणच्या संबंधित शाखा किंवा उपविभाग कार्यालयात सादर करून सौर कृषिपंपासाठी अर्ज करावा
\Bअसे अर्ज होणार बाद\B
शेतकऱ्यांनी ७/१२ वरील एकापेक्षा जास्त नावे असल्यास, त्यांनी भागवटदाराचे प्रमाणपत्र न घेता, अर्ज केल्यास अशी अर्ज बाद होणार आहे. शिवाय अनेक ठिकाणी एकाच घरातील तीन ते चार लोक अर्ज करत आहेत. या आणि अशा प्रकारच्या त्रूटी असलेले अर्ज महावितरणकडून पडताळणीत बाद केले जाणार आहेत.
\Bसौर कृषिपंपासाठी अंतराची अट\B
काही शेतकऱ्यांनी उच्चदाब वितरण प्रणालीत (एचव्हीडीएस) वीजजोडणीसाठी अर्ज केले आहेत, मात्र त्यांना वीजजोडणी देण्यासाठी ०.६ किलो मीटरपेक्षा अधिक वाहिनी टाकावी लागणार आहे. अशा शेतकऱ्यांची यादी महावितरणच्या उपविभाग कार्यालयांकडे उपलब्ध आहे. या शेतकऱ्यांनी तातडीने महावितरणशी संपर्क साधून सौर कृषिपंपासाठी अर्ज करावा.
शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य व्हावे, यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे, परंतु अपूर्ण व चुकीची कागदपत्रे जोडल्यामुळे अनेक अर्ज बाद झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य व पूर्ण कागदपत्रे जोडूनच सौर कृषिपंपासाठी अर्ज करावेत.
- सुरेश गणेशकर, मुख्य अभियंता महावितरण