म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद माहिती तंत्रज्ञानाच्या वापरातून सर्वसामान्यांच्या कामांचा तत्काळ निपटारा करणे व कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जवळपास सर्व विभागांमध्ये ई-ऑफिसच्या माध्यमातून कामकाज सुरू करण्यात आले आहे. येत्या आठ दिवसांमध्ये तालुका; तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे कामकाजही पूर्णपणे ई-ऑफिसच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. यामुळे आता ग्रामीण भागातील फायलींचा प्रवासही डिजिटल माध्यमातून वेगाने होणार आहे. संपूर्ण कामकाज ई-ऑफिसच्या माध्यमातून करण्यासाठी संबंधित कार्यालयांना स्कॅनर, प्रिंटरही देण्यात आले आहेत. महाराष्ट्र शासनाने सर्व सरकारी कार्यालयांना 'ई-ऑफिस' प्रणालीचा वापर करणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी उदय चौधरी पाऊल उचलत आहेत. सध्या जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व विभागांमध्ये ई-ऑफिसच्या माध्यमातून काम करणे सुरु झाले असल्यामुळे कार्यालयातील फायलींचा डिजिटल प्रवास सुरू झाला आहे. यामुळे सध्या प्रत्येक विभागप्रमुखांच्या टेबलावर आलेल्या एका फाइलचा निपटारा सरासरी पाच दिवसांत करण्यात येत आहे. प्रशासकीय कामकाजाचा वेग वाढावा म्हणून आता जिल्हाप्रशासनाने प्रत्येक तालुकास्तरावरील कामकाज ई-आफिसच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी येत्या आठ दिवसांमध्ये संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होणार आहे. तत्कालीन 'टेक्नोसेव्ही' जिल्हाधिकारी वीरेंद्र सिंह यांनी जिल्हाधिकारी कार्यालय ई-ऑफिस करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु या कामात कम्प्युटरची संख्या, जुने कम्प्युटर व कर्मचारी, अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण आदी आव्हाने निर्माण झाली होती. दरम्यानच्या काळात त्यांची बदली झाली होती, नवल किशोर राम यांच्यानंतर जिल्हाधिकारी म्हणून रुजू झालेले उदय चौधरी यांनी मात्र पेपरलेस ऑफिस करण्यासाठी टप्प्यप्प्यांने प्रवास सुरू केला असल्याचे चित्र आहे. \Bदोन दिवस प्रशिक्षण\B 'ई-ऑफिस' प्रणालीचा वापर कसा करावा यासंदर्भात तहसील, उपविभागीय अधिकारी कार्यालयातील लिपिकापासून नायब तहसीलदार, तहसीलदारांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सात व आठ फेब्रुवारी रोजी हे प्रशिक्षण होईल. यासाठी शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रशिक्षक येणार आहेत. या सर्व कर्मचाऱ्याचे ई-मेल आयडी, डीजीटल सही, स्कॅनर यांसह पूर्वतयारी अगोदर केली असून, प्रशिक्षणांनतर काही दिवसांत तहसीलमध्ये यावर काम सुरू होणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांनी दिली. \Bप्रत्येक तहसीलला पाच स्कॅनर \Bजिल्हाधिकारी कार्यालयाने ई-ऑफिससाठी शंभर स्कॅनर घेतले आहेत. यामध्ये प्रत्येक तहसील कार्यालयाला पाच स्कॅनर पाठवण्यात आले आहेत. उपविभागीय कार्यालयाला दोन स्कॅनर देण्यात आले आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट