म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची कामे सुरू करा, मजुरांना २०० रुपये रोजगार द्या, आदी मागण्यांसाठी तालुक्यातील धानोरा, आडगाव, गेवराई गुंगी, वारेगाव, बोरगाव अर्ज, साताळ पिंप्री या गावातील सुमारे ४०० ते ५०० मजुरांनी फुलंब्रीच्या प्रशासकीय इमारतीसमोर जोरदार घोषणाबाजी करीत गुरुवारी (सात फेब्रुवारी) सुमारे दीड तास ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, तहसीलदार संगीता चव्हाण, सहायक गटविकास अधिकारी प्रकाश जोंधळे, तालुका कृषी अधिकारी मेघा पतंगे यांनी मजुरांना काम उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर मजुरांनी आंदोलन थांबवले.
फुलंब्री तालुक्यात सध्या तीव्र दुष्काळ पडला असून, शेतकरी व शेतमजुरांच्या हाताला काम उपलब्ध नाही. शासनाने दुष्काळ जाहीर करून तीन महिने उलटले आहे, मात्र अद्याप तालुक्यातील अनेक गावांत मजुरांच्या हाताला काम उपलब्ध झाले नाहीत. त्यामुळे गुरुवारी दुपारी तालुक्यातील धानोरा, आडगाव, गेवराई गुंगी, वारेगाव, बोरगाव अर्ज, साताळ पिंप्री या गावातील मजूर काँग्रेसची दुष्काळी सभा आटोपल्यावर थेट तहसील कार्यालय गाठत हमी योजनेची कामे सुरू करा, मजुराला २०० रुपये रोज द्या, मजुरांच्या हाताला काम द्या, अशा जोरदार घोषणा दिल्या.
दरम्यान, तहसील कार्यालयात तहसीलदार संगीता चव्हाण, सहायक गटविकास अधिकारी प्रकाश जोंधळे, तालुका कृषी अधिकारी मेघा पतंगे यांच्याशी जगन्नाथ काळे, जिल्हा परिषद सदस्य किशोर बलांडे, काँग्रेस तालुकाध्यक्ष संदीप बोरसे यांनी मजुरांतर्फे चर्चा केली. यानंतर सर्व अधिकाऱ्यांनी येत मागणी केलेल्या सर्व मजुरांच्या हातात काम उपलब्ध करून देण्यात येईल व कामाचा मोबदला चांगला देण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले.
\Bमजुरी केवळ ६० रुपये\B
धानोरा येथे ४०५ मजूर आहेत, तर प्रशासनाने फक्त २५० मजुरांना काम उपलब्ध करून दिले आहे. २०० मजूर अद्याप कामाच्या शोधात चकरा मारत आहेत. त्यातही काम मिळालेल्या २५० मजुरांना केवळ ६० रुपये रोजदारी मिळते. त्यांनी आम्हला किमान २०० रुपये रोज द्यावा; तसेच धानोरा येथील हमी योजनेतून सुरू असलेले काम मागील चार दिवसापासून बंद पडले असल्याने मजुरांना उपास मारीची वेळ आली आहे. तर उर्वरित कामातील मजुरांनी आम्हाला काम उपलब्ध करून द्यावे यासाठी ठिय्या आंदोलन केले.