म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद 'आई देव असते, आईच मुलांना घडवत असते. छत्रपती शिवाजी महाराज हे महान राजे, शिवाजी महाराजांना लहानपणी माता जिजाऊंनी विविध गोष्टी, कथा सांगितल्या. स्वामी विवेकानंदानांही त्यांच्या आईने लहानपणी रामायण, महाभारतातील कथा सांगितल्या होत्या. आजच्या आईनेही हे काम करायला हवे, संतांचे मार्गदर्शन हे महत्त्वाचे असून संतांनीच देशाला आधार दिला,' असे प्रतिपादन श्री रामकृष्ण मिशन आश्रमाचे प्रमुख तसेच संत विचारांचे प्रचारक स्वामी विष्णुपादानंद यांनी केले. संत साहित्य शिक्षण व संशोधन प्रतिष्ठानच्या वतिने देण्यात येणारा 'माउली पुरस्कार' रविवारी (दहा फेब्रुवारी) स्वामी विष्णुपादानंद यांना देण्यात आला. यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार मनोहर कुलकर्णी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी स. भु. शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राम भोगले, प्रतिष्ठाणच्या अध्यक्ष डॉ. अर्चना मोहगावकर, डॉ. संजीव सावजी, प्रा. श्रीकांत काशीकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी स्वामी विष्णुपादानंद म्हणाले की, सेवा आणि त्याग हा भारताचा आदर्श आहे. या दोन गोष्टींकडे लक्ष दिल्यास सर्व गोष्टी आपोआप होतात. सर्व धर्म हे भगवंतांकडे घेऊन जातात. त्यामुळे कोणत्याही धर्मातून तुम्ही अध्यात्म प्राप्ती घेऊ शकतो, हा संदेश स्वामी विवेकानंदांनी सर्वांपर्यंत पोचवला. स्वामी विवेकानंद यांनी शिकागोला केलेले भाषण लोकांनी डोक्यावर घेतले. भारत हा सर्वात वेगळा देश आहे ही जाणीव इतर देशांमध्ये निर्माण करण्याचे अवघड काम त्यांनी केली असे त्यांनी सांगितले. हा सत्कार माझा नसून संस्थेचा आहे, हा पुरस्कार संस्थेतर्फे स्वीकारत असल्याचे ते नम्रपणे म्हणाले. स. भु. शिक्षण संस्थेचे अध्यक्ष झाल्याबद्दल राम भोगले यांचा सत्कार यावेळी संत साहित्य प्रतिष्ठान आणि मंगलमूर्ती संस्कार केंद्र यांच्या वतिने करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते मंगलमूर्ती संस्कार केंद्राच्या आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले. कार्यक्रमासाठी शहरातील नागरीकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. \Bशिक्षणात दोष आहेत का ?\B यावेळी राम भोगले म्हणाले, १९७२च्या दुष्काळात आत्महत्या झाल्या नाहीत, मात्र आज पाऊस असतानाही शेतकरी आत्महत्या होत आहेत. त्यामुळे आजच्या शिक्षणात दोष आहेत काय असे वाटते. आज अधिकाधिक मिळवण्याची लालसा निर्माण झाली आहे. रांगेत आपणच पहिले राहिले पाहिजे ही मानसिकता कमी झालेली नाही. स्पर्धा असावी मात्र ही स्पर्धा स्वत:साठी असावी असेही त्यांनी सांगितले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट