म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद पुलवामा येथे जवानांवर झालेल्या हल्ल्याचे तीव्र पडसाद शुक्रवारी शहरात उमटले. विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पाकिस्तानचा झेंडा तसेच मौलाना मसूद अजहरचा फोटो जाळला. आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, निवडणुकीच्या तोंडावर देशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. आपले जवान हा डाव यशस्वी होऊ देणार नाहीत. केंद्र सरकार व लष्कर जे कठोर पावले उचलत आहेत त्यास आमचा पाठिंबा राहील. या हल्ल्यामध्ये पाकपुरस्कृत दहशतवादी संघटनांचा हात असला तरी त्यांना मदत करणारे स्थानिक स्लीपर सेल सक्रिय असतात. त्याचा छडा लावून बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली. आंदोलनामध्ये भाजपचे नेते आणि पदाधिकाऱ्यांनीही भाग घेतला. यावेळी आमदार अतुल सावे, किशनचंद तनवाणी, कन्हैय्यालाल शहा, डॉ. भागवत कराड, बापू घडामोडे, प्रमोद राठोड, माधुरी अदवंत, अनुराधा चव्हाण, मनीषा भान्साळी, कांताबाई कदम उपस्थित होते. \Bहिंदू जनजागरण समितीचे निवेदन \Bपाकिस्तानवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी करत हिंदू जनजागरण समितीने जिल्हा प्रशासनामार्फत पंतप्रधानांना निवेदन दिले. आतापर्यंत दहशहवाद्यांकडून जम्मू आणि कश्मीर तसेच देशभरात सातत्याने हल्ले होत आहेत. भारताने आक्रमण करून पाकिस्तानला कायमचा धडा शिकवावा. केंद्र सरकारने जनभावनेचा आदर करून भारतीय सैन्याला दहशतवाद्यांवर कारवाईसाठी मोकळीक द्यावी, पाकिस्तानवर कारवाईसाठी संयुक्त राष्ट्राकडे दबाव निर्माण होईल असे प्रयत्न करावे, पाकिस्तानशी संपूर्ण व्यवहार, संबंध तत्काळ तोडून टाकावे, कश्मीरमधील फुटीरतावाद्यांचे संरक्षण काढून त्यांना अन्य राज्यातील कारागृहात बंद करावे आदी मागण्याही यावेळी करण्यात आल्या आहेत. निवेदन देण्यासाठी अरुण महाराज पिंपळे, शरद चावडा, बळीराम गायकवाड, श्याम बागडे, प्रवीण वैष्णव, नीलेश पिंगळे, गणेश देशपांडे, प्रकाश कुलकर्णी आदींची उपस्थिती होती. \Bराष्ट्रवादी व काँग्रेसतर्फे मसूद अजहरच्या प्रतिमेचे दहन \Bपुलवामा येथील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश - ए - मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अजहरच्या प्रतिमेचे क्रांतीचौक येथे दहन करून या घटनेचा राष्ट्रवादी विद्यार्थी व युवक काँग्रेसने निषेध केला. यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद, मसूद अजहर मुर्दाबाद, भारत माता की जय, शहीद जवान अमर रहेच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सचिव अक्षय पाटील, शहराध्यक्ष मयूर सोनवणे, कार्याध्यक्ष अमोल दांडगे, युवक शहराध्यक्ष दत्ता भांगे, कार्याध्यक्ष कय्यूम शेख, भारत चव्हाण, जितेंद्र गायकवाड यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट