सुरेश कुलकर्णी, जालना
जालन्यातून आमदार अब्दुल सत्तार हे कोणत्याही क्षणी काँग्रेसची उमेदवारी मिळऊ शकतात. आपल्याला मिळालेली संधी नाहक घालवण्यापेक्षा झटकन, आहे त्या परिस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करून मोकळे व्हावे, या विचाराने काँग्रेसचे उमेदवार विलास औताडे यांनी अतिशय गडबडीत, कोणतीही तयारी नसताना शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल केला, अशी चर्चा जालन्यात सुरू आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिल्लोडचे आमदार सत्तार यांनी केलेल्या बंडाचे सर्वाधिक नुकसान जालना आणि त्यानंतर औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे, अशी चर्चा जालन्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी जालना मतदारसंघातील उमेदवार निश्चित करण्यासाठी नांदेड येथे बैठक बोलाविली होती. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख आणि अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यावेळी जालना मतदारसंघातून आमदार सत्तार यांना उमेदवारी द्यावी असा आग्रह धरला होता.
'महाराष्ट्र टाइम्स'ने यासंदर्भात सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले आहे.
विशेष म्हणजे शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी काँग्रेसच्या उमेदवारीवरून ऐनवेळी घुमजाव केल्यानंतर प्रदेशाध्यक्ष चव्हाण आणि आमदार सत्तार यांचीच खूपच मोठी अडचण झाली होती. जालन्यातून खोतकर यांना उमेदवारी देण्यासाठी आग्रह धरण्याच्या चव्हाण यांनी घेतलेल्या भूमिकेवर अखिल भारतीय काँग्रेस नेत्यांकडे आणि त्यानंतर राहुल गांधी यांच्याकडे चव्हाण यांच्या विरोधात अनेकांनी तक्रारी केल्या. त्यात जालन्यातील काँग्रेसचे नेते डॉ. संजय लाखे पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. खोतकर यांचे नाव कांग्रेसच्या लोकसभा उमेदवारीसाठी निश्चित आहे, असे छातीठोकपणे चव्हाण सांगत होते. त्यामुळे दुसऱ्या नावाची चर्चा सुद्धा त्यांच्यासमोर झालेली त्यांना चालत नव्हते. लोकसभेच्या निवडणुकीसाठी तयारी करायला एकही नेता धजावत नव्हता. विलास औताडे यांना असेच ऐनवेळेस उभे करण्यात आले आहे, ही वस्तुस्थिती आहे.
खोतकरांनी काँग्रेसला चकवा दिला. त्यानंतर चव्हाण यांनी घाईघाईत जालना आणि औरंगाबाद लोकसभा मतदारसंघांतून काँग्रेसचा उमेदवार ठरवण्याची मुख्य जबाबदारी आमदार सत्तार आणि माजी आमदार कैलास गोरंट्याल यांना दिली होती. सत्तार यांना जालना अथवा औरंगाबाद यापैकी एका मतदारसंघातून लोकसभेवर पाठवण्यास काँग्रेस पक्षश्रेष्ठी एका पायावर तयार असल्याचे स्पष्ट दिसत होते. आमदार सत्तार हे खासदार चव्हाण यांच्या अतिशय जवळचे असल्याने क्षणार्धात निर्णय फिरवला जाऊ शकतो. चंद्रपूर मतदारसंघातून जाहीर झालेली काँग्रेसची उमेदवारी बदलल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर जालन्यात देखील काहीही होऊ शकते. उगाच हाता तोंडाशी आलेला घास कशाला सोडायचा, अशी चर्चा शुक्रवारी दुपारी जालन्यातील काँग्रेसच्या एका जेष्ठ नेत्यांच्या घरी झालेल्या बैठकीत झाली.
शिवाय समजा आमदार सत्तार यांना जालन्यातून लोकसभेची काँग्रेसची उमेदवारी जाहीर झाली तर, जालन्यातील काँग्रेसअंतर्गत नेत्वृत्वात कमालीचे बदल होतील. इतके दिवस सांभाळून ठेवलेले सगळे संचित वाया जाईल, अशी भीती जालन्यातील काँग्रेसच्या प्रस्थापित नेत्यांनी व्यक्त केली आणि त्यानंतर तातडीने उद्याच्या उद्या विलास औताडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. महेश भवनमध्ये दुपारी झालेल्या कार्यक्रमात हा निर्णय जाहीर करण्यात आला.
यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी समजावून सांगितले. 'विलासबापू कोणत्याही गाड्या लावणार नाहीत. आता मोबाइल फोन, व्हॉट्स अॅपवरून निरोप देऊन जे येतील त्यांना बोलवावे,' असे ठरल्याची माहिती त्यांनी दिली. मिरवणूक काढण्यात येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले. 'इतकी घाई कशासाठी,' या कार्यकर्त्यांच्या प्रश्नाला सोईस्कर बगल देऊन, 'चला कामाला लागा असेच सांगण्यात आले.'
दरम्यान, शुक्रवारी रात्री उशिरा आमदार सत्तार हे काय करणार याची त्यांच्या औरंगाबाद येथील कार्यकर्त्यांच्या बैठकीत ठरणार होते. त्याचीही मोठी धास्ती जालन्यातील नेत्यांच्या बोलण्यात जाणवत होती. यासगळ्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्रीतून विलास औताडे यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तयारी केली आणि सकाळी ते जालन्यात दाखल झाले. आमदार राजेश टोपे यांना या सगळ्या निर्णयाची फार माहिती नव्हती. त्यामुळे ते त्यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमात व्यस्त होते आणि उमेदवारी अर्ज भरताना टोपे यांनी उपस्थित असणे अत्यंत आवश्यक असल्याने त्यांच्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांना शनिवारी सकाळी दोन तास ताटकळत उभे रहावे लागले. शिवाय आमदार टोपे हे थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आले. उमेदवारी अर्ज दाखल करताना औताडे यांच्यासोबत जिल्हाधिकारी कक्षात थांबले आणि त्यानंतर थेट निघून गेले. बाहेर माध्यमांच्या प्रतिनिधींना ते बोलले नाहीत. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर गायत्री लॉन्स येथे झालेल्या छोटेखानी मेळाव्यात टोपे आले नाहीत.
\Bजिल्हाधिकारी कार्यालयासमोरील नाट्य\B
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीबाहेर शनिवारी मुख्य प्रवेशद्वाराजवळ उभे राहिलेल्या काँग्रेसच्या नेत्यांना पोलिसांनी ज्या पद्धतीने दूर केले त्याची जालन्यात मोठी चर्चा रंगली आहे. यावेळी साधा शिष्टाचार न पाळणाऱ्या पोलिस, जिल्हा प्रशासनाला जाब विचारण्यासाठी काँग्रेसचा एकही नेता पुढे आला नाही. शंभर मीटरची मर्यादा सांभाळून जिल्हा प्रशासनाला या सगळ्या जेष्ठ, माजी आमदार व जिल्ह्यातील जबाबदार लोकनेत्यांना सांभाळता आले असते. कोणाचाही अपमान झाला नसता, अशी चर्चा आहे.