म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद आपेगाव-हिरडपुरी बंधाऱ्यात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी पैठण तालुक्यातील धरणग्रस्त शेतकऱ्यांनी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यालयात स्वत:ला कोंडून घेतले. पाणी सोडण्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत कार्यालय सोडणार नसल्याची भूमिका घेत आंदोलकांनी अधिकाऱ्यांनाही कोंडले. पोलिस बंदोबस्तात रात्री उशिरापर्यंत आंदोलन सुरू होते. पैठण तालुक्यातील ५५ गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पिण्यासाठी पाणी, जनावरांसाठी पाणी आणि चारा पिकांसाठी आपेगाव-हिरडपुरी बंधाऱ्यात पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. जायकवाडी धरणात पुरेसा पाणीसाठा आहे. त्यामुळे पाणी सोडण्याची आग्रही मागणी अन्नदाता शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी केली. दोन दिवसांपासून जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. मात्र, पाटबंधारे विभाग दखल घेत नसल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी गुरुवारी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. कार्यालयात घुसून दार लावून घेतल्यामुळे अधिकारी व कर्मचारी कोंडले गेले. दुपारी सुरू झालेले आंदोलन पोलिस बंदोबस्तात रात्री उशिरापर्यंत सुरू होते. 'पाण्याच्या मागणीसाठी सहा मे रोजी विभागीय आयुक्तालयावर मोर्चा काढला होता. त्यानंतरही पाटबंधारे विभागाने तातडीने निर्णय घेतला नाही. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन मुंबईत नसल्याचे कारण सांगतात. मात्र, मंत्री मुंबईत नसतील तर हजारो लोकांच्या जगण्याशी संबंधित पाण्याचा निर्णय होणारच नाही का', असा सवाल अन्नदाता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जयाजीराव सूर्यवंशी यांनी केला. जलसंपदा मंत्री महाजन यांनी मराठवाड्यात एकही टंचाई बैठक घेतली नाही. त्यामुळे मनमानीपणे पाणी सोडण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला. हा मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी दुर्दैवाचा भाग असल्याचा आरोप सूर्यवंशी यांनी केला. धरणग्रस्त शेतकऱ्यांनी फक्त अर्धा 'टीएमसी' पाणी मागितले आहे. शहरातील लोकांना पिण्यासाठी पाणी राखीव ठेवायचे आहे. त्यामुळे आम्ही पाणी देऊ शकत नाही अशी भूमिका प्रशासन मांडत आहे. शहरात लोक राहतात आणि खेड्यात जनावरं राहतात का अशी टीका सूर्यवंशी यांनी केली. दरम्यान, पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक अजय कोहिरकर यांनी शेतकऱ्यांची मागणी ऐकली. जलसंपदा विभागात वरिष्ठांकडे पाणी सोडण्याबाबत मार्गदर्शन मागवले आहे. ही मागणी पोहचवली आहे, असे कोहीरकर यांनी स्पष्ट केले. \Bपाण्यासाठी अडवू नका \Bपाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकरी पाटबंधारे कार्यालयात येणार असल्याचे कळल्यानंतर पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. शेतकऱ्यांनी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी तिथेच रोखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही वेळ दोन्हीकडून रेटारेटी झाली. भर उन्हात हक्काच्या पाण्यासाठी आलो असून आम्हाला रोखू नका, असे सांगत आंदोलकांनी ठिय्या मांडला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट