म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरात सांडपाण्यावर प्रक्रिया होत नसल्याने भूजल प्रदूषणाचे प्रमाण लक्षणीय वाढत आहे. पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांचे पाणीसुद्धा दूषित झाल्यामुळे पिण्यायोग्य पाण्यासाठी रहिवाशांची परवड होत आहे. सांडपाणी उघड्यावर सोडणे आणि प्रक्रिया टाळणे भूजल प्रदूषणाच्या हानीचे कारण ठरले आहे.
तब्बल १५ लाख लोकसंख्येच्या औरंगाबाद शहरात पाणी टंचाई भेडसावत आहे. महापालिकेचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून बोअरवेल व विहिरीतून उपलब्ध होणारे पाणी पिण्यायोग्य नसल्याचे निष्कर्ष आहेत. त्यामुळे पाणी टंचाईची झळ जास्त जाणवत आहे. अतिरिक्त सांडपाणी भूजल प्रदूषणाचे प्रमुख कारण ठरले आहे. महापालिका सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पूर्ण क्षमतेने राबवण्यात अपयशी ठरली. बहुतेक सांडपाणी नाल्यांद्वारे भूजलात झिरपत आहे. शहरात जवळपास ४० टक्के नागरिक पाण्याचे नैसर्गिक स्रोत वापरतात. बोअरवेल, तलाव आणि विहिरींचे पाणी उपयुक्त ठरत होते. पण, गुणवत्ता ढासळल्यानंतर पाणी पिण्यायोग्य राहिले नसल्याचे पाहणीत आढळले. आता पाणी फक्त वापरासाठी योग्य असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले. दोन वर्षांपूर्वी देवगिरी कॉलेजच्या भूगर्भशास्त्र विभागाने शहरात १३० ठिकाणी पाणी नमुने तपासले होते. नागरिकीकरण व औद्योगिकीकरणामुळे झालेल्या भूजल प्रदूषणाचे संशोधन केले होते. या प्रकल्पात सार्वजनिक ठिकाणचे पाणी, नैसर्गिक स्रोत, नदी-नाल्याकाठच्या भागातील पाणी नमुने तपासले होते. बेगमपुरा, घाटी, छावणी, कांचनवाडी, पाटोदा, बिडकीन, शिवाजीनगर, सूतगिरणी, शहानूरमियाँ दर्गा, रेल्वेस्थानक, समर्थनगर, ज्योतीनगर, सिडको अशा विविध भागात संशोधन केले होते. हा अहवाल महापालिका प्रशासनाला दिल्यानंतरही उपाययोजना झाली नाही. परिणामी, सांडपाण्यामुळे भूजल वेगाने दूषित होत आहे. सांडपाण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी पाण्याचा पुनर्वापर आवश्यक ठरला आहे. हा प्रयोग प्रत्यक्षात आल्यास किमान ६० टक्के पाणी पुन्हा वापरता येऊ शकते. सांडपाणी सिमेंट पाइपद्वारे वळवल्यास पाणी मुरण्याची प्रक्रिया रोखता येईल असा सल्ला तज्ज्ञांनी दिला. मात्र, भूमिगत गटार योजना राबवूनही शहरातील सर्व सांडपाणी वळवण्यात अपयश आले.
औद्योगिक वसाहती वाढल्यानंतर भूजल साठे दूषित होऊन शेती नापीक झाली. रसायनयुक्त पाण्याचे प्रमाण वाढले असून वाळूज परिसरातील १८ गावांत क्षारयुक्त पाणी आहे. पिण्याच्या पाण्यासाठी गावकऱ्यांवर भटकंती करण्याची वेळ आली आहे. रसायनयुक्त पाण्यावर प्रक्रिया करुनच सोडण्याचा नियम असताना कारखाने सर्रास उल्लंघन करीत असल्याची वस्तुस्थिती आहे. परिणामी, ग्रामीण भागातही दूषित पाण्यामुळे त्वचाविकार आणि हाडांची ठिसूळता या आजारांचे रूग्ण वाढले आहेत. मैलायुक्त सांडपाण्यावर भाजीपाला पिकवला जात आहे. हा भाजीला शहरात सर्रास विकला जात असल्यामुळे आजाराला आमंत्रण मिळाले आहे. भूजल प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाण्याला अटकाव घालणे काळाची गरज ठरली आहे.
\Bघातक घटक वाढले\B
भूजल दूषित झाल्यामुळे पाण्यातील घातक घटक लक्षणीय वाढले आहेत. हार्डनेस, सल्फेट, क्लोराइड, सॉल्वंट, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, पीएच, अल्कलीनिटीची मात्रा तुलनेने वाढली आहे. दूषित पाणी प्यायल्याने नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम झाला आहे. दूषित सांडपाणी जमिनीत झिरपत असल्याने रोगांचा प्रादुर्भाव दिसत आहे. औद्योगिक वसाहत परिसरात ही भयावह स्थिती आहे.
सांडपाणी बंद पाइपद्वारे प्रक्रिया प्रकल्पापर्यंत पोहचवणे गरजेचे आहे. तसेच उद्योगांना रसायनयुक्त पाण्यावर प्रक्रिया बंधनकारक करुन दरमहा ऑडिट करावे. या उपाययोजनातून भूजल प्रदूषण रोखणे शक्य होईल.
डॉ. अशोक तेजनकर, भूगर्भ शास्त्रज्ञ