म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कॅम्पसमध्ये विहिरी, तलाव आणि बारव सुस्थितीत असूनही नियोजन नसल्याने पाणी टंचाई आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचे 'वॉटर मॅपिंग' करण्याची सूचना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी केली आहे. त्यानुसार विद्यापीठ परिसरात डोंगरांच्या पायथ्याशी पाचशे झाडे लावून 'पाणी अडवा, पाणी जिरवा' प्रयोग राबविण्यात येणार आहे. मराठवाड्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती असून शैक्षणिक संस्थांनाही पाणी टंचाईचा फटका बसला आहे. विद्यापीठात वसतिगृहातील विद्यार्थ्यांना सातत्याने पाण्यासाठी आंदोलने करावी लागली. दूषित पाण्यामुळे १६४ विद्यार्थिनी आजारी पडल्या होत्या. मुख्य प्रशासकीय इमारत, सामाजिकशास्त्रे विभाग, ग्रंथालय, अभ्यासिका, राजर्षी शाहू महाराज परीक्षा भवन इमारतीत सतत पाणी टंचाई असते. नुकताच कार्यभार स्वीकारलेले कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी टंचाईचा आढावा घेतला. केमिकल टेक्नॉलॉजी विभागात कार्यरत असताना तलाव खोलीकरणातून पाणीसाठा वाढवण्यावर शिंदे यांच्यासह सहकारी प्राध्यापकांनी भर दिला होता. या कामाची आठवण ठेवत शिंदे यांनी विद्यापीठात पाणी अडवण्याचे व वितरणाचे नियोजन नसल्यामुळे पाणी टंचाई वाढल्याचे स्पष्ट केले. विद्यापीठाचे 'वॉटर मॅपिंग' केल्यास पाणी अडवण्यासाठी मार्ग लक्षात येईल, असा प्रस्ताव शिंदे यांनी चर्चेत मांडला. त्यानुसार लवकरच 'वॉटर मॅपिंग' होणे अपेक्षित आहे. गोगाबाबा टेकडी, हनुमान टेकडी आणि डोंगररांगातून वाहणारे पाणी अडवण्याचे नियोजन करण्यावर चर्चा झाली. गोगाबाबा टेकडीच्या पायथ्याशी जुलै महिन्यात तीन फूट उंचीची ५०० झाडे लावली जाणार आहेत. योग्य लागवड करण्यासाठी खड्डे खोदले जाणार आहेत. पाण्याचा ताण सहन करण्यासाठी मोठी रोपे लावण्यावर भर दिला आहे. तसेच तलाव, विहिरी आणि बारवांचे पुनर्भरण करण्यासाठी उपाययोजना हाती घेतली जाणार आहे. \B'पाणीदार' विद्यापीठाचा प्रयोग \Bडॉ. देवानंद शिंदे कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी रूजू झाल्यानंतर त्यांनी 'पाणीदार विद्यापीठ' प्रयोग यशस्वी केला. त्यात तब्बल ८५५ एकर क्षेत्र असलेल्या विद्यापीठात ३० कोटी लिटर पाणी अडवणे शक्य झाले. आता बारमाही पाणी उपलब्ध झाले असून पाण्यासाठी दरमहा होणारा नऊ लाख रुपये खर्च वाचला आहे. या प्रयोगाची दखल घेत देशभरातील जलज्ज्ञांनी विद्यापीठाला भेट दिली. विद्यापीठातील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांसाठी 'आरओ'चे मुबलक पाणी उपलब्ध झाले. झाडे आणि फळबागांना पाणी मिळाल्यामुळे जैवविविधता वाढली आहे. या धर्तीवर 'बामू'त प्रयोग झाल्यास पाणीप्रश्न सुटेल, असा शिंदे यांचा विचार आहे. कर्मचारी, विद्यार्थी आणि लोकांना प्रोत्साहन दिल्यास लोकसहभाग वाढतो. त्यातून प्रयोग सहजपणे यशस्वी होतो. विद्यापीठात भरपूर विहिरी व तलाव असल्यामुळे पाणी टंचाई दूर करणे शक्य आहे. डॉ. देवानंद शिंदे, कुलगुरू
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट