म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद शटडाऊनच्या काळात रिंग मेन युनिटसह मुख्य जलवाहिनीवरील वीस ठिकाणी देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात आली. या कामांसाठी १२ तासांचे शटडाऊन घेण्यात आले होते. प्रत्यक्षात काम १५ तास चालले. त्यामुळे रात्री १२ वाजेच्या सुमारास जायकवाडीहून पाणी पुरवठा सुरू करण्यात आला. जायकवाडी आणि फारोळा येथे औरंगाबादच्या पाणी पुरवठा योजनेचे पंपहाऊस आहे. पंपहाऊसचा वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे दोन्हीही पंपहाऊससाठी रिंग मेन युनीट बसवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हे युनीट बसवल्यावर पंपहाऊसला अखंड वीज पुरवठा होईल, असे मानले जाते. त्यामुळे हे युनीट बसवण्यासाठी महावितरण कंपनीच्या सल्ल्याने रिंग मेन युनीट बसवण्यासाठी शटडाऊन घेण्यात आले. सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत शटडाऊनची वेळ जाहीर करण्यात आली होती. प्रत्यक्षात हे काम रात्री ११ वाजेपर्यंत चालले. त्यानंतर जायकवाडीहून पाणी पुरवठा सुरू करण्यात आला. शटडाऊनच्या काळात जायकवाडी, फारोळा, नक्षत्रवाडी येथील पंपहाऊसमध्ये व्हॉल्व्ह बसवण्याचे काम करण्यात आले. ७०० आणि १४०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीवरील गळत्या दुरुस्त करण्याची कामे सुमारे २० ठिकाणी करण्यात आली. ताहेरपूर जवळ व्हॉल्व्ह दुरुस्तीचे काम करण्यात आले. ढोरकीन येथे जमिनीखालील २४ लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीची स्वच्छता करण्यात आली. त्यातील गाळ, गवत काढण्यात आले. रात्री १२ वाजेच्या सुमारास जायकवाडीहून पाणी पुरवठा सुरू केला जाईल असे पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. शटडाऊनमुळे संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा शुक्रवारी दिवसभर बंद होता. त्याचा परिणाम पुढील दोन दिवस पाणी पुरवठ्याच्या व्यवस्थेवर जाणवणार आहे. पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक एक ते दोन दिवसांनी पुढे ढकलले जाणार आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट