म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद 'पीपल्स एज्युकेशन सोसायटीमुळे आंबेडकरी चळवळीतील पहिली पिढी शिकली आणि नेतृत्व करू लागली. माजी विद्यार्थ्यांनी जबाबदारीकडे पाठ न फिरवता संस्थेच्या विकासासाठी पुढाकार घ्यावा. अंतर्गत वादामुळे संस्थेची होत असलेली दुरवस्था थांबविण्यासाठी सर्वांनी संस्थेसोबत उभे रहावे,' असे आवाहन डॉ. प्रमोद दुथडे यांनी केले. ते नागसेनवन परिसरात बोलत होते. मिलिंद नागसेनवन स्टुडंट्स वेल्फेअर असोसिएशन व माजी विद्यार्थी यांच्यातर्फे पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा ७४वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. यानिमित्त नागसेनवनातील लुम्बिनी उद्यानात सोमवारी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी डॉ. प्रमोद दुथडे, माजी नगरसेवक इकबालसिंग गिल, डॉ. भीमराव साळवी, प्राचार्य सुनील वाकेकर, रिपब्लिकन सेनेचे रुपचंद गाडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी वृक्षारोपण करण्यात आले आणि मिठाई वाटण्यात आली. आणीबाणीच्या काळात कुठेही प्रवेश मिळत नव्हता. तेव्हा मिलिंद महाविद्यालयात आम्हाला शिक्षण मिळाले. आमच्या कार्याचे श्रेय मिलिंद महाविद्यालयाला आहे, अशी आठवण गिल यांनी सांगितली. पीपल्स एज्युकेशन सोसायटी आपल्या उत्कर्षासाठी स्थापन करण्यात आली. मात्र, संस्थेच्या वाताहतीस समाजही जबाबदार आहे. मिलिंदच्या माध्यमातून जबाबदार नागरिक घडविण्यासाठी बाबासाहेबांना शिक्षणासह सामाजिक, सांस्कृतिक क्रांतीचे केंद्र अपेक्षित होते. आता वादमुक्त पीपल्स करण्यासाठी समाजातून उठाव होणे गरजेचे आहे, असे प्राचार्य डॉ. सुनील वाकेकर म्हणाले. या उपक्रमाला चंद्रकांत रुपेकर, सचिन निकम, डॉ. अविनाश सोनवणे, अॅड. अतुल कांबळे, अविनाश कांबळे, रुपराव खंदारे, पवन पवार आदी उपस्थित होते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट