मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
महिलेवर दारूड्याने केला चाकूहल्ला
भावांनी केला वडिलांचा खून
कौटुंबिक कारणातून दोन मुलांनी आपल्या जन्मदात्या वडिलांचा खून केल्याची घटना पिंपळखुंटा येथे सोमवारी रात्री घडली. या प्रकरणी मृत भगवान सोनवणे यांच्या रामेश्वर आणि गणेश या मुलांना करमाड पोलिसांनी मंगळवारी (१७ मार्च) अटक केली.
शेती करणारे भगवान यांचे पत्नीसोबत पटत नसल्याने ते गेल्या दीडवर्षांपासून गावशिवारात असलेल्या शेतात राहत होते. त्यांच्यासोबत मोठा मुलगा रामेश्वर व त्याची पत्नी मीनाक्षी राहत असे, तर गावातील घरात छोटा मुलगा गणेश हा पत्नी आणि आईसह राहत असे. सोमवारी (१६ मार्च) रात्री साडेआठच्या सुमारास भगवान यांचे किरकोळ कारणावरून थोरला मुलगा रामेश्वरसोबत वाद झाला. त्यावरून त्यांनी मुलास शिवीगाळ करत घराबाहेर काढले. या घटनेमुळे संतप्त झालेल्या रामेश्वरने गावातून लहान भाऊ गणेशला सोबत घेत शेतातील घर गाठले. त्यांच्यात पुन्हा वादावादी सुरू झाली. त्यांचे पर्यावसन मारामारीत झाले.
पोटची पोर हातात लाठीकाठ्या घेत चालून आल्याने वडिलांनाही कुहाऱ्ड हातात घेतली. यात वर्मी घाव लागल्याने भगवान जमिनीवर कोसळले. हे पाहातच दोन्ही भावांनी धूम ठोकली, तर या घटनेमुळे भांबावून गेलेल्या मीनाक्षीने आरडाओरड केल्याने ग्रामस्थ धावून आले. ग्रामस्थांच्या मदतीने तिने सासरे भगवान यास घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले, परंतु उपाचारादरम्यान त्यांचा रात्री उशीरा मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळताच करमाड पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी घटनास्थळी घाव घेत पाहणी केली. गावशिवारात लपून बसलेल्या रामेश्वर व गणेश या संशयित आरोपींना पोलिसांनी मंगळवारी अटक केली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
शहाजीराजे स्वकीयांच्या बंदीवासात
छत्रपती शहाजीराजांना वेरूळ येथे त्यांचे वडील मालोजीरावांच्या जागेत उभ्या राहणाऱ्या स्मारकात बंदीवासात लोटण्याचे संतापजनक काम ठेकेदार आणि प्रशासनाने केले आहे. स्मारकाचे उद्घाटन होऊन आज आठ वर्ष लोटली, मात्र कंत्राटदाराची टोलवाटोलवी आणि प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्षामुळे हा प्रकल्प रखडला आहे. आतापर्यंत या प्रकल्पावर अडीच कोटींहून अधिक रक्कम खर्च झाली आहे.
शहाजीराजांच्या स्मृती जपव्यात यासाठी स्मारकाचा प्रस्ताव पुढे आला. प्रकल्पासाठी मालोजीराजे भोसले यांच्या मालकीची जागा निश्चित झाली. २००४-०५ मध्ये स्मारकाच्या कामाला सुरुवात झाली. १७ सप्टेंबर २००८ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख व उपमुख्यमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांच्या हस्ते उद्घाटनही झाले. प्रकल्प लवकरच पूर्ण करण्याचे आश्वासन नेत्यांनी दिले, मात्र आजगायत हे स्मारक एकदाही जनतेसाठी खुले झाले नाही. नाव न छापण्याच्या अटीवर एका अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार काम पूर्ण झाले असले तरीही मूळ संकल्पनेतील अनेक बाबींचा अद्याप पत्ताच नाही. मिनी थिएटरसाठी आलेले ६२ लाख रुपये २००९ पासून वापराविना पडून आहेत. महाराष्ट्र कल्चरल मिनी थिएटरचे हॉलचे बांधकाम थांबले असून त्याऐवजी स्मारक परिसराचे सुशोभीकरण, कारंजे, बगीचा, पाणीपुरवठा, विद्युतीकरण, स्वच्छतागृह इत्यादी कामे सूचविली आहेत. औरंगाबादमधील खासगी वास्तुशास्त्रज्ञ मे. चंद्रशेखर असोसिएटस यांना प्रस्तावित कामाचे नकाशे व अंदाजपत्रक तयार करण्याचे काम दिले आहे. कधी बांधकाम साहित्याचे वाढीव दर, तर कधी तांत्रिक अडचण अशी कारणे पुढे करत या प्रकल्पाचे बजेट वाढविण्यातच प्रशासनाला अधिक रस असल्याचे दिसते.
...अनेक प्रश्न अनुत्तरित
शहाजीराजे भोसले स्मारकाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने केले आहे. मात्र स्मारकाची जागा कोणी ताब्यात घ्यायची, स्मारकाच्या परिसराची साफसफाईचे, देखभाल व दुरुस्तीचे काम कोणी करायचे? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. सध्या स्मारकाच्या सभोवताली असलेल्या परिसरात सर्वत्र गाजर गवताचे साम्राज्य पसरलेले आहे.
...अशी आहे संकल्पना
शहाजीराजे भोसले यांचा १२ फूट उंचीचा ब्रॉँझचा पुतळा, त्यांच्यावर आधारित ग्रंथसंपदा, कारंजे, उद्यान, आकर्षक वास्तू अशी या प्रकल्पाची संकल्पना आहे. सध्या मात्र शहाजीराजे भोसले यांचा पुतळा उन्हात आहे. पुतळ्यासमोर जागा मोकळी ठेवली आहे.
प्रकल्पाचा प्रवास
१३ व १४ सप्टेंबर १९८५ - मंत्रिमंडळ बैठकीत वेरूळ विकास समितीची स्थापना.
१८ मे १९८७ - सेतू माधवराव पगडी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत.
९ सप्टेंबर १९९८ - २ कोटी १८ लाख रुपयांचे अंदाजपत्रक सादर.
१७ फेब्रुवारी १९९९ - मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या विश्वासदर्शक ठरावाप्रसंगी राज्यपालांच्या अभिभाषणात शहाजीराजे भोसले स्मारक उभारण्याची घोषणा.
पहिली तरतूद - २००४-०५ मध्ये ३२ लाख ७ हजार रुपयांची. - निविदेवेळची किंमत - २ कोटी २२ लाख ५० हजार ( २००५ - ०६)
आजवरचा खर्च - २ कोटी ३५ लाख ( २००९ पर्यंत )
सध्या पडून असलेला निधी - ६२ लाख ( २००९-१०पासून)
स्मारक पूर्ण करण्यासाठी लागणारा खर्च - २ कोटी
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेचा निकाल जाहीर
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
वेतनावर प्रशासनाचा नांगर
जिल्ह्यात गंभीर दुष्काळ आहे. सद्यस्थितीला राज्यात सर्वाधिक टँकर औरंगाबाद जिल्ह्यात सुरू आहेत. आहे ते जलस्त्रोत जपण्यासाठी नेमण्यात आलेल्या १७७ कर्मचाऱ्यांकडून दुष्काळ निवारणाचे कामही केले जात आहे, पण त्यांना प्रतीक्षा आहे त वेतनाची. तब्बल दोन महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले आहे. जिल्हा परिषद प्रशासनाकडूनही त्याकडे लक्ष दिले गेलेले नाही.
जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागांतर्गत हातपंप दुरुस्ती व प्रादेशिक योजना दुरुस्ती या हेडखाली १७७ अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांचे वेतन उपकर तसेच योजनांच्या देखभाल, दुरुस्तीतून केले जाते. संबंधित कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी दरमहा ४५ लाख रुपये लागतात. पाणीपट्टीची वसुली किती प्रमाणात होते, त्याचा निकष पाहून वेतन केले जाते. वर्षानुवर्षे ही पद्धती अवलंबिली जात आहे. त्याचा फटका कर्मचाऱ्यांना बसत आहे. डिसेंबर २०१४ मध्ये या कर्मचाऱ्यांना वेतन दिले गेले होते. त्यानंतर वसुली कमी प्रमाणात झाल्याचे कारण दाखवून जानेवारी व फेब्रुवारी महिन्याचे वेतन अदा करण्यात आले नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. वास्वतिक उपकरातून वेतन करण्याची तरतूद करणे जिल्हा परिषद प्रशासनाला शक्य आहे. प्रशासनाकडून योग्य त्या हालचाली न केल्याचा फटका १७७ कर्मचाऱ्यांना बसत आहे. वसुलीचे काम पंचायत विभागाचे आहे. त्याचा अतिरिक्त कार्यभार या कर्मचाऱ्यांवर दिला जात असल्याचा आरोप काही कर्मचाऱ्यांनी केला. दोन दोन महिने वेतनाविना काम करणारे कर्मचारी दुष्काळनिवारणाच्या कामातही सक्रिय आहेत. किमान आतातरी वेतन मिळावे, अशी त्यांची मागणी आहे.
या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रस्ताव असलेली फाइल मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांकडे दिली आहे. तीन चार दिवसांत जानेवारीपासूनचे वेतन होईल. वेतनाच्या बजेटमुळे अडचण आली होती.
- बी.एस. रबडे, कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा, जिल्हा परिषद
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
‘स्वच्छ भारत’ला निधीअभावी खीळ !
नागरिकांना स्वच्छतेचे महत्व पटवून देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेकडून समृद्धीकडे जाण्यासाठी स्वच्छ भारत अभियान हा महत्वकांक्षी प्रकल्प सुरू केला, मात्र केवळ निधी अभावी या योजनेला मराठवाड्यात खीळ बसण्याची शक्यता आहे. वर्षभरात विभागामध्ये १ लाख ४७ हजार नागरिकांनी शौचालय बांधले, मात्र त्यांना देण्यासाठी शासनाकडे निधीच उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. २०१४-१५ या वर्षामध्ये विभागासाठी शासनाकडे १२६ कोटी रुपये थकले आहेत.
राज्याच्या ग्रामीण भागात शौचालये नसल्याने नागरिकांना उघड्यावरच विधी उरकावा लागतो. त्यामुळे रोगराई पसरत असल्याने गावातील प्रत्येक कुटुंबांना शौचालय सक्तीचे केले जात आहे. शासनाकडून या योजनेअंतर्गत शौचालय बांधण्यासाठी प्रत्येक घरासाठी प्रोत्साहनपर १२ हजार रूपये इतके अनुदान देण्यात येते. या अभियानात शौचालये हा महत्त्वाचा घटक आहे. ज्यांच्याकडे घरात जागा आहे, त्यांना शौचालय बांधण्यासाठी निधी दिला जात असून तर ज्यांच्याकडे जागा नाही अशा कुटुंबांना सार्वजनिक ठिकाणी शौचालये बांधून दिली जाणार आहेत. ज्यांच्या घरी शौचालय नाही अशा नागरिकांना शासनाच्या वतीने शौचालय बांधण्यासाठी आग्रह धरण्यात येत असताना दुसरीकडे मात्र अनुदान देण्यासाठी विलंब होत आहे. यामुळे ज्यांना येणाऱ्या काळात घरामध्ये शौचालय बांधायचे आहेत त्यांचाही बांधण्यासाठी नकार मिळण्याची शक्यता आहे. या मिशनअंतर्गत वैयक्तिक शौचालयाच्या बांधकामासाठी १२ हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येते. या बारा हजार रूपयात ९ हजार केंद्राचा तर ३ हजार रुपयांचा राज्याचा हिस्सा आहे. या अभियानामध्ये पाणी उपलब्धता, पाणी साठवण, हात धुणे व शौचालय स्वच्छता या बाबींचा समावेश करण्यात आला आहे.
मराठवाड्याची स्थिती
जिल्हा शौचायल रखडलेला तयार निधी
औरंगाबाद २३३४४ ४ कोटी
जालना १०२४७ २० कोटी
परभणी १२६६८ १० कोटी
हिंगोली ४४१७ २ कोटी
नांदेड ५०८७० ४५ कोटी
बीड ६७६४ १० कोटी
लातूर १८६१० २० कोटी
उस्मानाबाद २०९९८ १५ कोटी
एकूण १४७९१८ १२६ कोटी
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
३०-५० वयोगटात धोक्याची घंटा
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) वॉर्डात दाखल झालेल्या रुग्णांमध्ये आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये सर्वाधिक २९ स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह रुग्ण हे ३० ते ५० या वयोगटातील आहेत.
घाटीच्या स्वाइन फ्लू वॉर्डात आतापर्यंत १०३ रुग्ण दाखल झाले. यातील एकूण ४४ रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये ११ महिन्यांच्या बालकापासून ते ६० वर्षांपर्यंतच्या वयोगटातील रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये ३० ते ४० वयोगटातील १२ रुग्ण, तर ४० ते ५० वयोगटातील १७ रुग्णांचा समावेश आहे. म्हणजेच १५ रुग्ण या वयोगटाबाहेरचे आहेत. एकूण मृत्यू झालेल्या पॉझिटिव्ह रुग्णांपैकी निम्मे रुग्ण हे ३० ते ५० या वयोगटातील आहेत. त्याचवेळी एकूण पॉझिटिव्ह ४४ रुग्णांपैकी २८ रुग्ण बरे झाले, हेही स्पष्ट झाले. या संदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, मुळात वॉर्डात दाखल होणाऱ्या एकूण रुग्णांमध्ये ३० ते ५० या वयोगटात सर्वाधिक असल्यानेच पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाणही याच वयोगटातील आहे. याच वयोगटातील बहुतांश व्यक्ती 'ब्रेड विनर' असल्याने साहजिकच 'एक्स्पोजर'ही याच वयोगटाला असणार आणि त्यामुळे स्वाइन फ्लू संसर्गाचे प्रमाणही याच गटात असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
...तर आजार नियंत्रणाबाहेर
'घाटीमध्ये मृत्यू झालेले पॉझिटिव्ह रुग्ण हे सरासरी चार दिवस (१०० तास) उशिरा स्वाइन फ्लू वॉर्डात दाखल झाले आणि अशा रुग्णांना सरासरी साडेतीन दिवसांनी (८० तास) 'टॅमी फ्लू' सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. उशिरा 'टॅमी फ्लू' सुरू झाल्यास आजार नियंत्रणाबाहेर जाण्याची व मृत्यूची शक्यता वाढते. तसेच संबंधित पॉझिटिव्ह रुग्णाला 'टॅमी प्लू' औषधोपचार सुरू झाल्यानंतर २४ ते ४८ तासांनी त्याच्यापासून इतरांना जंतुसंसर्ग होण्याची शक्यता मावळते. 'टॅमी फ्लू'मुळे संबंधित पॉझिटिव्ह रुग्णातील एच१एन१ विषाणू मरतात आणि एकदा विषाणू मृतवत झाल्यानंतर जंतुसंसर्गाची शक्यता राहात नाही, असे घाटीच्या मेडिसिन विभागप्रमुख डॉ. मंगला बोरकर यांनी सांगितले.
आठ रुग्ण दाखल
घाटीच्या वॉर्डात ८ रुग्ण दाखल आहेत. यापैकी २ पॉझिटिव्ह, तर ६ रुग्ण संशयित आहेत. दोन रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. वॉर्डामध्ये बुधवारी एकही रुग्ण दाखल झाला नाही, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जी. एम. गायकवाड यांनी कळविले आहे.
बरे झाले पॉझिटिव्ह रुग्ण
आजार मृत्यू बरे झालेले
मधुमेह १ ४
जुना टीबी ० २
रक्तदाब १
किडनीविकार १ २
एचआयव्ही १ १
हृदयाच्या वॉलचे रुग्ण ० १
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
एफडीएकडून टरबुजांची तपासणी
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर आणि ग्राहकांच्या सततच्या तक्रारीनंतर बुधवारी अन्न व औषधी प्रशासनाने शहरातील टरबूज विक्रेत्यांकडे जाऊन रिफ्रॅक्टोमीटरचा वापर करत तपासणी केली. टरबुजांची गेल्या काही वर्षांपासून ही पहिल्यांदाच तपासणी झाली. यात कुठेही टरबूज कृत्रिमरित्या पिकवल्याचे आढळले नाही. त्यातील सॅकरिनचे प्रमाणही १० ते १२ टक्के होते, जे नैसर्गिकरित्या पिकविलेल्या टरबुजांमध्ये असते.
बाजारात गेल्या दोन दिवसांपासून फळविक्रेत्यांची अचानक होत असलेल्या तपासणीबाबत चर्चा होती. सहआयुक्त सी. डी. साळुंके व त्यांच्या टीमने शहरात १२ ठिकाणी टरबुजांची तपासणी केली. या टरबुजांना इंजेक्शन दिले आहे का, त्यात सॅकरिन आहे का, त्याचे प्रमाण १२ टक्केपेक्षा आहे का, याची तपासणी अन्न आणि औषध प्रशासनाच्या प्रयोग शाळेत वैद्यकीय अधिकारी डॉ. बा. सु. बडदे यांनी केली. यात कुठेही अनुचितप्रमाण आढळले नाही. फळातील ० ते ९३ टक्के साखर ओळखणारे मशीन रिफ्रॅक्टोमीटरद्वारे तपासणी करण्यात आली. १७ मार्च व १८ मार्च असे दोन दिवस १२ ठिकाणच्या फळविक्रेत्यांकडील टरबुजांची तपासणी केली गेली. यात औरंगपुरा, महात्मा फुले चौक, गुलमंडी, शहागंज, जालना रोड आदी ठिकाणांचा समावेश आहे. ही तपासणी सी. डी. साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली बी. के. साखळे, डॉ. बा. सु. बडदे, डॉ. रा. द. मुंडे, अन्न सुरक्षा अधिकारी वर्षा रोडे यांनी केली.
शहरात विकले जात असलेले टरबूज हे नैसर्गिकच आहे, परंतु यापुढे टरबुजांची चव नेहमीपेक्षा अधिक गोड किंवा त्यात काही अनुचित प्रकार आढळू शकतो. तसे झाल्यास लगेच अन्न व औषध प्रशासनास कळवावे. ही मोहीम आम्ही ग्राहकांच्या मनात असलेल्या संभ्रम दूर करण्यासाठीच उघडली आहे.
- सी. डी. साळुंके, सहआयुक्त, एफडीए
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
शाळा झाल्या शिरजोर !
शिक्षण विभागाच्या नोटीसला, नियमांना केराची टोपली दाखवत शहरातील अनेक शाळांनी प्रवेश प्रक्रिया उरकली आहे. शाळांमध्ये शुल्कवाढ, पालक-शिक्षक संघ आणि परिवहन समित्या कागदावरच असल्याचे समोर आले आहे. आरटीई अंतर्गत २५ टक्के आरक्षणातील प्रवेश प्रक्रियेलाही शाळांनी ठेंगा दाखविला आहे. अशा ५७ शाळांना शिक्षण विभागाने नोटीस पाठविल्या, पण शाळा काही नमत नाहीत.
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत दुर्बल व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांसाठी राखीव असलेल्या २५ टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे. औरंगाबादमध्ये यंदापासून ही प्रक्रिया ऑनलाइन होत आहे. ६ मार्चपासून ही प्रक्रिया सुरू झाली आहे. शहरात ऑनलाइन प्रक्रियेतून आजपर्यंत १,६३६ पालकांचे अर्ज आलेले आहेत. एकीकडे प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन सुरू असताना अनेक शाळांनीच नोंदणीच केली नसल्याचे समोर आले आहे. औरंगाबादमध्ये ५२४ शाळांमध्ये या प्रक्रियेत प्रवेश होणार आहेत. वारंवार सूचना दिल्यानंतरही ५७ शाळांनी प्रक्रियेतून बाहेर आहेत. मुदतीनंतरही नोंदणी न करणाऱ्या शाळांना शिक्षण विभागाने नोटीस पाठवित, आठ दिवसात खुलासा करण्याचे निर्देश दिले आहेत.
प्रवेश प्रक्रियेची मुदत वाढणार?
शाळांच्या उदासिनतेमुळे ऑनलाइन २५ टक्के आरक्षित प्रवेश प्रक्रियेला सुरुवातीपासून खो बसतो आहे. अनेक पालकांनी शाळांची नावे दिसत नाहीत, तसेच अनेक पालकांकडे पुरेसे कागदपत्रे नसल्याने त्यांनी विविध विभागात त्यासाठी अर्ज केले आहेत. हे लक्षात घेत मुदतवाढ मिळावी, अशी मागणी शिक्षणाधिकारी कार्यालयाने संचालक कार्यालयाकडे केली आहे. ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया ६ मार्चपासून सुरू झाली असून २० मार्चपर्यंत मुदत आहे. पालकांचा आग्रह लक्षात घेता, प्रक्रियेला आठ दिवसांची मुदतवाढ मिळणार आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
बनावट कागदपत्राआधारे घराची विक्री
बनावट कागदपत्राआधारे किराडपुऱ्यातील एका घराची विक्री करून आठ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी शेख पाशा शेख शेरू याच्याविरुद्ध जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किराडपुरा शफीक कॉलनीतील शेख पाशा याने अब्दुल गुलाम गौस यांना दहा बाय तीसच्या पत्र्याच्या दोन खोल्यांची विक्री केली होती. हा व्यवहार २२ मे २०१४ रोजी करून आठ लाख रुपये घेऊन गौस यांना घरांची कागदपत्रे दिली होती. मात्र, नंतर ही कागदपत्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाले. गौस यांनी खऱ्या कागदपत्राची मागणी केली, मात्र शेख पाशा यांनी टाळाटाळ केली. याप्रकरणी आठ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अब्दुल गौस यांनी मंगळवारी गुन्हा दाखल केला.
दोन दुचाकींची चोरी
शहरातून दोन दुचाकींची चोरी झाली आहे. गणेशनगर, गारखेडा येथील मीना शर्मा यांच्या यांची दुचाकी (एम. एच. २०, डी. एल. ९४१४) शनिवारी घरासमोरून चोरीस गेली. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या घटनेत वाळूज बाजारतळावरून शेख मुस्ताक शेख मुसा यांची दुचाकी (एम. एच. २०, सी. जी. ०९०२) सोमवारी चोरीस गेली. याप्रकरणी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारची चाके पळवली
देवानगरी येथील स्मिता देठेकर यांच्या इन्व्होवा कारची चाके घराच्या पार्किंगमधून चोरून नेण्यात आली आहे. त्या ७ मार्च रोजी बाहेरगावी गेल्या होत्या, १० मार्च रोजी परतल्या. यादरम्यान चोरांनी दोन चाके चोरून नेली. याप्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घरातून मोबाइल पळवला
न्यू हनुमाननगर येथील गोरखनाथ चव्हाण यांचा मोबाइल उघड्या घर उघडे असताना चोरीस गेला आहे. ही चोरी शनिवारी रात्री साडेआठ ते नऊच्या दरम्यान झाली. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
किराणा चावडीतील बँकेसमोरून दुचाकीस्वारांनी पळविली बॅग
जिन्सी येथील एका दुकानदाराची बॅग दुचाकीस्वार चोरांनी मंगळवारी (१७ मार्च) सकाळी अकरा वाजता किराणा चावडी येथील महाराष्ट्र बँकेसमोरून पळविली. या बॅगेत रोख दहा हजार रुपये व चार लाख रुपयांचे चेक होते. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिन्सी येथील एक व्यापारी अब्दुल रज्जाक आदमजी (वय ७०) हे सकाळी ११ वाजता महाराष्ट्र बँकेत दहा हजार रुपये व चार लाख रुपयांचे चेक जमा करण्यासाठी आले होते. ते बँकेजवळ आल्यानंतर मागून आलेल्या दुचाकीवरील दोघांनी हातातील बॅग हिसकावली व काही क्षणात पळून गेले. आदमजी यांनी आरडाओरड केली; मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. सिटीचौक पोलिसांनी माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. ही घटना बँके बाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रीत झाली असून त्याआधारे पोलिस चोरांचा शोध घेत आहेत.
ट्रक पळवला
तारासिंग पन्नु (वय ४५ रा. पीरबाजार) यांचा ट्रक (एम. एच. २०, डी. ई. १८७७) बीड बायपासवरील श्रीकृष्ण पेट्रोलपंपासमोरून चोरीस गेला आहे. अशोक लेलँड ट्रकची किंमत २३ लाख ७५ हजार रुपये असून निळ्या रंगाची कॅबीन आहे. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पर्स पळवली
एमपी लॉ कॉलेजमधील केंद्रावर परीक्षा देणाऱ्या राजश्री कांबळे ( रा. पद्मपुरा) या विद्यार्थिनीची पर्स मंगळवारी (१७ मार्च) चोरीस गेली आहे. या विद्यार्थिनीचा क्रमांक हॉल क्रमांक ५मध्ये असल्याने हॉलबाहेर पर्स ठेवली होती. त्यात मोबाइल व महत्वाची कागदपत्रे होती. याप्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहा मोबाइल लंपास
पद्मपुऱ्यातील शीतल अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सहा विद्यार्थ्यांचे मोबाइल पळवण्यात आले आहेत. ओंकार बेडके, आशिष कुकडकर व त्यांचे चार मित्र येथे राहतात. क्लासला जाताना आशिषने मंगळवारी (१७ मार्च) सकाळी रुमचे दार लोटून घेतले होते. ही संधी साधून अज्ञात चोरट्यांनी सहा मोबाइल लंपास केले. याप्रकरणी ओंकारच्या तक्रारीवरून क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
जॉली बोर्ड कंपनीत भुशाच्या गंजीला आग
चिकलठाणा एमआयडीसीतील जॉली बोर्ड कंपनीमधील भुशाच्या गंजीला मंगळवारी (१७ मार्च) सकाळी साडेदहाच्या सुमारास आग लागली. आगीचे कारण समजू शकले नसून अग्निशमन दलाच्या जवानांनी चार तासाच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणली.
जॉली बोर्ड कंपनीत भुशापासून पुठ्ठा तयार केला जातो. त्यासाठी कंपनी मागील मोकळ्या जागेत भुशाच्या पाच गंजी वेगवेगळ्या रचण्यात आल्या आहेत. एका गंजीतून धूर निघत असल्याचे काही कामगारांच्या लक्षात आल्यानंतर तातडीने अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. सिडको व चिकलठाणा अग्निशमन विभागातून दोन बंब तातडीने घटनास्थळी रवाना झाले. दोन बंब व दहा टँकरच्या मदतीने ही आग विझवण्याचे प्रयत्न करण्यात आले. गंजीच्या वरच्या भागातील आग आटोक्यात आली तरी, आतील आग विझवण्यासाठी पराकाष्ठा करावी लागली. शेजारच्या चार गंजीपर्यंत आग पसरू न देता चार तासांत आग आटोक्यात आणण्यात आली. या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे अग्निशमन दलातून सांगण्यात आले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
‘साकार’च्या नावे फसवणूक
साकार संस्थेच्या बनावट पावत्या देऊन देणगी गोळा करणाऱ्या एका भामट्याला उस्मानपुरा पोलिसांनी अटक केली आहे. या भामट्याने शनिवारी (१४ मार्च) भागवत क्लासमधून देणगी उकळली होती. तो साकार संस्थेत मंगळवारी (१७ मार्च) माहितीपत्रक मागण्यासाठी आला आणि आयताच सापडला.
भागवत क्लासेसच्या संचालिका श्रीमती भागवत या साकार संस्थेच्या देणगीदार आहेत. त्यांच्याकडे शनिवारी जाजू नावाचा एक तरूण देणगी मागण्यासाठी आला होता. त्या तरुणाने हजार रुपये स्वीकारून पावती दिली. या पावतीबद्दल संशय आल्याने भागवत यांनी साकार संस्थेचे व्यवस्थापक विजय राजळे यांना फोन करून जाजू नावाच्या तरुणाला देणगीसाठी पाठवले होते का, अशी विचारणा केली. राजळे यांनी या नावाच्या व्यक्तीला पाठवले नव्हते, असे सांगून भागवत यांच्याकडून पावती मागवून घेतली. शहनिशा केल्यानंतर पावती बनावट असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी राजळे यांनी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. परंतु, अद्याप गुन्हा दाखल केला नव्हता.
दरम्यान, मंगळवारी साकार संस्थेच्या कार्यालयात आलेल्या एका तरुणाने संस्थेला देणगी द्यावयाची असल्याचे सांगून माहितीपत्रकाची मागणी केली. संस्थेतील सामाजिक कार्यकर्त्या अस्मिता शिरवाडकर यांना त्याचा संशय आला. शिरवाडकर यांनी त्याला व्यवस्थापक राजळे यांच्या समोर हजर केले. राजळेंनी या तरुणाने संस्थेत प्रवेश करताना गेटजवळ नोंदवलेल्या नावाची तपासणी केली. त्याने आदित्य जाजू असे नाव लिहल्याचे आढळून आले. राजळेंनी त्या तरुणाला बसवून ठेवले व संस्थेचे पदाधिकारी व श्रीमती भागवत यांना बोलावून घेतले. श्रीमती भागवत यांनी याच तरुणाने पैसे उकळल्याचे स्पष्टपणे सांगितले. त्यानंतर उस्मानपुरा पोलिसांना बोलावून घेऊन आदित्य जाजू (वय २६, चेतक घोड्यासमोर) याला ताब्यात देण्यात आले. विजय राजळे यांच्या तक्रारीवरून त्याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फसवणूक करणाऱ्या तरुणाची हिंमत
बनावट पावती देणारा हा तरूण साकार संस्थेत माहितीपत्रक मागण्यासाठी आला होता. संस्थेला देणगी देण्याची इच्छा असल्याचा आव त्याने आणला. परंतु, संशय आल्याने त्याला बसवून ठेऊन शहनिशा केल्यानंतर याच तरुणाने फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
व्यापाऱ्याचे घर फोडून दोन लाखांचा ऐवज लंपास
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
‘राजकीय षडयंत्रात खांबेकरांना गोवले’
'सुमीत खांबेकर यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतच ठेवत आहोत, त्यांच्याकडे पुन्हा एकदा शहराध्यक्षपदाचीच जबाबदारी देण्यात येत आहे,' अशी घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी (१८ मार्च) पत्रकारांशी बोलताना केली. खाम नदीत विषारी रसायने टाकण्याच्या प्रकरणात खांबेकर यांना राजकीय षडयंत्रात गोवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
खांबेकर यांना पोलिसांनी विषारी रसायने खाम नदीत टाकल्याच्या आरोपावरून अटक केली आहे. ते सध्या हर्सूल जेलमध्ये आहेत. खांबेकर यांना अटक झाल्याच्या दुसऱ्या दिवशी राज ठाकरे यांनी पत्रक प्रसिद्ध करून खांबेकर यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे जाहीर केले होते.
राज ठाकरे यांनी औरंगाबादचा दोन दिवसांचा दौरा संपवून मुंबईला रवाना होण्यापूर्वी बुधवारी सायंकाळी पत्रकारांशी संवाद साधला. 'खांबेकरच्या संदर्भात दोन दिवसात मी जी माहिती घेतली त्यावरून असे लक्षात आले आहे की, राजकीय षडयंत्र रचून त्याला गोवण्यात आले आहे. त्याचा त्या प्रकाराशी कोणताही संबंध नाही. पालिकेची निवडणूक तोंडावर असल्याने त्याला या प्रकरणात अडकवण्यात आले आहे. हे सगळे कोणाच्यातरी दबावाखाली सुरू आहे,' असा आरोप त्यांनी केला. खांबेकर यांना पक्ष सर्व प्रकारची मदत करेल, त्याच्यासाठी वकीलही देऊ,अशी माहिती त्यांनी दिली. खांबेकर यांना अडकवण्यासाठी आमच्या पक्षातील काही जणांनीही प्रयत्न केले, त्यांची कानउघाडणी केली आहे, त्यांच्यावर येत्या दोन दिवसात कारवाई करण्यात येईल, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.
लवकरच येणार
राज ठाकरे यांना पत्रकारांनी महापालिका निवडणुकीबद्दल प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना निवडणुकीसंदर्भाने दोन-चार दिवसात पुन्हा औरंगाबादला येत आहे, त्यावेळी बोलतो, असे ते म्हणाले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
महापौरांचा स्वकीयांवरच राग
उपभोक्ता करासंदर्भात सर्वसाधारण सभेचा निर्णय डावलून मनमानी पद्धतीने ७५० रुपये आकारण्याचा कारणापुरता उतारा पत्रकारांच्या हाती लागला. त्याबद्दलच्या बातम्या प्रसिद्ध झाल्याने महापौर कला ओझा यांनी स्वकीयांवर राग काढत स्थायी समितीचे सभापती विजय वाघचौरे यांना टार्गेट केले. दरम्यान, शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल यांनी हस्तक्षेप करीत ही चूक दुरूस्त केली जाईल, असे पत्रकारांना सांगितले. स्थायी समितीच्या चार सदस्यांनी दिलेल्या पत्रानुसार २३ मार्च रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे. या सभेत चुकीची दुरूस्ती केली जाईल, असे जैस्वाल यांनी पत्रकारांना सांगितले. उपभोक्ताकर ३०० रुपयांवरून १०० रुपये करण्यास मान्यता देऊन स्थायी समितीने प्रस्ताव सर्वसाधारण सभेला पाठवला होता. सर्वसाधारण सभेने स्थायी समितीचा निर्णय कायम ठेऊन १०० रुपयेच वसूल करा, असे आदेश दिले. पण कारणापुरता उताऱ्यात उपभोक्ताकर ७५० रुपये वसूल करण्याचा उल्लेख आहे. त्याबद्दलचे वृत्त प्रकाशित झाले आहे. त्यामुळे महापौरांनी स्वकीयांवरच राग काढत वाघचौरे यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांना माहिती दिली, असे त्या पदाधिकाऱ्यांजवळ म्हणाल्या.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
दुचाकी जाळणाऱ्यावर गोळीबार
बजाजनगरातील दुचाकी जाळणारा व्यक्ती गुन्हे शाखा पोलिसांच्या हातून थोडक्यात निसटला. पकडले जाण्याच्या भीतीने त्याने केलेल्या हल्ल्यात एक पोलिस शिपाई जबर मार लागून जखमी झाला आहे. या हल्लेखोरावर पोलिस उपनिरीक्षक सुभाष खंडागळे यांनी थेट गोळीबार केला. मात्र, अंधराचा फायदा घेऊन तो पसार झाला.
बजाजनगरातील त्रिमूर्ती चौकातील त्रिभूवन हाउसिंग सोसायटीसमोर मंगळवारी (१७ मार्च) रात्री अडीचच्या दरम्यान पोलिस उपनिरीक्षक सुभाष खंडागळे व पोलिस शिपाई नवनाथ परदेशी गस्त घालत होते. त्यांना सोसायटीच्या मध्यभागी असलेल्या ओट्यावर कोणीतरी फिरत असल्याचे आढळून आले. त्यामुळे नवनाथ परदेशी त्याला पाहण्यासाठी गेले, तेव्हा त्याने दगड मारून हल्ला केला. हा दगड डोक्याला लागल्याने परदेशी कोसळले. परदेशी यांच्या मागोमाग येणाऱ्या उपनिरीक्षक खंडागळे यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याने भिंतीवर चढून पळ काढला. खंडागळे यांनी त्याच्या दिशेने गोळीबार केला. आरोपीवर झाडण्यात आलेल्या गोळ्या भिंतीला लागल्या आहेत. भिंतीपलिकडे मोकळे मैदान आहे, अंधाराचा फायदा घेऊन तो पळून गेला. दरम्यान, परदेशी यांना तत्काळ उपचारार्थ हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळल्यानंतर पोलिस निरीक्षक इंदलसिंग बहुरे यांनी घटनास्थळी धाव घेवून सोसायटीच्या नागरिकांसह परिसरात शोध मोहीम राबविली. पंरतु, ती व्यक्ती सापडली नाही.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपायुक्त संदीप घाटुळे, सहायक पोलिस आयुक्त रामराव हके, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश आघाव, सायबर क्राइमचे पोलिस निरीक्षक गौतम पातारे, पोलिस निरीक्षक संजय आहिरे, अजयकुमार पांडे यांनी घटनास्थळी भेट दिली. उपनिरीक्षक सुभाष खंडागळे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक संजय आहिरे करत आहेत.वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे कर्मचारी चित्रपटातील पोलिसांप्रमाणे नेहमी दुचाकी जळाल्यानंतर हजर होतात. यावेळी गुन्हे शाखा पोलिसांमुळे सोसायटीतील पाच दुचाकी बचावल्या.
महिलेचे धाडस; पोलिसांकडून सत्कार
बजाजनगर परिसरातील सिमेन्स कॉलनीतील सरलाबाई अरुण हिवाळे यांना रात्री पाऊणच्या सुमारास पेट्रोलचा वास आला. त्यांनी धाडस करून बाहेर जाऊन पाहिले, तेव्हा एका दुचाकीची पेट्रोलची नळी कापलेली दिसली. त्यांनी संशयिताचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला; मात्र तो पळून गेला. हिवाळे यांनी हा प्रकार गस्तीवरील पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला. त्यांच्या धाडसामुळे गुन्हा टळला होता. याची दखल घेऊन पोलिस उपायुक्त वसंत परदेशी यांनी सरलाबाई हिवाळे यांचा रोख बक्षीस, प्रशंसापत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव केला. आरोपीचा प्रतिकार करणारे उपनिरीक्षक खंडागळे, सहायक फौजदार शेख आरेफ व नवनाथ परदेशी यांचा मासिआ, स्वराज प्रतिष्ठानतर्फे सत्कार करण्यात आला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
युती झाली तर काही वॉर्डात बदल
'महापालिकेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षासोबत युती झाली तर काही वॉर्डांमध्ये बदल होऊ शकतो,' असे संकेत शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल यांनी बुधवारी (१८ मार्च) पत्रकारांशी बोलताना दिले.
महापालिका निवडणूक आणि भाजप बरोबरची युती या बद्दल पत्रकारांशी बोलताना जैस्वाल म्हणाले, 'भाजप बरोबर युती व्हावी ही आमची प्रामाणिक इच्छा आहे. आठवले गट आणि गाडे गटही आमच्या बरोबर येण्यास तयार आहे. त्यांच्याशी देखील शिवसेना चर्चा करणार आहे. युतीच्या संदर्भात भाजप बरोबर एक बैठक झाली आहे. दुसरी बैठक लवकरच होईल. जागा वाटपावरूनच चर्चा होईल, त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल. शिवसेनेने २०१० च्या निवडणूकीत लढवलेले सर्व वॉर्ड आणि भाजपने लढवलेले सर्व वॉर्ड आणि वाढलेले १४ वॉर्ड या बद्दल चर्चा केली जाणार आहे. काही वॉर्डांमध्ये बदल होऊ शकतो, पण संख्या कायम रहावी यासाठी प्रयत्न केला जाईल' असे जैस्वाल यांनी स्पष्ट केले.
युती व्हावी असाच आमचा प्रयत्न आहे. युती झालीच नाही तर स्वबळावर लढण्याची शिवसेनेची तयारी आहे. प्रत्येक वॉर्डातून ५० इच्छुकांची यादी तयार आहे. औरंगाबाद शहरात शिवसेना कधीच कमकुवत नव्हती आणि नाही. काही अपघात घडत असतात आणि त्यातून काही शिकायचे असते. महापालिकेच्या क्षेत्रात शिवसेना मजबूतच आहे.
- प्रदीप जैस्वाल; महानगरप्रमुख, शिवसेना
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
सातारा परिसर महापालिकेच्या बाहेरच
औरंगाबाद महापालिकेच्या हद्दीत सातारा-देवळाई परिसराचा समावेश करण्याची अधिसूचना राज्य शासनाने मागे घेतल्याने सातारा-देवळाई नगरपालिकेचा मार्ग मोकळा झाला आहे. निवडणूक आयोगानेही या निर्णयाची अंमलबजावणी करू नये, असे निर्देश राज्य शासनाला दिल्याचे सरकारच्या वतीने कोर्टाला सांगण्यात आले. यामुळे मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात करण्यात आलेली याचिका निकाली काढण्यात आली.
सातारा जिल्हा परिषद गटातून निवडून आलेले विनायक हिवाळे यांनी ही याचिका केली होती. या याचिकेची सुनावणी न्या. रवींद्र बोर्डे व न्या. व्ही. के. जाधव यांच्यासमोर बुधवारी झाली. सातारा-देवळाईसाठी २८ ऑगस्ट २०१४ रोजी स्वतंत्र नगर पालिका स्थापन करण्यात आली. या पालिकेची निवडणूक होणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारीही सुरू केली आहे. असे असताना सातारा-देवळाईचा संपूर्ण परिसर महापालिकेच्या हद्दीत घेण्याची रणनीती शिवसेनेने आखली होती. हरकती व आक्षेप यावर सुनावणी घेण्यात आली.
सातारा नगरपालिका व औरंगाबाद महापालिका निवडणुकीची तयारी प्रशासनाने सुरू केली. हा सत्ताधाऱ्यांचा राजकीय डाव आहे असा आक्षेप याचिकेत घेण्यात आला होता. ही अधिसूचना कायदेशीर नाही. कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब केला नाही. सातारा - देवळाई हा परिसर महापालिकेत समावेश करण्यासाठी कायद्यात कलम ६ अन्वये असलेल्या तरतुदीचे पालन केले नाही. प्रारूप अधिसूचना काढणे, त्यावर आक्षेप, हरकती सूचनांची सुनावणी घेणे, नगरपालिकेला संपर्क करणे, नगरपालिकेचा ठराव घेणे, सर्वात शेवटी अंतिम अधिसूचना जारी करणे या तरतुदीचा अवलंब शासनाने केला नाही असा युक्तिवाद सिद्धेश्वर ठोंबरे यांनी केला.
नगरविकास खात्याने बुधवारी ११ फेब्रुवारीची अधिसूचना मागे घेत असल्याचे अतिरिक्त सरकारी वकील अर्चना गोंधळेकर यांनी कोर्टाला सांगितले. घटनेच्या कलम २४३ यु आणि नगरपालिका १९६४च्या कलम १४ अन्वये निवडणूक आयोगाने महापालिका निवडणूक होईपर्यंत सातारा परिसराचा महापालिकेत समावेश करू नये असे निर्देश राज्य शासनाला दिल्याचे गोंधळेकर यांनी सांगितले.
नवीन वॉर्ड पुनर्रचनेला आव्हान, आज सुनावणी
औरंगाबाद महपालिकेच्या नवीन वॉर्ड पुनर्रचनेला मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिलेल्या याचिकेवर गुरुवारी सुनावणी होणार आहे. भाजपचे माजी उपमहापौर प्रशांत देसरडा, नगरसेवक समीर राजूरकर, अनिल मकरिये यांनी ही याचिका केली आहे. आरक्षण जाहीर करताना २००५ मधील निवडणूक गृहित धरल्याने राज्य घटनेच्या कलम २४३चा; तसेच मनपा अधिनियमातील तरतुदींचा भंग झालेला आहे, असा आक्षेप याचिकेत घेतला आहे. या याचिकेच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
...घाईघाईत उरकले!
सातारा-देवळाईचा परिसर महापालिकेत समाविष्ट करण्याचा मार्ग ११ फेब्रुवारी रोजी प्रशासकीय स्तरावर झाला होता. यासंदर्भातील प्रारुप अधिसूचनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वाक्षरी केली. त्याच दिवशी अधिसूचना जारी करण्यात आली. ही अधिसूचना घाईने जारी करण्यात केली होती.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
अतिक्रमण काढल्याने पोलिसांचा टेलर रस्त्यावर
जालन्यात नुकताच राबविण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेत एका टेलरचीही दुकान जमिनदोस्त करण्यात आले आहे. या प्रकाराचा टेलर सोबतच पोलिसांनाही मोठा फटका बसला आहे. दुकानाभावी पोलिस वर्दी स्पेशालिस्ट असलेल्या या टेलरचे काम पूर्णपणे ठप्प पडल्याने मराठवाड्यातील हजाराहून अधिक पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची खाकी वर्दी धोक्यात आली आहे.
विजय कदम असे या टेलरचे नाव असून सिंदखेडराजा नाक्यावरील राज्य राखीव पोलिस बल गट क्र. तीनच्या प्रवेशद्वार क्रमांक एकच्यासमोरील रस्त्याच्या कडेला त्यांचे एक छोटेसे दुकान होते. विजय टेलर्स यांच्या ३० वर्षापुर्वीच्या जुन्या दुकानाच्या माध्यमातून कदम कुटूंबीयांनी आजवर हजारो पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांचे गणवेश शिवण्याचे काम केले आहे. पोलिसांच्या रुटीन युनिफॉर्मबरोबरच डांगरी (कमांडो वर्दी), टयूनिंग सूट, अॅंगोला शर्ट, प्रशिक्षणार्थी पोलिसांचे हाफ पॅँट शिवण्यामध्ये कदम कुटूंबीय माहीर आहे. जिल्ह्यातील पोलिस अधिक्षक, राज्य राखीव पोलिस दलाचे समादेशक, पोलिस प्रशिक्षण विदयालयाचे प्राचार्य यांनी अनेकवेळा रोख पारितोषके देऊन कदम यांचा गौरव केलेला आहे. कदम यांची गणवेश शिवण्याची किर्ती फक्त जालना जिल्ह्यापुर्तीच मर्यादित राहिलेली नाही. औरंगाबाद, बुलढाणा, उस्मानाबाद, बीड, मुंबई, पुणे, नाशिक, चंद्रपूर, लातुर, नागपूर व परभणीसह राज्यातील विविध जिल्ह्यातून पोलिस गणवेश शिवण्याची कामे येत असतात. पोलिसांबरोबरच होमगार्ड, एसटी महामंडळ आणि वन विभागातील अधिकारी-कर्मचारी देखील आपला गणवेश शिवण्यासाठी कदम यांनाच पसंती देतात.
आजघडीला देखील कदम यांच्याकडे सुमारे एक हजाराहून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्याच्या गणवेशाचे ऑर्डर आलेले आहेत. ज्यामध्ये सर्वाधिक संख्या पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांचीच आहे. परंतु, अतिक्रमण हटाव मोहिमेत ३० वर्ष जुनी दुकान जमिनदोस्त झाल्याने कदम यांच्या या टेलरिंग व्यावसायावर गदा आली आहे. दुकान नसल्याने कदम यांचा गणवेश शिवण्याचे काम पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे मराठवाड्यातील हजाराहून अधिक पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या खाकी वर्दीचे आता चांगलेच वांदे होणार आहे.
या दुकानावरच माझ्या कुटूंबीयांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. राज्य शासनाने २००२ पूर्वीच्या सर्व झोपडपट्टयांना अभय दिलेले असतानाही पोलिसांच्या जीवावर पालिकेने अतिक्रमणाच्या नावावर ३० वर्ष जुनी दुकान जमिनदोस्त केली आहेत. सध्या अनेकांचे इन्स्पेक्शन व इतर कार्यक्रम असल्याने पोलिस ग्राहकांनी त्यांच्या वर्दीसाठी तगादा लावला आहे.
- विजय कदम, टेलर जालना
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट