म. टा. प्रतिनिधी, बीड
बीडसह मराठवाड्यामध्ये सातत्याने दुष्काळाचे सावट असून, त्यातून पाणीटंचाईमुळे शेतकरीही हैराण झाले आहेत. पिकांना जगविण्यासाठी पाण्याची तजवीज करण्याच्या प्रयत्नात बोअर घेण्याच्या प्रयत्नांमध्ये वाढ झाली आहे. भूजल पातळीचा अंदाज नसल्यामुळे घेण्यात येणाऱ्या बोअरमुळे जमिनीची चाळण होतानाच, पाण्याअभावी शेतकऱ्यांच्या पदरात निराशाच येत आहे.
मराठवाड्यातील दुष्काळ असतानाच, त्याचा सर्वाधिक फटका बीड जिल्ह्याला बसला आहे. सद्यस्थितीला बीड जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्पांमध्ये अजिबात पाणी नाही. मांजरा, माजलगाव यांसारख्या मोठ्या प्रकल्पांमधील उपयुक्त पाणीसाठा संपला आहे, बिंदुसरा प्रकल्पामध्ये अत्यल्प पाणी आहे. तसेच, जिल्ह्यातील १४०पैकी अनेक तलाव कोरडे पडले आहेत. सातत्याने पडणाऱ्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांसमोरही शेतीतून किमान उत्पन्न मिळविण्याचे आव्हान आहे. यातूनच शेतकऱ्यांकडून भूजल शोधण्याचा पर्याय निवडण्यात येत आहे आणि बोअर घेण्यासाठी धडपड सुरू असताना दिसते. जिल्ह्यामध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये बोअर घेण्याच्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली असून, भूजलाची पातळीही सातत्याने खालावत आहे. त्यामुळे कोरडे पडणाऱ्या बोअरची संख्याही लक्षणीय प्रमाणात वाढत आहे.
दहा वर्षांत ४८ बोअर
जिल्ह्यातील आष्टी-पाटोदा तालुक्याल दुष्काळाचे सर्वाधिक चटके बसत असून, एका शेतकऱ्याने दहा वर्षांमध्ये ४८ बोअर घेतल्याचे समोर आले आहे. या शेतकऱ्याची १८ एकर शेती आहे. दहा एकरांवर डाळिंब, तर तीन एकरांवर द्राक्षाच्या बागा आहेत. सिंचनाची सोय नाही आणि दहा परस विहीरही कोरडी पडल्यामुळे त्यांनी २००५मध्ये पहिला बोअर घेतला. त्याला पुरेसे पाणी लागले नाही, म्हणून दुसरा-तिसरा अशी मालिकाच सुरू झाली. या शेतकऱ्याने दरवर्षी चार ते पाच या गतीने दहा वर्षांमध्ये तब्बल ४८ बोअर घेतले आहेत. त्यांनी जानेवारी २०१५मध्ये शेवटचा बोअर घेतला. यातील सर्वांत कमी खोलीपर्यंत गेलेला बोअर ५०० फुटांचा असून, सर्वांत जास्त म्हणजे १०३० फूट खोल जाऊनही बोअरला पाणी लागलेले नाही. इतक्या प्रयत्नांनंतरही त्यांच्या शेतीसाठी पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याचे त्याने सांगितले.
संवर्धनानंतरच भूजल मिळेल
जमिनीखाली भूजल मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे, हा गैरसमज आहे. भूस्तराच्या रचनेतून जमिनीमध्ये जिरणारे पाणी भूजलाच्या स्वरूपामध्ये उपलब्ध होत असते. त्यामुळे अधिकाधिक पाणी जमिनीमध्ये जिरवत, भूजलाचे संवर्धन केल्यानंतरच भूजल उपलब्ध होणार आहे. त्यामुळे अधिकाधिक खोल जाणारे बोअर घेण्यापेक्षा भूजल संवर्धनासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे आवाहन भूजलतज्ज्ञांनी केले आहे. तसेच, बोअर घेण्याआधी आपल्या जमिनीखालील भूस्तराचा अंदाज घ्यावा आणि त्यानंतरच किती खोलवर बोअर घ्यायचा, हा निर्णय घ्यावा, याकडेही लक्ष वेधण्यात येत आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट