Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

परीक्षार्थींना हेतूपुस्सर त्रास देण्याचा प्रकार

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाडा अध्यापक कॉलेज परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षक, भरारी पथकाकडून परीक्षार्थींना हेतूपुस्सर त्रास दिला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात जयप्रकाश नारायण अध्यापक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कुलगुरूंकडे निवेदनाद्वारे तक्रार दिली आहे. दरम्यान, मराठवाडा अध्यापक कॉलजच्या प्राचार्यांनी मात्र या प्रकरणाशी कॉलेजचा संबंध नसल्याचे म्हटले आहे.

विद्यापीठातर्फे बी.एड अभ्यासक्रमाची परीक्षा घेतली जात आहे. यात मराठवाडा बी.एड. कॉलेज परीक्षा केंद्र आहे. या केंद्रावर हेतूपुस्सर त्रास दिल्याची तक्रार जयप्रकाश नारायण बी. एड. कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी केली आहे. शुक्रवारी परीक्षा केंद्रावर सकाळी ९ वाजून १० मिनिटांनी भरारी पथकाने हॉलतिकीट बघून सात विद्यार्थ्यांचे पेपर काढून घेतले. इतरांचेही पेपर घेण्यात आले होते, परंतु त्यांना पेपर लगेचच परत देण्यात आले. सात विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. जबरदस्तीने हमीपत्र लिहून घेण्यात आल्याचेही विद्यार्थ्यांनी सांगितले. तेरा कॉलेजचे विद्यार्थी परीक्षा केंद्रावर असताना, जयप्रकाश नारायण अध्यापक कॉलेजच्याच विद्यार्थ्यांना त्रास का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. हेतूपुरस्कर त्रास देण्यात येत असल्यामुळे इतर केंद्रावर परीक्षा घेण्यात यावी, भरारी पथकाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

कॉलेजांचा वाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातंर्गत असलेल्या कॉलेजांमधील वादाचा फटका विद्यार्थ्यांना बसत असल्याची चर्चा आहे. पंधरा दिवसापूर्वी मराठवाडा अध्यापक कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी व्हायवा झाला नसल्याने विद्यापीठात धाव घेतली होती. यानंतर आता हा प्रकार समोर आला आहे. यामुळे असे प्रकार म्हणजे विद्याशाखेतील अंतर्गत राजकारणाचा हा परिणाम असल्याचेही बोलले जाते आहेत.

विद्यार्थ्यांना हेतूपुस्सर त्रास दिला जात आहे. तेरा कॉलेजांमधील विद्यार्थी केंद्रावर असताना आमच्याच कॉलेजच्या विद्यार्थ्यांवर कारवाई का? याबाबत आमच्या विद्यार्थ्यांनी कुलगुरूंकडे तक्रार केली आहे.

- डॉ. राजीव सातव, प्राचार्य, जयप्रकाश नारायण कॉलेज.

भरारी पथक हे विद्यापीठाकडून नेमले जात असते. या भरारी पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत कॉलेज हस्तक्षेप करू शकत नाही. त्यामुळे या प्रकरणाशी आमच्या कॉलेजचा संबंध जोडणे चुकीचे आहे.

- डॉ. सोहल अहमद खान, प्राचार्य, मराठवाडा अध्यापक महाविद्यालय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पालिका कारभाराचे वाभाडे निघाले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

समांतर जलवाहिनी, प्रचंड खड्डे असलेले रस्ते, बीओटीवरील जागा, मोकळ्या जागा हडपणे, शहर बस वाहतुकीचा बोजवारा, विविध योजनांत झालेले गैरप्रकार अशा विविध मुद्यांना हात घालत विरोधी पक्षातील सदस्यांनी शुक्रवारी (१० एप्रिल) विधानपरिषदेत सरकारला धारेवर धरले. महापालिकेच्या ढिसाळ कारभाराचे वाभाडे काढले.

विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी औरंगाबादसह नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोबिंवली या महापालिका क्षेत्रांमध्ये विविध नागरी समस्यांसंदर्भात २५९ अंतिम आठवडा प्रस्ताव सादर केला होता. या चर्चेत आमदार अमरसिंह पंडित, आमदार सतीश चव्हाण यांनी सहभाग घेत औरंगाबाद महापालिकेत विविध कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली. पंडित म्हणाले, 'तीनशे कोटींची समांतर जलवाहिनी योजना आज १,२०० कोटींची झाली आहे. २००६ पासून या योजनेवर काम सुरू आहे. मात्र, अद्यापही ही योजना पूर्ण झाली नाही. लोकांना पाणी देण्यापेक्षा या कामाचे कंत्राट कोणाला द्यायचे, त्यात किती वाटा मिळवायचा, इतकीच काळजी महापालिकेची सत्ता उपभोगणाऱ्यांनी घेतली आहे. या समांतर जलवाहिनीच्या योजनेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे,' असे पंडित यांनी चर्चेत सांगितले.

'बीओटी व मोकळ्या जागा विकसित करण्याच्या नावाखाली बळकावून त्यातून कोट्यवधी रुपयांची मालमत्ता गिळंकृत करण्याचे काम महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी केले आहे. शहरबस वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. शहरात प्रचंड खड्डे असलेले रस्ते, दुरुस्तीच्या नावाखाली रस्त्यात अडथळे, अस्वच्छता, प्रचंड प्रदूषण, अतिक्रमणे असे शहराचे भयावह चित्र पाहण्यास मिळत आहे,' असे चित्र मांडत आमदार पंडित यांनी सरकारला धारेवर धरले.

चौकशीची मागणी

मेट्रो सिटीची स्वप्ने दाखवून महापालिकेची सत्ता उपभोगणाऱ्यांना चांगल्या पायाभूत सुविधा देखील देता आलेल्या नाहीत. महापालिकेत मोठा भ्रष्टाचार झाला आहे. या भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी आमदार अमरसिंह पंडित यांनी विधानपरिषदेत केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलसंपदा कार्यालयात जप्ती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

संपादित केलेल्या जमिनीचा मावेजा देण्यास टाळाटाळ केल्याने जलसंपदा ‌कार्यालयातील फर्निचर कोर्टाच्या आदेशाने शुक्रवारी (१० एप्रिल) जप्त करण्यात आले. दुसरे अतिरिक्त दिवाणी न्यायाधीश बी. पी. क्षीरसागर यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली. जलसंपदा विभागाच्या वतीने मुक्ताबाई घुले या महिलेची जमिन संपादित करण्यात आली होती. या जमिनीचा ८ लाख १ हजार ४८५ रुपयांचा मावेजा देण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. मात्र, या आदेशाची जलसंपदा विभागाकडून पायमल्ली करण्यात आली. या प्रकरणी जलसंपदा ‌कार्यालयातील फर्निचर जप्त करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार शुक्रवारी जलसंपदा कार्यालयातील संगणक, खुर्च्या आदी साहित्य जप्त करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेत बंडखोरी; शिवाजीनगरात चुरस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिवाजीनगर वॉर्डाची लढत एकतर्फी होण्याची शक्यता अखेर फोल ठरली. विद्यमान नगरसेवक साईनाथ वेताळ यांनी माघार घेतली; मात्र माजी नगरसेवक विनोद सोनवणे यांनी उमेदवारी कायम ठेवली आहे. या परिस्थितीत राजेंद्र जंजाळ (शिवसेना), विनोद सोनवणे (अपक्ष) आणि सीताराम कदम (राष्ट्रवादी काँग्रेस) अशी तिरंगी लढत रंगणार आहे.

शिवसेनेच्या बंडखोर उमेदवारांमुळे शिवाजीनगर वॉर्डाची लढत चुरशीची ठरणार आहे. शिवसेनेचे अधिकृत उमेदवार राजेंद्र जंजाळ यांच्यासाठी माजी नगरसेवक साईनाथ वेताळ यांनी माघार घेतली. वॉर्डातील १८ उमेदवारांपैकी आठ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. आता दहा उमेदवारात निवडणूक रंगणार आहे. यात जंजाळ, विनोद सोनवणे आणि कदम तुल्यबळ उमेदवार मानले जात आहेत. वॉर्डाच्या नव्या रचनेनंतर होणारी पहिली निवडणूक चर्चेचा विषय ठरली आहे. सेना नेत्यांच्या मध्यस्थीनंतर काही बंडखोरांनी माघार घेतली; मात्र बंडखोर उमेदवार सोनवणे यांनी उमेदवारी कायम ठेवल्यामुळे जंजाळ आणि सोनवणे यांची लढत उत्कंठावर्धक ठरणार आहे.

'नोटा'साठी स्वतंत्र यंत्र

शिवाजीनगर-भारतनगर (११३) वॉर्डात सोळा उमेदवार रिंगणात आहेत. मतदान यंत्रावर १६ उमेदवारांची नावे टाकणे शक्य असते; मात्र या वॉर्डात 'नोटा'साठी स्वतंत्र मतदान यंत्र उपलब्ध करावे लागणार आहे. इतर वॉर्डात कमी उमेदवार असल्यामुळे एकाच यंत्राची आवश्यकता आहे. आता शिवाजीनगर-भारतनगर वॉर्डात केवळ 'नोटा'साठी स्वतंत्र यंत्र ठेवावे लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणुकीतून अशोक चव्हाणांची माघार?

$
0
0

औरंगाबाद : पालिका निवडणुकीत काँग्रेसला पुनरूज्जीवीत करण्याची संधी होती. मात्र, उमेदवार निवडीपासून प्रचारप्रक्रियेच्या नियोजनापर्यंत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पाठ फिरवली आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर चव्हाण एकदाच औरंगाबादला आले. उमेदवारांच्या मुलाखती, निवडप्रक्रिया राबविण्यासाठी सचिन सावंत, विश्वजित कदम, नसीम खान यांच्यावर जबाबदारी टाकली. पार्लमेंटरी बोर्डाची मुंबईत बैठक झाली. तीत विधानसभेतील विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आघाडीसाठी संमती दर्शविली होती. पण स्थानिक नेत्यांनी, मुंबईच्या पुढाऱ्यांना हाताशी धरून अनेक वॉर्डात अक्षरशः तिकिटे वाटली. या कुठल्याही प्रक्रियेत अशोक चव्हाणांनी लक्ष न घातल्याने निष्ठावंतांमध्ये नाराजी पसरली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपात्र १४ उमेदवारांच्या याचिका फेटाळल्या

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी,औरंगाबाद

औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज अवैध ठरलेल्या १४ उमेदवारांच्या याचिका मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. सुनील पी. देशमुख यांनी फेटाळल्या. संजय गाडेकर वॉर्ड क्रमांक ९४, नीता भालेराव वॉर्ड ३७, शेख सुलताना कय्युम ५८, दीपाली करोडे ८१, कैलास राऊत ८८, बाळासाहेब पुंडे ८८, प्रकाश नाडे ११३, छाया म्हस्के ९०, शीला मगरे ७४, प्रकाश प्रधान १४, भारत दाभाडे ८७, नितीन गायकवाड, कविता देशमुख ९१, अवतारसिंग रंधवा १४या चौदा उमेदवारांचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळले. या निर्णयाला औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते. उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या शपथपत्रावर सही केलेली नाही. शपथपत्राची नक्कल जोडली. गुन्हे विषयक रकान्यात निरंक लिहिले नाही. सूचक, अनुमोदकाची सही नाही अशा विविध कारणांमुळे या उमेदवारांचे अर्ज फेटाळण्यात आले. हे उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची विनंती याचिकाकर्त्याच्या वकिलांनी केली. ही विनंती कोर्टाने फेटाळली.

विचारलेल्या आवश्यक बाबी शपथपत्रात रिकामी ठेवता येत नाही. त्यावर आवश्यक नाही, निरंक असे लिहिणे बंधनकारक आहे असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. स्वाक्षरी नसेल त्या कागदपत्राला शपथपत्र म्हणता येत नाही. शपथपत्रात असलेली अपूर्ण माहिती ही सुद्धा उमेदवारी अर्ज फेटाळण्याचे प्रमुख कारण आहे, असा युक्तिवाद निवडणूक आयोगाचे वकील एस. टी. शेळके यांनी केला. हा युक्तिवाद कोर्टाने मान्य केला. याचिकाकर्त्यांची बाजू देवदत्त पालोदकर, रवींद्र गोरे , एन. के. चौधरी, अभय राठोड, पी. बी. पाटील, गौतम कर्ने यांनी मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेने दाबला निवडणुकीचा निधी!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिका निवडणुकांसाठी प्रशासन तब्बल चार कोटी रुपये खर्च करत असले तरी, निवडणूक निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी आहोरात्र काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अन्न-पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. एन ११ येथील ताठे सभागृह या निवडणूक कार्यालयातील कर्मचाऱ्यांना पदरमोड करून चहा व जेवणाचा खर्च भागवावा लागत अाहे. त्यामुळे निवडणुकीसाठी असलेला निधी गेला कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सिडको-हडको भागातील १२ वार्डांसाठी एन ११ येथील ताठे सभागृहामध्ये निवडणूक कार्यालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. अपुरा कर्मचारीवर्ग, अपुरे साहित्य, जेवण व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे येथे या केंद्रातील कर्मचारी त्रस्त झाले आहेत.

ताठे सभागृहामध्ये गेल्या दहा-बारा दिवसांपासून निवडणुकीचे कार्यालय थाटले आहे. तेथे २२ कर्मचारी आहेत. यातील १२ कर्मचारी निवडणूक निर्णय अधिकारी अंजली धानोरकर यांनी त्यांच्या अधिकारात मागविले आहेत. या केंद्रावर महापालिकेने केवळ दोन कंम्प्युटर व एका प्रिंटरची व्यवस्था केली आहे. महापालिकेला सायंकाळी पाचपर्यंत शपथपत्र; तसेच विविध अहवाल पाठवावे लागतात. त्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दोन अन्य कंम्प्युटरची व्यवस्था करावी लागली.

खर्च जातो कुठे?

भत्ता, साहित्य, जेवणाचा; तसेच इतर खर्चासाठी नाक मुरडणाऱ्या महापालिकेचा निवडणुकीसाठीचा खर्च जातो कुठे, असा प्रश्न पडला आहे. राज्य निवडणुक आयोगाने निश्चित केलेल्या निकषांनुसार सर्व व्यवस्था केली आहे काय, असा प्रश्नही उपस्थित होतो.

अधिकाऱ्यांनी नाकारले जेवण

कार्यालय सुरू केल्यापासून महापालिकेने केवळ पाच ते सहा अधिकाऱ्यांसाठी जेवणाची व्यवस्था केली, मात्र इतर कर्मचाऱ्यांच्या जेवणाची कोणतही व्यवस्था केलेली नाही. हे कर्मचारी आपापल्या घरून जेवणाचे डबे घेऊन येत असल्याने अधिकाऱ्यांनीही महापालिकेचे जेवण घेणे नाकारले. कर्मचारी सकाळी डबा घेऊन येतात, मात्र जेवणाची वेळ निश्चित नसल्यामुळे दुपारपर्यंत डब्यातील अन्न खराब होते. यामुळे कर्मचाऱ्यांना उपाशीपोटी राहावे लागले. काही वेळा वर्गणी करून जेवण, चहापानाची व्यवस्था करण्यात आली. १२ दिवसांपासून सुरु केलेल्या या कार्यालयात आतापर्यंत पाण्याचे केवळ चार जार पुरविण्यात आले आहेत. अधिकारी, कर्मचारी पाणीही घरूनच सोबत आणत आहेत.

निवडणुकीच्या कामाला असलेले सर्व कर्मचारी सकाळी आठपासून रात्री उशिरापर्यंत कामे करतात, मात्र त्यांच्या साध्या जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली नाही. या अव्यवस्थेबद्दल मला खेद आहे. निवडणूक कार्यालयात पाणी, कंम्प्युटर, साहित्य यासंदर्भात महापालिकेच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी कळविण्यात आले, मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. या अव्यवस्थेसंदर्भात निवडणूक निरीक्षकांकडे तक्रार केली आहे.

- अंजली धानोरकर, निवडणूक निर्णय अधिकारी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपायुक्त, प्रकल्प अधिकाऱ्याला अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेत शासनातर्फे राबवण्यात येत असलेल्या सुवर्णजयंती रोजगार योजनेत अपहार झाल्याची तक्रार आयुक्त प्रकाश महाजन यांनी दिल्यानंतर शुक्रवारी दुपारी सिटी चौक पोलिसांनी उपायुक्त डॉ. आशिष पवार व प्रकल्प अधिकारी प्रमोद खोब्रागडे यांना अटक केली. कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये उपलब्ध नसलेल्या ट्रेडसाठी लाभार्थी देऊन त्यांच्या नावचे १ कोटी ७० लाख ८८४ रुपये उचलण्याचा प्रयत्न असल्याचे लक्षात आल्याने आयुक्तांनी पोलिसात तक्रार दिली होती.

महापालिकेच्या प्रकल्प विभागांमार्फत सुवर्णजयंती रोजगार योजना राबविली जाते. या योजनेतून सुशिक्षित बेरोजगारांना कौशल्य प्रशिक्षण दिले जाते. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात २१८४ बेरोजगारांना कौशल्य प्रशिक्षण देण्याचे टार्गेट प्रकल्प विभागाला देण्यात आले होते. त्यापैकी ११४५ लाभार्थींची यादी प्रकल्प विभागातर्फे तयार करण्यात आली. ही यादी कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटला देण्यात आली. फॅशन डिझाइन, प्लंबर आणि हेअर ड्रेसर या तीन ट्रेडसाठी ही यादी देण्यात आली होती. त्यांचे शु्ल्क म्हणून १ कोटी ७० लाख ८८४ रुपयांचे बिल तयार करण्यात आले आणि फाइल मंजुरीसाठी उपायुक्त आशिष पवार आणि प्रकल्प अधिकारी प्रमोद खोब्रागडे यांनी सादर केली. संबंधित ट्रेड कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये नाहीत, असे आयुक्त प्रकाश महाजन यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी अस्थापना अधिकारी अय्युब खान यांच्या माध्यमातून गुरुवारी रात्री सिटी चौक पोलिस ठाण्यात डॉ. पवार आणि खोब्रागडे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दोनपेक्षा जास्त अपत्ये; उमेदवारी रद्द करा

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

कैसर कॉलनी (४५) वॉर्डातील 'एमआयएम'चे उमेदवार शाहेदा खातून शहानवाझ खान यांना दोनपेक्षा जास्त अपत्ये असल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करावा, अशी विनंती करणाऱ्या याचिकेत निवडणूक अधिकारी नारायण उबाळे, महापालिका व शाहेदा खातून यांना नोटीस बजावण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. सुनील पी. देशमुख यांनी दिले आहेत.

कैसर कॉलनीतून 'एमआयएम'च्या उमेदवार शाहेदा खातून यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या अर्जाला याचिकाकर्ते खातिजा कुरेशी छोटू कुरेशी यांनी आक्षेप घेतला. शाहेदा खातून यांना १३ सप्टेंबर २००० नंतर दोन पेक्षा जास्त अपत्य आहेत. त्याआधी त्यांना २ अपत्ये होती. आक्षेप घेतांना पुरावे जोडण्यात आली, पण निवडणूक निर्णय अधिकारी उबाळे यांनी शाहेदा खातून यांची उमेदवारी अर्ज वैध ठरविला. या निर्णयाला खातिजा यांनी औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले. कायद्यानुसार १३ सप्टेंबर २००० नंतर दोन पेक्षा जास्त अपत्य असलेल्या उमेदवारांना निवडणूक लढविता येत नाही. तरीही शाहेदा खातून यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. शाहेदा यांना अफामखान व झैद खान ही दोन मुले अनुक्रमे १६ मे २००४ व १ ऑक्टोबर २००७ रोजी जन्मले. याचा पुरावा म्हणून या दोन मुलांची शालेय कागदपत्रे याचिकेसोबत जोडली आहेत. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या खातून यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात यावा, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. प्रतिवादी निवडणूक अधिकारी, शाहेदा खातून व महापालिका यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैठणला कैद्यांचे उपोषण!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

चौदा वर्षांची शिक्षा पूर्ण केलेल्या कैद्यांची तुरुंगातून सुटका करावी या मागणीसाठी पैठण येथील खुल्या कारागृहातील सर्व कैद्यांनी शुक्रवारपासून (१० एप्रिल) उपोषणाला सुरुवात केली आहे. या कारागृहातील २१ कैदी शिक्षा समाप्तीनंतर सुटकेच्या आदेशाची वाट पाहत आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या एका आदेशानंतर ९ जुलै २०१४ नंतर सुटका होणाऱ्या कैद्याच्या सुटकेला स्थगिती देण्यात आली आहे. परिणामी, शिक्षा समाप्तीनंतर अनेक कैदी आपल्या सुटकेची वाट पाहत आहे. सध्या पैठण येथील खुल्या जिल्हा कारागृहात जवळपास ४१४ कैदी आपल्या शिक्षेच्या शेवटच्या वर्षात आहेत. कारागृहातील २१ कैद्यांनी चौदा वर्षाची शिक्षा पूर्ण केलेली आहे. दहा महिने उलटूनही त्यांची सुटका झालेली नाही.

शिक्षा पूर्ण झाल्यानंतरही सुटका न झालेल्या कैद्यांच्या सुटकेसाठी येथील जवळपास सर्वच कैद्यांनी शुक्रवारी उपोषणाला सुरुवात केली आहे. शिक्षा पूर्ण झाल्यानंतर दहा महिने उलटूनही त्यांची सुटका न झाल्याने भविष्यात स्वतःवरही हीच पाळी येऊ नये यासाठी उपोषण करीत असल्याचे कैद्यांनी सांगितले. या २१ कैद्यांची त्वरित सुटका करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

उपोषण करणाऱ्या कैद्यांसोबत चर्चा केली आहे. न्यायप्रविष्ट प्रकरणामुळे कैद्यांची सुटका झालेली नाही. शासन याबद्दल लवकरच निर्णय करणार असल्याचे त्यांना सांगितले. उपोषण सोडण्याची विनंती केली आहे.

- राजकुमार साळी, कारागृह अधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एम.ए.ला जुन्या प्रश्नपत्रिका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विद्यापीठाच्या परीक्षेत रोज एक नवीन गोंधळाचा प्रकार घडतो आहे. शुक्रवारी (१० एप्रिल) एम. ए. इंग्रजीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना जुन्या अभ्यासक्रमांचा पेपर देण्यात आला. त्यामुळे विद्यार्थी भांबावले. त्यांनी ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने नवीन अभ्यासक्रमाचा पेपर पाठवून दिला. मात्र, यात विद्यार्थ्यांना तासभर ताटकळावे लागले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षेत प्रशासनाच्या गोंधळाची मालिका सुरूच आहे. बी. कॉम. अभ्याक्रमाची प्रश्नपत्रिका परीक्षेच्या एक दिवस आधी विद्यार्थ्यांकडे होती. यानंतर विद्यापीठाला प्रश्नपत्रिका बदलून परीक्षा घेण्याची वेळ आली. हा प्रकार गुरुवारी होत नाही तोच शुक्रवारी डॉ. रफीक झकेरिया कला, वाणिज्य व विज्ञान महिला कॉलेजमध्ये गोंधळ झाला. एम. ए. बहिस्थ विद्यार्थ्यांसाठी परीक्षा केंद्र असलेल्या या केंद्रावर इंग्रजी प्रथम वर्षाचा 'इंग्लिश लिटरेचर'‌चा पेपर सकाळी ९ ते ११च्या दरम्यान होता. यावेळी विद्यार्थ्यांना जुन्याच अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका देण्यात आली. परीक्षार्थींनी तात्काळ ही बाब केंद्रप्रमुखांना सांगितली. यानंतर परीक्षा विभागाला कळविण्यात आले. परीक्षा विभागाने नवीन अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिका पाठवून दिल्या. तोपर्यंत विद्यार्थ्यांनी केंद्राबाहेर येत विद्यापीठ प्रशासनाचा निषेध केला. विद्यार्थ्यांचा रोष पाहता पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी विद्यार्थ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला, परंतु विद्यार्थ्यांनी परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी करत पेपर दिला नाही. दुपारी आमचा पेपर असल्याने वेळ वाढवून दिला तरी आम्ही पेपर देणार नाही. अशी भूमिका काही विद्यार्थ्यांनी घेतली. यातल्या काही विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. आता हा पेपर परत घेण्याची मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे. या पेपरला परीक्षा केंद्रावर १२० ‌पेक्षा अधिक विद्यार्थी होते.

कुलगुरू दौऱ्यात मग्न

विद्यापीठात परीक्षा सुरू आहेत, तर कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे हे दौऱ्यावर गेले आहेत. परीक्षेतील गैरप्रकारांबाबत विद्यापीठ प्रशासनाकडे विद्यार्थ्यांनी तक्रार केली, पण असे प्रकार घडले नाहीत, असा दावा करण्यात येत आहे. कुलगुरूच जागेवर नसल्यामुळे दाद मागणार कुणाकडे, असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उमेदवारी मागे घेण्यासाठी डावपेच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अधिकृत उमेदवारांच्या विरोधात उभे असलेल्या उमेदवारांची मनधरणी करून त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी राजकीय पक्षांनी विविध डावपेच आखले होते. हात जोडण्यापासून हात उगारण्यापर्यंत सर्व प्रकारचे प्रयत्न करण्यात आले. त्याचे सूत्रधार असलेले दिग्गज नेते पडद्यामागून हालचाली करीत होते.

गांधीनगर - खोकडपुरा वॉर्ड क्रमांक ५४ सर्वात जास्त म्हणजे ३२ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी १५ जणांनी अर्ज मागे घेतले. आता या वॉर्डातून निवडणूक रिंगणात १७ उमेदवार शिल्लक राहिले आहेत. एका 'ईव्हीएम'वर पंधरा उमेदवारांची नावे घेता येतात. या वॉर्डात १७ उमेदवार राहिल्यामुळे प्रशासनाला दोन जास्तीच्या उमेदवारासाठी एक जास्तीची 'ई्व्हीएम' लावावी लागणार आहे. या वॉर्डातून भाजपतर्फे उमेदवारी मिळालेले रामेश्वर भादवे यांनी स्वतःला पूरक ठरतील अशा सुमारे आठ जणांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाग पाडले. नम्रपणे बोलून आणि हातजोडून त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावले. ते स्वतः यासाठी धावपळ करताना दिसून येत होते. अजबनगर - खोकडपुरा वॉर्डातून १४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ११ उमेदवार रिंगणात शिल्लक राहिले आहेत. या वॉर्डातून शिवसेनेने आशा भालेकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात कमीत कमी उमेदवार असावेत यासाठी राजेंद्र दानवे यांनी फिल्डिंग लावली होती. आठ ते दहा उमेदवारांना त्यांनी एकत्र जमा केले होते. सर्वांना एकत्र निवडणूक कार्यालयात आणून त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी सांगण्याचे नियोजन करण्यात आले होते. यासाठी दानवे आणि त्यांचे कार्यकर्ते धावपळ करीत होते, पण त्यांना त्यात यश आले नाही. फक्त तीन जणांनीच उमेदवारी अर्ज मागे घेतले.

समर्थनगर वॉर्डातून खासदार चंद्रकांत खैरे यांचे पुत्र ऋषिकेश खैरे निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यासह एकूण १५ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी जास्तीतजास्त उमेदवारांनी माघार घ्यावी यासाठी खैरे यांच्या गोटातून टोकाचे प्रयत्न करण्यात आले. खैरे यांच्या कार्यालयातील काही कर्मचारी आणि युवा सेनेचे पदाधिकारी या कामाला जुंपले होते, पण या वॉर्डातून संकेत प्रधान या एकमेव उमेदवाराने माघार घेतली.

क्रांतिचौक वॉर्डातून तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. शिवसेनेच्या शिल्पाराणी वाडकर यांनी या वॉर्डातून अधिकृतपणे अर्ज भरला होता, त्यांच्या विरोधात शिवसेनेच्या नगरसेविका सुनीता सोनवणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची जबाबदारी राजेंद्र दानवे यांच्यावर पक्षाने टाकली होती. दुपारी अडीचच्या सुमारास सुनीता सोनवणे यांना सोबत घेऊन दानवे निवडणूक कार्यालयात आले व त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाग पाडले. रोहिणी महाजन या काँग्रेस पुरस्कृत उमेदवारानेही अर्ज मागे घ्यावा यासाठी शिवसेनेतर्फे प्रयत्न सुरू होते, पण शेवटपर्यंत महाजन किंवा त्यांच्या सूचक - अनुमोदकांची शिवसेना कार्यकर्त्यांची भेट होऊ शकली नाही. समतानगर - कोटलाकॉलनी वॉर्डातून भाजपचे प्रदेश चिटणीस व माजी महापौर डॉ. भागवत कराड यांच्या पत्नी डॉ. अंजली कराड यांना भाजपने उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात डॉ. कराड यांचे कट्टर समर्थक कचरू घोडके यांनी पत्नी राधा घोडके यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी मागे घेणार नाही, अशी टोकाची भूमिका घोडके यांनी घेतली होती. स्वतः डॉ. कराड यांनी घोडके यांची मनधरणी केली, त्यानंतर डॉ. अंजली कराड घोडके यांना घेऊन निवडणूक कार्यालयात आल्या आणि त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यात भाग पाडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युती कागदावरच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना, भारतीय जनता पक्षाने केलेली युती कागदावरच राहिल्याचे चित्र शुक्रवारी स्पष्ट झाले. नेत्यांच्या आशीर्वादाने अनेक छुपे उमेदवार निवडणूक रिंगणात अपक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन उतरले आहेत. काही वॉर्डांमधून शिवसेना - भाजप आमनेसामने असून, काही ठिकाणी स्वकीयांनीच बंडाचे निशाण फडकावून निवडणुकीत रंगत आणली आहे. एकुण ११३ वॉर्डांमधून ५२६ उमेदवारांनी माघार घेतली. ९२० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात अाहेत.

आश्वासनांची खैरात, पुढची पदे, श्रेष्ठींना सांगून राजकीय पुनर्वसनाचा शब्द घेत अनेकांनी निवडणुकीतून माघार घेतली, पण अनेक महत्त्वाच्या वॉर्डांमधून बंडखोरी झाल्याने युतीचे संकट वाढले आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या गुलमंडीतून शिवसेनेचे सचिन खैरे यांच्याविरोधात शिवसेना बंडखोर राजेश (पप्पू) व्यास आणि भाजपचे माजी आमदार किशनचंद तनवाणी यांचे बंधू राजू तनवाणी यांनी उमेदवारी कायम ठेवली आहे. पद्मपुरा वॉर्डातून शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक गजानन बारवाल यांनी बंडखोरी करत पक्षासमोर आव्हान उभे केले आहे. उल्कानगरीतून भाजपच्या दिलीप थोरात यांना शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक सुशील खेडकर, महापौर कला ओझा यांच्यासमोर भाजपच्या संगीता रत्नपारखी यांनी आव्हान उभे केले आहे. शिवाजीनगरमधून शिवसेनेच्या राजेंद्र जंजाळ यांच्याविरोधात शिवसेनेचे विनोद सोनवणे, भारतनगरमधून शिवसेनेचे दिग्विजय शेरखाने यांच्याविरुद्ध भाजप बंडखोर जालिंदर शेंडगे रिंगणात आहेत. सुराणानगरातून भाजपच्या राखी देसरडा यांच्याविरुद्ध शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रफुल्ल मालानी यांच्या पत्नी किरण मालानी यांनी बंडखोरी केली आहे. विद्यानगरातून शिवसेनेच्या रेणुकादास वैद्य यांच्यासमोर भाजप बंडखोर मंगलमूर्ती शास्त्री, सिडको एन -तीनमधून भाजप बंडखोर संगीता शिरसे तर पुंडलिकनगर वॉर्डातून शिवसेनेच्या उमेदवारासमोर भाजप बंडखोर सरला दामले यांनी आव्हान उभे केले आहे.

भडकलगेटमधून भाजपचे विनोद जाधव यांच्यासमोर रिपाइंचे प्रशांत शेगावकर यांनी, अाविष्कार कॉलनीतून शिवसेनेच्या सोपान बांगर यांच्यासमोर भाजपचे मयूर वंजारी, संभाजी कॉलनीतून शिवसेनेच्या शीतल गादगे यांच्यासमोर शिवसेनेच्या माजी महापौर विमल राजपूत, एमआयडीसी चिकलठाणा वॉर्डातून भाजपच्या राजू शिंदे यांच्याविरोधात भाजपचे आमदार नारायण कुचे यांचे बंधू किशोर कुचे, गणेशनगर वॉर्डातून शिवसेनेच्या मकरंद कुलकर्णी यांच्याविरोधात शिवसेनेच्या विद्यमान नगरसेवक प्राजक्ता भाले यांचे पती मंगेश यांनी आव्हान उभे केले आहे. पवननगरमधून भाजपच्या नितीन चित्ते यांच्याविरोधात शिवसेना बंडखोर नारायण आघाव, भाजप बंडखोर सतीश जाधव, मयूरनगरमधून शिवसेनेच्या वंदना इधाटे यांच्यासमोर शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक किशोर नागरे यांच्या पत्नी स्वाती व भाजप बंडखोर संगीता ताठे यांचे आव्हान असणार आहे.

चर्चा करून निर्णय

बंडखोरांवर कारवाई करावीच लागेल. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून कारवाईबाबत निर्णय घेतला जाईल. कार्यकर्त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करू. त्यांनी न ऐकल्यास कारवाई करावीच लागेल, युती असल्यामुळे भाजपने देखील बंडखोरांवर कारवाई केली पाहिजे.

- विनोद घोसाळकर, शिवसेना

अधिकृत उमेदवाराविरुद्ध उभे राहिलेल्यांवर कारवाई करावीच लागेल. यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. बंडखोरी ही गंभीर बाब आहे. भाजपने ती गांभीर्याने घेतली आहे. शिवसेनेनेही बंडखोरीकडे गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई केली पाहिजे.

- शिरीष बोराळकर, भाजप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेना-भाजप समोरासमोर

$
0
0

टीम मटा, औरंगाबाद

शिवसेना-भाजपने युती केलेली असली तरी उभय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांपुढे बंडखोरांनी आव्हान उभे केले आहे. अनेक वॉर्डांत शिवसेना उमेदवारांपुढे भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी, तर अनेक ठिकाणी भाजपच्या उमेदवारांपुढे शिवसेनेचे दिग्गज कार्यकर्ते षड्डू ठोकून उभे आहेत. यात प्रामुख्याने गुलमंडी, खडकेश्वर, उल्कानगरी, जवाहर कॉलनी, सिडको गणेशनगर, चिकलठाणा अशा अनेक वॉर्डांचा समावेश आहे.

गुलमंडी (क्रमांक ४८) वॉर्डातून खासदार चंद्रकांत खैरे यांचे पुतणे सचिन खैरे यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात माजी आमदार व सध्या भाजपमध्ये असलेले किशनचंद तनवाणी यांचे बंधू राजू तनवाणी यांनी तसेच शिवसेनेचे जुने कार्यकर्ते पप्पू व्यास यांनी उमेदवारी कायम ठेवून आव्हान उभे केले आहे. जैस्वाल गटातून व्यास यांच्यासाठी तिकिटाची मागणी करण्यात आली होती, पण त्यांना तिकीट नाकारण्यात आले.

खडकेश्वर वॉर्डात भाजपमध्ये नुकतेच दाखल झालेले गौतम खरात यांचे पुत्र कुणाल खरात यांनी शिवसेनेच्या सुगंधीकुमार गढवे यांच्याविरोधात बंडखोरी केली आहे. सिडकोतील गणेशनगर वॉर्ड (४०) हा पारंपरिक शिवसेनेचा गड मानला जातो. शिवसेनेने मकरंद कुलकर्णी यांना येथून उमेदवारी दिलेली असली, तरी शिवसेनेच्याच विद्यमान नगरसेविका प्राजक्ता भाले यांचे पती मंगेश भाले यांनी अपक्ष म्हणून रिंगणात उडी घेतली आहे. भाले हे खासदार चंद्रकांत खैरे गटाचे असून त्यांचा पत्ता कट करून जैस्वाल गटाचे कुलकर्णी यांना पक्षाने तिकीट दिले आहे.

एमआयडीसी चिकलठाणा वॉर्डातून (३८) भाजपने विद्यमान नगरसेवक राजू शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात भाजपचेच आमदार नारायण कुचे यांचे बंधू किशोर कुचे हे अपक्ष म्हणून उभे आहेत. आमदार कुचे हे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या निकटचे मानले जातात. राजू शिंदे हे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या गटातील सर्वात विश्वासू कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात.

गुलमोहर कॉलनी वॉर्डातून (६४) भाजपचे अधिकृत उमेदवार शिवाजी दांडगे यांच्याविरुद्ध शिवसेनेचे सुधीर लुंगारे यांनी दंड थोपटले आहेत. दांडगे हे आमदार अतुल सावे गटाचे, तर लुंगारे हे महानगर प्रमुख प्रदीप जैस्वाल गटाचे मानले जातात. राष्ट्रवादीचे अशोक वीरकर यांनीही बंडाचा झेंडा फडकावला आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या निकटचे संजीव खर्डीकर यांनी अपक्ष म्हणून रिंगणात उडी घेतली आहे. खैरे गटाचे सुधीर भाले यांनीही आपली उमेदवारी कायम ठेवली आहे.

आविष्कार कॉलनी वॉर्डात (६३) शिवसेनेने सोपान बांगर यांना उमेदवारी दिलेली आहे. बांगर हे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांचे समर्थक मानले जातात. त्यांच्या विरोधात शिवसेनेचेच कृष्णा माडगुळकर आणि भाजप युवा मोर्चाचे मयूर वंजारी यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. माडगुळकर हे खैरे गटाचे, तर वंजारी हे मुंडे गटाचे मानले जातात.

स्वामी विवेकानंद नगर (२८) वॉर्डातून शिवसेनेच्या सीमा खरात या रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेनेच्या मनीषा कांबळे तर भाजपच्या मीना कांबळे, निर्मला गवई यांनी बंड केले आहे. मनीषा कांबळे यांचे पती आनंद कांबळे हे नगरसेवक मोहन मेघावाले यांच्या निकटचे आहेत.

दक्षिण औरंगाबादमधील बहुतांश वॉर्डात युतीतील बंडखोरी शुक्रवारी स्पष्ट झाली. उत्तमनगर (७५) वॉर्डात नगरसेवक त्र्यंबक तुपे यांना शिवसेनेने उमेदवारी दिलेली असून त्यांच्या विरोधात सेनेचे जगन्नाथ कोऱ्हाळे हे उभे आहेत. बाळकृष्णनगर (९५) वॉर्डातून महापौर कला ओझा शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार आहेत, पण त्यांच्या विरोधात आमदार सावे गटाच्या संगीता रत्नपारखी यांनी बंड केले आहे.

शिवनेरी कॉलनी वॉर्डातून (३१) शिवसेनेने ज्योती पिंजरकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात भाजपच्या सोनाली सातदिवे यांनी बंडखोरी केली आहे. सातदिवे यांना माजी आमदार तनवाणी यांचा पाठिंबा असल्याची चर्चा आहे. पिंजरकर या खैरे गटाच्या मानल्या जातात. याच वॉर्डातील शारदा पद्मणे या सेनेच्या जुन्या कार्यकर्तीला तिकीट नाकारल्यामुळे त्यांनीही रिंगणात उडी घेतली आहे.

पदमपुरा (वॉर्ड क्र.७०) मधून शिवसेनेचे गजानन बारवाल यांनी बंडखोरी केली आहे. शिवसेनेने या वॉर्डातून संजय बारवाल यांना उमेदवारी दिली आहे. २०१० मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत संजय बारवाल शहर प्रगती आघाडीतर्फे शिवसेनेचे गजानन बारवाल यांच्या विरोधात उभे होते.

गजानन बारवाल यांनी त्यावेळी त्यांचा पराभव केला होता. आता संजय बारवाल यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. त्यांना उमेदवारी देण्यासाठी शिवसेनेचे महानगरप्रमु्ख प्रदीप जैस्वाल यांनी आग्रह धरला होता. गजानन बारवाल संजय शिरसाट गटाचे म्हणून ओळखले जातात. महापालिकेत ते शिवसेना - भाजप गटाचे गटनेते होते. गटनेत्यानेच आता अधिकृत उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी केली आहे.

ठाकरेनगर एन-२ (वॉर्ड क्र.८१) कॉंग्रेसमधून भाजपमध्ये नुकताच प्रवेश माजी नगरसेवक दामूअण्णा शिंदे यांच्या पत्नी सत्यभामा शिंदे या अपक्ष म्हणून उभ्या आहेत. त्यांचे पती दामूअण्णा शिंदे यांना भाजपने उमेदवारी नाकारली. यामुळे त्यांनी या वॉर्डात पत्नीला उभे केले. या कामी भाजपच्या व काँग्रेसच्याही काही नेत्यांनी नाराज दामूअण्णांना सल्ला दिल्याची चर्चा आहे. या वॉर्डातून भाजपने मीराताई चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे.

चिकलठाणा (वॉर्ड क्र. ८९) हा वॉर्ड भाजपला सुटला आहे. ज्योती सुनील नाडे यांना भाजपने अधिकृत उमेदवारी दिली आहे, पण भाजपच्याच स्वाती हरिभाऊ लहाने यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आणि तो कायम ठेवला आहे.

शिवाजीनगर

शिवाजीनगर वॉर्डातून (११२) जैस्वाल गटाचे राजेंद्र जंजाळ यांना शिवसेनेने तिकीट दिले आहे. त्यांच्याविरुद्ध सेनेचे कार्यकर्ते विनोद सोनवणे यांनी दंड थोपटले आहेत. भारतनगर-शिवाजीनगर (११३) वॉर्डातून दिग्विजय शेरखाने हे शिवसेनेच्या तिकिटावर उभे आहेत. त्यांना आमदार नारायण कुचे गटाचे जालिंदर शेंडगे यांनी आव्हान दिले आहे.

सिडको एन-६

सिडको एन-६ वॉर्डातून (६२) शिवसेनेच्या शीतल गादगे यांच्याविरुद्ध शिवसेनेच्या माजी महापौर विमल राजपूत यांनी उमेदवारी कायम ठेवली आहे. गादगे यांचे पती वीरभद्र गादगे हे खैरे गटाच्या निकटचे आहेत. याच वॉर्डातून एकदा निवडून आल्यामुळे विमल राजपूत यांनी पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. भाजपच्या मीना खरात यांनीही अपक्ष म्हणून उमेदवारी कायम ठेवली आहे.

गारखेडा

गारखेडा वॉर्डातून (९६) भाजपच्या उमेदवार विमल केंद्रे यांना जैस्वाल गटाच्या सुनंदा पाटील यांनी बंडखोरी करून आव्हान दिले आहे. उल्कानगरी वॉर्डात दिलीप थोरात हे भाजपचे अधिकृत उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात आमदार संजय शिरसाट गटाचे मावळते नगरसेवक सुशील खेडकर यांनी बंडखोरी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठाचा कारभार चव्हाट्यावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. शुक्रवारी मत्स्योदरी महाविद्यालयात एम. ए. इंग्रजीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना चक्क जुन्या अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिका वाटण्यात आल्या. हा प्रकार निदर्शनास येताच विद्यापीठाने तात्काळ ईमेलद्वारे नवीन अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका पाठविली. त्याच्या झेरॉक्स काढून विदयार्थ्यांना देण्यात आल्या. याप्रकारामुळे परीक्षार्थीना दीड तास ताटकळत बसावे लागले.

येथील मत्स्योदरी महाविदयालयाच्या परीक्षा केद्रावर शुक्रवार एम. ए. इंग्रजी प्रथम वर्षाचा लिट्रेचर इन इंग्लिश (१७९८-१९१४) पेपर-३ याविषयाची परीक्षा होती. वेळेनुसार सकाळी नऊ वाजता २३ परीक्षार्थी परीक्षा केंद्रावर दाखल झाले. गार्डिंगवर असलेल्या प्राध्यापकाने सुरुवातीला विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका दिल्या. परीक्षार्थींनीही उत्तर पत्रिकेवर परीक्षा क्रमांक व इतर माहिती भरली. त्यांनतर प्राध्यापकाने विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाटण्यास सुरवात केली. दरम्यान, प्रश्नपत्रिका हातात पडताच विद्यार्थ्यांना आश्चर्याचा मोठा धक्काच बसला. कारण, त्यांना जी प्रश्नपत्रीका देण्यात आली होती. ती जुन्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नपत्रिका होती. काही विद्यार्थ्यांनी ता‌त्काळ हा प्रकार गार्डिंगवर असलेल्या प्राध्यपकाच्या निदर्शनास आणून दिला. हा प्रकार परीक्षा नियंत्रक प्रा. शिवकुमार सोळूंके आणि प्राचार्य डॉ. आर. जी. गायकवाड यांच्या निदर्शनास आणून देताच त्यांनी विद्यापीठाला दूरध्वनीद्वावारे या प्रकाराची माहिती दिली.

याप्रकारामुळे एकच खळबळ उडाली आणि विद्यापीठाने आपली चूक मान्य करीत तडकाफडकी ईमेलदवारे नवीन अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका पाठविली. त्यानंतर झेरॉक्स काढून विद्यार्थ्यांना वाटप केल्यानंतर परीक्षेला सुरवात झाली. त्यानंतर प्रशासनासह परीक्षार्थींनी सुटकेचा निश्वास सोडला. ऑनलाइन पद्धतीने ईमेलद्वारे नवीन अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रीका मिळून त्याच्या झेरॉक्स काढण्याच्या या संपूर्ण प्रकियेला तब्बल दीड तास लागल्याने परीक्षार्थी तोपर्यंत ताटकळत बसले होते. दीड तास विलंब लागल्याने परीक्षार्थींचे पुरते नियोजन विस्कळीत झाले. विद्यार्थीनी वेळेवर घरी न परतल्याने त्यांचे कुटुंबीय चिंतित झाल्याचे परीक्षार्थींनी 'मटा'शी बोलताना सांगितले.

विद्यापीठात प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या पेपर सेटरने प्रश्नपत्रिकेवर नवीन अभ्यासक्रम किंवा जुना अभ्यासक्रम असा स्पष्ट उल्लेख करणे गरजेचे असते. मात्र, प्रश्नपत्रिकेवर अभ्यासक्रमाबाबतची माहिती टाकण्यात आली नव्हती. पेपर सेटरच्या या दुर्लक्षामुळेच हा सर्व गोंधळ उडाला. परंतु, विद्यापीठामार्फत तात्काळ ऑनलाइन प्रश्नपत्रिका पाठविण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान टळले.

- प्रा. शिवकुमार सोळुंके, परीक्षा नियंत्रक, मत्स्योदरी महाविद्यालय, जालना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वडोदचाथ्यातील आकाशची ‘भरारी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

ग्रामीण भागातील विद्यार्थी अलिकडच्या काळात विविध क्षेत्रात भरारी घेत आहेत. सिल्लोड तालुक्यातील वडोदचाथा येथील आकाश गणपत साळवे या दुर्बल घटकातील तरुणाने जिद्द, मेहनत व आत्मविश्वासाच्या बळावर पायलट होण्याची पात्रता मिळविली आहे. सिल्लोड तालुक्यातील दुर्गम भागात वडोदचाथा हे सुमारे तीन हजार लोकवस्तीचे गाव आहे. या गावाला लागून असलेल्या वडाळा येथे आकाश याने पाचवीपर्यंत व त्यानंतर दहावीपर्यंतचे शिक्षण सिल्लोड येथील शिवाजी हायस्कूलमध्ये पूर्ण केले. लहानपणापासून विमानाचे आकर्षण असलेल्या आकाशने वैमानिक होण्याचे स्वप्न बाळगले होते. त्यामुळे शिक्षक असलेले वडील गणपत साळवे यांनी कल लक्षात घेऊन पुढील शिक्षणासाठी औरंगाबाद येथील डिफेन्स करीयर अकादमीत प्रशिक्षणासाठी पाठविले.

आकाशनेही आवडीचे क्षेत्र मिळाल्याने अभ्यास सोडला नाही. अकादमीमधील इंडियन एअरफोर्समधील सोहन लांडगे यांच्या भाषणाने प्रभावित झाल्याचे तो सांगतो. इंदिरा गांधी उड्डयन अकादमी रायबरेलीच्या परीक्षेत आकाशने अनुसूचित जमाती प्रवर्गातून देशातून दुसरा क्रमांक मिळवला आहे. तो एवढ्यावरच थांबला नाही, तर भारतीय वैमानिक प्रशिक्षण मंत्रालयाच्या खाजगी कमर्शीयल पायलटचा २०० तासांचा कोर्स पूर्ण केला आहे. नाईट फ्लाईंगचे दहा तासाचे प्रशिक्षणही पूर्ण झाले आहे. पहिल्या उड्डाणाचा अनुभव रोमांचकारी असल्याचे त्याने सांगितले. विमानाने टेकऑफ करताच माझे आकाशाशी नाते जुळल्याचे तो म्हणाला. पहिले उड्डाण गोंदिया ते बिलालपूर, रायपूर, नागपूर व पुन्हा गोंदिया, असे होते. यावेळी तीन तास ५० मिनिटे विमान चालवले. नागपूरसारख्या गजबजलेल्या विमानतळावर लँडिंगचा अनुभव आनंददायी असल्याचे त्याने सांगितले.

सैन्य दलात जाणार

आकाश सध्या एनडीएची तयारी करीत असून पहिल्या प्रयत्नात अपयश आले तरी जिद्द सोडलेली नाही. भारतीय सैन्य दलात प्रवेश करून देशसेवा करायची उर्मी तो बाळगून आहे. त्याच्या वडिलांनीही मोठ्या जबाबदाऱ्या असताना प्रपंच भागवित कर्ज काढून आकाशचे शिक्षण सुरू ठेवले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालविवाह पोलिस, प्रशासनाने रोखला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

तालुक्यातील पिरोळा येथे मांडवात जाऊन तहसीलदार व पोलिसांनी शुक्रवारी दुपारी (१० एप्रिल) एका अल्पवयीन मुलीचा विवाह थांबवला. पोलिस लग्न मंडपातच पोहोचल्याने वऱ्हाडींना घरी परतावे लागले.

कन्नड तालुक्यातील दिगाव खेडी येथील एका अठ्ठावीस वर्षाच्या तरुणांचा विवाह पिरोळा येथील अल्पवयीन मुलीसोबत शुक्रवारी होत होता. मुलीचे वय कमी असल्याने अज्ञात व्यक्तिने तहसीलदार राहुल गायकवाड व ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक मिलिंद खोपडे यांना विवाहाची माहिती दिली. तहसीलदार गायकवाड, नायब तहसीलदार पी. जे. सोनवणे, पोलिस कर्मचारी ठाकूर, पाईकराव, तलाठी आदी मंडळी लवाजाम्यासह लग्न मंडपात दाखल झाले. त्याच्या काही वेळानंतर विवाह होणार असल्याने तो रोखला गेला. मुलीच्या वयाची खातरजामा केली असता मुलीचे वय १७ वर्ष असल्याचे स्पष्ट झाले. तिला अठरा वर्ष पूर्ण होईपर्यत लग्न लाऊ नये, अशा सक्त सूचना वधु-वराकडील मंडळींना देण्यात आल्या आहेत. प्रशासनाने ग्रामस्थाची बैठक घेऊन बालविवाह कायद्याची माहिती दिली. विवाह थांबविण्यात आल्याने दोन्ही बाजुंच्या मंडळींसह गावकऱ्यांची त्रेधातीरपट उडाली. वऱ्हाडी मंडळींनी पोलिसांना पाहून काढता पाय घेतला. पोलिसांनी तालुक्यातील दोन बालविवाह एकाच आठवड्यात रोखले आहेत.

सहायक पोलिस निरीक्षक मिलिंद खोपडे यांनी तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष, गावातील राजकीय पुढारी आदींनी बालविवाह रोखण्यासाठी सावध राहवे, असे आवाहन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वर्षभरात २९ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

गेल्या एक वर्षात तालुक्यातील २९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यापैकी २२ शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत प्राप्त झाली आहे, तर एका शेतकऱ्याची आत्महत्या या महिन्यातील आहे. इतर आठ शेतकऱ्यांच्या कुटुंबाना मदत मिळाली नाही.

गेल्या तीन वर्षातील दोन वर्षे दुष्काळी असल्याने सिल्लोड तालुक्यातील शेतकरी अडचणीत आहेत. मागील वर्षी पाऊस चांगला झाला तरी गारपिटीमुळे हाता- तोंडाशी आलेला घास हिरावला गेला. नापिकी, सोसायट्यांचे देणे, बँकाचे कर्ज, निसर्गाचा लहरीपणा यामुळे एप्रिल २०१४ ते मार्च २०१५ या कालावधीत २८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. त्यापैकी २२ शेतकऱ्यांच्या कुटुंबांना शासनाकडून प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत करण्यात आल्याची माहिती तहसीलदार राहुल गायकवाड यांनी दिली. एका शेतकऱ्यांच्या आत्महत्याप्रकरणी फेरनिर्णयाची चौकशी चालू असल्याचे त्यांनी सांगितले. शासनाच्या निकषात बसत नसल्याने सहा शेतकऱ्यांच्या कुटुंबाना मदत मिळू शकली नसल्याची माहिती त्यांन दिली.

अंभई येथील गणेश रहाटे भाड्याच्या घरात राहत होते, उंडणगाव येथील काशीनाथ वाघ यांना स्वतःचे घर नव्हते. शिवना येथील भास्कर काळे यांचीही परिस्थिती गंभीर होती, या सारखेच सर्वच आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांची स्थिती नाजूक होती. त्यामुळे तातडीने मदत केली. शेतकऱ्यांनी कुटुंबाचा विचार करून आत्महत्येचा मार्ग निवडू नये, असे आवाहन तहसीदारांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीउपशामुळे तीव्र टंचाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

तालुक्यातील महत्वाच्या व मोठ्या प्रकल्पातून थेट पाणी उपसा सुरू आहे. त्यामुळे भर उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. प्रशासनाकडून २८ फेब्रुवारीपर्यंत कराव्या लागणाऱ्या उपाययोजना अद्याप करण्यात आलेल्या नाहीत. परिणामी शहरासह तालुक्याला पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागणार आहेत.

कन्नड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या अंबाडी प्रकल्पात ११.७६ टक्के पाणीसाठा आहे. या धरणात सुमारे १.८० द.ल.घ.मी. जिवंत जलसाठा आहे. अंबाडी प्रकल्पातून बारामती अॅग्रो या खासगी साखर कारखान्याला ऊस गाळपासाठी पाणी पुरवठा सुरू आहे. तालुक्यातील सर्वात मोठा प्रकल्प शिवना-टाकळी प्रकल्पात १०.२८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. या धरणात ४ द.ल.घ.मी. जिवंत साठा आहे. या धरणातून उजवा कालवा परिसर व जुने जैतापूर गावालगत मोठ्या प्रमाणावर बेसुमार पाणी उपसा होत आहे. नागद गावाजवळील गडदगड धरणात ४९.६० टक्के, पूर्णा-नेवपूर प्रकल्पात ३४ टक्के, अंजना-पळशी प्रकल्पात ५४ टक्के जलसाठा आहे. तालुक्यातील लघू प्रकल्पामध्ये निंभोरा, गणेशपूर, वाघदरा, वडोद, आंबा या प्रकल्पांमध्ये जिवंत जलसाठा आहे. वडनेर, सिरसगाव, चापानेर, सातकुंड, कुंजखेडा, रिठ्ठी-मोहर्डा या लघुतलावात मृतसाठा आहे. बनशेंद्रा, शिवराई, औराळा, मुंगसापूर, माटेगाव, देभेगाव हे लघु तलाव कोरडे पडले आहेत. टंचाईग्रस्त जेहूर व देवगाव गटात पाणीटंचाई तीव्र होण्याची चिन्हे आहेत. या परिसरातील प्रकल्पातून शेती सिंचनासाठी थेट पाणीउपसा जोरात चालू आहे. उन्हाची तीव्रता व पाण्याचे होणारे बाष्पीभवन यामुळे जलसाठ्यातील पाणी पातळी घटत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परीक्षार्थींना हेतूपुस्सर त्रास देण्याचा प्रकार

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाडा अध्यापक कॉलेज परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षक, भरारी पथकाकडून परीक्षार्थींना हेतूपुस्सर त्रास दिला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात जयप्रकाश नारायण अध्यापक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कुलगुरूंकडे निवेदनाद्वारे तक्रार दिली आहे. दरम्यान, मराठवाडा अध्यापक कॉलजच्या प्राचार्यांनी मात्र या प्रकरणाशी कॉलेजचा संबंध नसल्याचे म्हटले आहे.

विद्यापीठातर्फे बी.एड अभ्यासक्रमाची परीक्षा घेतली जात आहे. यात मराठवाडा बी.एड. कॉलेज परीक्षा केंद्र आहे. या केंद्रावर हेतूपुस्सर त्रास दिल्याची तक्रार जयप्रकाश नारायण बी. एड. कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी केली आहे. शुक्रवारी परीक्षा केंद्रावर सकाळी ९ वाजून १० मिनिटांनी भरारी पथकाने हॉलतिकीट बघून सात विद्यार्थ्यांचे पेपर काढून घेतले. इतरांचेही पेपर घेण्यात आले होते, परंतु त्यांना पेपर लगेचच परत देण्यात आले. सात विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. जबरदस्तीने हमीपत्र लिहून घेण्यात आल्याचेही विद्यार्थ्यांनी सांगितले. तेरा कॉलेजचे विद्यार्थी परीक्षा केंद्रावर असताना, जयप्रकाश नारायण अध्यापक कॉलेजच्याच विद्यार्थ्यांना त्रास का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. हेतूपुरस्कर त्रास देण्यात येत असल्यामुळे इतर केंद्रावर परीक्षा घेण्यात यावी, भरारी पथकाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

कॉलेजांचा वाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातंर्गत असलेल्या कॉलेजांमधील वादाचा फटका विद्यार्थ्यांना बसत असल्याची चर्चा आहे. पंधरा दिवसापूर्वी मराठवाडा अध्यापक कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी व्हायवा झाला नसल्याने विद्यापीठात धाव घेतली होती. यानंतर आता हा प्रकार समोर आला आहे. यामुळे असे प्रकार म्हणजे विद्याशाखेतील अंतर्गत राजकारणाचा हा परिणाम असल्याचेही बोलले जाते आहेत.

विद्यार्थ्यांना हेतूपुस्सर त्रास दिला जात आहे. तेरा कॉलेजांमधील विद्यार्थी केंद्रावर असताना आमच्याच कॉलेजच्या विद्यार्थ्यांवर कारवाई का? याबाबत आमच्या विद्यार्थ्यांनी कुलगुरूंकडे तक्रार केली आहे.

- डॉ. राजीव सातव, प्राचार्य, जयप्रकाश नारायण कॉलेज.

भरारी पथक हे विद्यापीठाकडून नेमले जात असते. या भरारी पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत कॉलेज हस्तक्षेप करू शकत नाही. त्यामुळे या प्रकरणाशी आमच्या कॉलेजचा संबंध जोडणे चुकीचे आहे.

- डॉ. सोहल अहमद खान, प्राचार्य, मराठवाडा अध्यापक महाविद्यालय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images