देवानगरी परिसरात ज्या कंत्राटदाराच्या जेसीबीमुळे वीजपुरवठ्याची भूमीगत केबल तुटली, त्याच्याविरुद्ध महावितरण कंपनीने जवाहरनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ही केबल तुटल्यामुळे पन्नालालनगरातील ३३ केव्ही उपकेंद्राशी संबंधित वीज ग्राहकांना सोमवारी रात्रभर उकाडा सहन करावा लागला.
देवानगरीत रेल्वे रुळाजवळ कुंपणभीत बांधण्याचे काम केले जात आहे. सोमवारी जेसीबीच्या यंत्राच्या साह्याने खड्डे खोदण्याचे काम केले जात होते. त्यावेळी पन्नालालनगर ३३ केव्हीला वीज पुरवठा करणारी केबल तुटली. त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला आणि पन्नालालनगर, चेतनानगर, ज्योतीनगर, उस्मानपुरा, क्रांतिचौक, विश्वभारती कॉलनी, टिळकनगर, पैठणगेटसह अन्य भागांतील वीज पुरवठा खंडित झाला. रात्री उशिरा या भागाला चिकलठाण्यातून वीज पुरवठा करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यामुळे जुन्या केबलही जळाल्या. परिणामी रात्री ७.४५ वाजता पन्नालालनगर भागाला होणारा वीज पुरवठा पूर्णपणे तुटला.
एका कंत्राटदाराच्या बेशिस्त कामामुळे हजारो वीज ग्राहकांना अंधारात रात्र काढावी लागली. या घटनेची गंभीर दखल घेऊन अधीक्षक अभियंता प्रभाकर निर्मळे यांनी संबंधित कंत्राटदार गिरीश जैस्वाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार मंगळवारी अभियंता सतीश सावरे यांनी जवाहर नगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली, मात्र याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याची माहिती महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
अर्धे शहर अंधारात टाकणाऱ्या रेल्वेच्या कंत्राटदाराच्या विरोधात आम्ही तक्रार दाखल केली आहे. सर्वसामान्य वीज ग्राहकांना सेवा देण्यामध्ये संबंधित कंत्राटदारामुळे व्यत्यय आला आहे. त्यामुळे रेल्वे कंत्राटदार गिरीश जैस्वाल यांच्या विरोधात सदर तक्रार देण्यात आली आहे.
- प्रभाकर निर्मळे, अधिक्षक अभियंता, औरंगाबाद
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट