अब्दुल वाजेद, औरंगाबाद
ऐतिहासिक औरंगाबाद नगरीतील रेल्वे स्टेशनवरून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. मात्र, स्टेशनवरील सुविधांचा बोजवारा उडाला आहे. बंद पडलेली लिफ्ट, अवैध विक्रेत्यांची वाढलेली संख्या, कमी बुकिंग काऊंटर, पाण्याचा गोरखधंदा, कर्मचाऱ्यांना अत्यल्प सुविधा आदी गैरसोयींनी कळस गाठला आहे. प्रवाशांना सोयीसुविधा पुरविण्याकडे रेल्वे विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.
दक्षिण मध्य रेल्वेने ग्राहकांच्या सुविधेबाबत पंधरवाडा जाहीर केला. या काळात विविध सुविधा वाढविण्याबाबत, स्वच्छतेकडे, अभियान यशस्वी करण्याकडे लक्ष देण्यात येत आहे. मात्र, औरंगाबादमधील 'अ' दार्जाच्या रेल्वे स्टेशनवर यातला एकही प्रयोग होताना दिसत नाही. येथून दररोज १७ रेल्वे धावतात. आठवड्याच्या विशेष रेल्वेसह मालवाहतूक करणाऱ्या रेल्वेची संख्या ३० झाली आहे. दररोज धावणाऱ्या सचखंड, तपोवन, नंदीग्राम, देवगिरी, अजिंठा, जनशताब्दी गाड्यांना प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. नगरसोल नरसापूर, काकीनाडा, विजयवाडा, शिर्डी-साईनगरच्या गाड्या फुल्ल असतात. रामेश्वर ओखा, हैदराबाद अजमेर, नांदेड मनमाड पॅसेंजर, औरंगाबाद हैदराबाद पॅसेंजरमधून जाणाऱ्या प्रवाशांची संख्याही लक्षणीय आहे. रेल्वेची संख्या वाढवली गेली. मात्र, सुविधांचा विकास झाला नाही. मॉडेल रेल्वे स्टेशन करण्याची घोषणा सरकारने केली. या अंतर्गत मुख्य इमारतीचे काम करण्यात आले. त्या ठिकाणी पाच बुकिंग कॉऊंटर, फूड प्लाझा आदी सुविधा दिल्या. मात्र, इतर सुविधांकडे दुर्लक्ष झाले. एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर जाताना वृद्ध, महिला आणि अपंगांना त्रास होऊ नये म्हणून लिफ्ट सुरू करण्यात आली, पण वारंवारच्या तांत्रिक अडचणीमुळे ही लिफ्ट बंद असते. रेल्वे स्टेशनवर एकूण २०० कर्मचारी काम करतात. मात्र, त्यांना बसण्यासाठी ना धड खुर्च्या आहेत. ना शौचालयाची सोय. त्यामुळे हे कर्मचारी प्रवाशांच्या सुविधांचा वापर करतात.
महिला कर्मचारी त्रस्त
सध्या रेल्वे स्टेशनवर जवळपास बारा महिला कर्मचारी आहेत. यातील काही महिला कर्मचारी चौकशी केंद्रावर, तर काही इतर ठिकाणी काम करतात. या कर्मचाऱ्यांना पाणी, शौचालयाची व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे त्यांनाही या साऱ्या सोयीसाठी प्रवाशांसाठी असलेल्या सार्वजनिक सुविधांचा वापर करावा लागतो.
पिट लाइनचे भिजत धोंगडे
रेल्वे स्टेशनवरून लांब पल्ल्याच्या गाड्या सोडण्याची मागणी स्थानिक रेल्वे संघटनेने केली. मात्र, औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर पिट लाइन नसल्याचे कारण दाखवून या गाड्या नाकारल्या जातात. स्टेशनवर पिट लाइनसाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. मात्र, या जागेवर पिट लाइन करण्याच्या कामाला अद्याप मंजुरी मिळालेली नाही.
सुट्यांत विशेष रेल्वे नाही
यंदाच्या उन्हाळी सुटीत दक्षिण मध्य रेल्वेने काचिगुडा, शिर्डी विशेष रेल्वेसह अन्य रेल्वे दक्षिणेत सोडल्या. मात्र, औरंगाबाद रेल्वे स्टेशनवरून यंदा एकही नवीन विशेष रेल्वे सेवा सुरू केली नाही. उलट मराठवाडा एक्सप्रेसचा एसी कोच बंद केला. तसेच मुंबई जनशताब्दीचे दोन कोच एक जूनपासून बंद करण्यात आले.
१५ वर्षापूर्वींची कर्मचारी संख्या
रेल्वे विभागाने औरंगाबाद रेल्वे स्टेशनसाठी १५ वर्षांपूर्वी कर्मचारी संख्या मंजूर करण्यात आली. या १५ वर्षांत रेल्वेची संख्या वाढली, प्रवासी वाढले. मात्र, कर्मचाऱ्यांची संख्या वाढली नाही. स्टेशनवरील तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांपासून ते सर्व विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. २०१५ नुसार या कर्मचारी संख्येत ५० टक्के वाढ होण्याची गरज आहे. मात्र, ती वाढ झाली नाही. त्यामुळे सध्या असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण दुपटीने वाढला आहे.
बुकिंग काऊंटरची संख्या कमी
रेल्वे स्टेशनवरून दररोज साडेदहा हजार तिकिटांचे बुकिंग केले जाते. १६ कर्मचारी हे काम करतात. तीन शिफ्टमध्ये तिकीट बुकिंग सुरू असते. त्यासाठी सहा बुकिंग काऊंटर आहेत. सध्या एका बुकिंग काऊंटरवरील खुर्ची तुटली आहे. त्यामुळे पाच बुकिंग काऊंटरवरून तिकीट बुकिंग सुरू असते. रेल्वेच्या नियमानुसार एका बुकिंग काऊंटरने ८०० तिकिटांची बुकिंग करावी. मात्र, या ठिकाणी कामाचे लोड वाढल्यामुळे जास्त बुकिंग करावे लागते. सध्या रेल्वे स्टेशनवर वाढलेल्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता १४ तिकीट काऊंटरची गरज आहे, पण काऊंटर कमी असल्यामुळे स्टेशनवर तिकीट बुकिंगसाठी प्रवाशांचा भल्या मोठ्या रांगा लागलेल्या दिसतात. नांदेड, मनमाड, पूर्णा येथे असलेली रनिंग रूमची सुविधा औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर नाही. त्यामुळे प्रवासी आणि कर्मचाऱ्यांनी विश्रांती करायची कुठे, असा प्रश्न असतो.
सुरक्षेचे तीनतेरा
रेल्वे स्टेशनवर सुरक्षेचे तीनतेरा वाजले आहेत. स्टेशनच्या नवीन इमारतीत अजूनही सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले नाहीत. मेटल डिटेक्टर आणि स्कॅनरची सुविधा नाही. जीआरपी आणि आरपीएफ कर्मचारी संख्या कमी आहे. त्यामुळे स्टेशनवर चोरींच्या घटनेत वाढ झाली आहे. दक्षिणेतून येणाऱ्या गाड्यांमध्ये तिकीट तपासणी अधिकारी असतात. मात्र, औरंगाबाद येथून जाणाऱ्या गाड्यांत हे अधिकारी नसतात. त्यामुळे अनेक प्रवासी रिझर्व्हेशन नसतानाही आरक्षित डब्यातून प्रवास करतात. त्यामुळे अजमेर, तपोवन, नंदीग्राम, देवगिरी सारख्या गाड्यांमध्ये प्रवाशांना सुरक्षा मिळत नाही.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट