म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरात विदेशी शोभीवंत झाडांची वाढती संख्या आणि हद्दपार झालेल्या भारतीय पद्धतीच्या बागा फुलपाखरांच्या मुळावर उठल्या आहेत. फळे आणि फुलांनी बहरलेल्या झाडांचे प्रमाण कमी झाल्यामुळे फुलपाखरांची संख्या ७५ टक्के घटली आहे. पारंपरिक झाडांचे संवर्धन केले तरच निसर्गसृष्टीतील महत्त्वाच्या घटकाचे संगोपन होईल, असे अभ्यासकांनी सांगितले.
औरंगाबाद शहरात ४६ प्रकारची फुलपाखरे आढळतात. उद्याने आणि घरासमोरील फुलझाडांभोवती भिरभिरणारी मनमोहक फुलपाखरे प्रत्येकासाठी आनंददायी असतात, मात्र आठ वर्षांपासून फुलपाखरांची संख्या झपाट्याने घटत आहे. फुलपाखरांचे थवे निव्वळ दुर्मीळ झाले आहेत. शहरीकरणात झाडांची संख्या कमी असून घराच्या कंपाउंडमध्ये विदेशी शोभीवंत झाडे लावण्याचे प्रमाण वाढले आहे. फर्न, रॅचिस, कॅक्टस, लिली अशा झाडांनी अंगण व्यापले आहे. काही विदेशी झाडांना फळे व फुले येत नाहीत. त्यामुळे फुलांचा रस हा मुख्य आहार असलेल्या फुलपाखरांचा अन्न पुरवठा खंडीत झाला आहे. फुलांचा रस, गवताचा रस, चिखल व पिकलेली फळे फुलपाखरांना पोषक रस पुरवतात; तसेच परागीभवन क्रियेत फुलपाखरांचे महत्त्वाचे स्थान आहे. 'फुलझाडांची संख्या घटल्याने फुलपाखरांचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. शेतात पिकांवर रासायनिक खते व किटकनाशकांचा बेसुमार वापरही फुलपाखरांसाठी धोकादायक ठरत आहे,' असे पक्षीमित्र डॉ. किशोर पाठक यांनी सांगितले. तीन ते चार आठवडे आयुष्य असलेले
फुलपाखरू निसर्गातील सुंदर ठेवा आहे. शिवाय सरडे, पाली व पक्ष्यांसाठी फुलपाखरू हे मुख्य खाद्य आहे. त्यामुळे इतर प्राण्यांच्या संख्येवरही परिणाम जाणवत आहे. या परिस्थितीत देशी झाडे व फुलझाडांवरच फुलपाखरे टिकण्याची शक्यता आहे. त्यामुळे झेंडू, सदाफुली, सोनचाफा, कण्हेरी, पारिजातक, जास्वंद या फुलझाडांसह साग, बेहडा, बेल, वड, पिंपळ, उंबर, करंज, चिंच, बहावा, पळस, बोर, लिंबू, कडीपत्ता या झाडांचे संवर्धन करणे गरजेचे ठरले आहे.
बागा हद्दपार
शहरात भारतीय पद्धतीच्या उद्यानांचे स्वरूप बदलत आहे. 'जापनीज गार्डन'च्या धर्तीवर महत्त्वाचे बदल झाले आहेत. बागांमध्ये फुलझाडे अपवादानेच दिसतात. शिवाय पूर्वी घराभोवती कण्हेरी, पारिजातक किंवा सदाफुलीची लागवड केली जात होती. आता विदेशी झाडांनी जागा व्यापल्याने फुलपाखरांचे अस्तित्व धोक्यात आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट