September 16, 2015, 12:26 pm
म. टा. प्रतिनिधी, लातूर
भुस्तरावरील, भूगर्भातील सर्व पाणी सरकारने पिण्यासाठी आरक्षित करावे ते राज्याच्या जलनितीनुसार होईल असे सांगून दुष्काळ निवारण मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. एच. एम. देसरडा यांनी यंदा कारखान्यांना परवानगी न देता शेतकऱ्यांच्या उसाचा वापर चारा म्हणून करावा. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी सूचना केली.
दुष्काळग्रस्त भागात जलसंधारणाची कामे कशी करावीत, दुष्काळाचा सामना कसा करावा आणि आपत्तीचे संधित रुपातंर करण्यासाठी प्रा. देसरडा यांनी संवाद यात्रा सुरू केली आहे. या संवाद यात्रेच्या निमित्ताने लातूरात ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बाबासाहेब पराजंपे फाउंडेशनचे विजय दबडगावकर उपस्थित होते. दुष्काळाचा सामना करण्यासाठी करावायच्या उपाय योजना सांगताना प्रा. देसरडा म्हणाले, 'एक हेक्टर ऊसाला लागणारे पाणी हे एक हजार माणसाला वर्षभर पुरु शकते. सध्या जे शाहीस्नानासाठी दोन टीएमसी पाणी वापरले जाते त्या पाण्याचा वापर हा लातूर सारख्या जिल्ह्याला एकवर्ष पुरणारा असल्याचा दावा त्यांनी केला. साखर कारखाने सध्या तोट्यातच आहेत, कारखाने सुरू करण्यासाठी ही पाणी लागणार आहे. त्यामुळे या हंगामात कारखान्याना परवानगी न देता ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊसाचा वापर चारा म्हणून करावा आणि शासनाने त्यांना नुकसानभरपाई द्यावी.'
सर्वांनी मिळून एक पर्याय निवडावा
भूगर्भातील पाणी सुद्धा बांधकामासाठीच वापरले जात आहे. कायमस्वरुपी योजना म्हणून पाण्याच्या पुर्नवापराचे तंत्र तातडीने विकसित करून सांडपाण्याचा पुर्नवापर केला पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. जलसंवर्धानासाठी राज्यातील जलक्षेत्रात काम करणाऱ्या सर्व तज्ज्ञांची सहमती झाली पाहिजे आणि सर्वांनी मिळून एक पर्याय निवडला पाहिजे, या मताशी सहमत असल्याचे त्यांनी सांगितले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
September 16, 2015, 12:28 pm
उस्मानाबादः खरीप हंगामात झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून सरकारकडून मिळणाऱ्या रकमेतून खात्यामध्ये किमान पाचशे रुपये असावेत, म्हणून तेवढी रक्कम कापून घेण्याचा प्रकार उस्मानाबाद जिल्हा सहकारी बँकेमध्ये उघडकीस आला.
जिल्हा बँकेमध्ये अनेक शेतकऱ्यांचे सेव्हिंग अकाउंट आहे. या खात्यामध्ये सरकार अनुदान, अर्थसहाय्य व पीक विम्याची रक्कम जमा करते. या रकमेतून कसलीही कपात करू नये, अशा सरकारच्या सूचना असताना उस्मानाबाद जिल्हा बँकेमध्ये मात्र, या मदतीमधून पाचशे रुपयांची कपात करण्यात येत आहे. यासंदर्भात जिल्हा सहकारी बँकेचे संचालक सतीश दंडनाईक यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतो, असे सांगितले आहे. बँकेने अशा प्रकारे कपात करू नये, अशी सूचना देण्यात आली आहे, असे जिल्हा उपनिबंधक एस. पी. बडे यांनी सांगितले आहे.
जिल्हा सहकारी बँक अशा प्रकारे शेतकऱ्यांकडून रक्कम कपात करीत असेल, तर बँकेविरोधात कारवाई करणार.
- डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी, उस्मानाबाद
कम्प्युटरमधील यंत्रणेनुसार पाचशे रुपये खात्यामध्ये ठेवणे सक्तीचे आहे.
- प्रवीण चांडक, प्रशासकीय अधिकारी, जिल्हा बँक, उस्मानाबाद
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
September 16, 2015, 11:30 am
म. टा. प्रतिनिधी, जालना
जालन्यातील इंदिरानगर परिसरात तीन वर्षांपूर्वी दोन वर्षीय चिमुकलीला चॉकलेटचे आमिष दाखवून बलात्कार करून तिचा गळा आवळून खून करण्यात आला होता. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी रवी घुमारे यांच्यावरील आरोप सिद्ध झाले असून फाशी की जन्मठेप यावर न्यायालय शुक्रवारी शिक्कामोर्तब करणार आहे.
इंदिरानगर येथील चिमुकली सहा मार्च २०१२ रोजी सायंकाळी सातच्या सुमारास खेळण्यासाठी घरातून बाहेर गेली. मात्र, बराच वेळ होऊन देखील ती घरात न परतल्याने तिच्या कुटुंबियांच्यावतीने कदीम जालना पोलिस ठाण्यात मिसिंगची तक्रार केली होती. दरम्यान, शेजारच्या घराला कुलूप असल्याने कुटुंबियाना संशय आला. त्यांनी दाराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला असता पलंगाखाली आरोपी रवी घुमारे हा नग्नावस्थेत तर सदर चिमुकली मृतावस्थेत पडलेली आढळून आली होती. चिमुकलीवर बलात्कार करून खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी रवी घुमारे हा सध्या कारागृहात असून न्यायालयात बुधवारी त्याच्याविरुद्धचे आरोप सिद्ध झाले. जिल्हा व सत्र न्याय्याधीश आशुतोष करमरकर यांनी त्याला दोषी ठरविले. सुनावणीत सरकारपक्षातर्फे एकूण १२ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. त्यामध्ये पीडित मुलीचे वडील, पोलिस उपनिरीक्षक दिलीप तेजनकर, वैद्यकिय अधिकारी डॉ. भानुदास सुरवसे, डॉ. रवींद्र बेदरकर डीएनए तज्ज्ञ श्रीकांत लादे आणि तपासिक अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर जिल्हा व सत्र न्याय्याधीश आशुतोष करमरकर यांनी आरोपी रवी घुमारेला दोषी ठरविले. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अॅड. मुकुंद कोल्हे यांनी युक्तिवाद केला.
दरम्यान, सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अॅड. मुकुंद कोल्हे यांनी युक्तिवाद करुन हा गुन्हा अतिशय गंभीर असून समाजात चांगला संदेश जाण्यासाठी आरोपीला फाशीची शिक्षा ठोठवण्याची मागणी केली. दरम्यान, उद्या शुक्रवारी या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे. दरम्यान, ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. असे म्हणत जिला वकील संघाने आरोपी रवी घुमारे यांच्यावर बहिष्कार टाकून त्याची केस न लढविण्याचा निर्णय घेतला होता. अखेर, जालना विधि सेवा प्राधिकारणामार्फत आरोपीला कायदेशीर मार्गदर्शन करण्यात आले होते.
गुन्हा कबूल; फाशी द्या
घटनेनंतर अटक करून न्यायालयात हजर केले असता पहिल्याच सुनावणीत आरोपी रवी घुमारे याने न्यायालयातच गुन्हा कबुल असून मला फाशी द्या, असा आरडा-ओरडा केला होता.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
September 16, 2015, 11:35 am
म. टा. प्रतिनिधी, कन्नड
तालुक्यात काही महसूल मंडळात समाधानकारक पाऊस झाल्याने रब्बीच्या आशा उंचावल्या आहेत. मात्र सोमवारी मध्यरात्री झालेल्या पाऊसाआधी सुटलेल्या जोराच्या वाऱ्यामुळे काही ठिकाणी ऊस व मका पिकांचे नुकसान झाले.
या पावसामुळे तालुक्यातील नागद येथील गडदगड प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. अंजना-पळशी, पूर्णा-नेवपूर प्रकल्पात पाण्याची आवक सुरू झाली आहे. अंबाडी प्रकल्पाच्या मृतसाठ्यात काही अंशी वाढ झाली आहे. वडनेर, आंबा लघुप्रकल्प प्रकल्प मृतसाठ्यातच आहे. शिवना-टाकळीत प्रकल्पात उपयुक्त जलसाठा दोन टक्के आहे.
कन्नड तालुक्यात सोमवारपासून ४८ तासात झालेला मंडळनिहाय पाऊस पुढीलप्रमाणेः कन्नड ५० मि.मी., देवगाव (रं.) ४२ मि.मी., चापानेर १४ मि.मी., चिकलठाण ७ मि.मी., पिशोर ४४ मि.मी., नाचनवेल २२ मि.मी., करंजखेड ३५ मि.मी., चिंचोली (लिं.) ५० मि.मी. चिकलठाण व चापानेर महसूल मंडळात सर्वात कमी पावसाची नोंद आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
September 16, 2015, 11:37 am
म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री
तालुक्यातील चिंचोली नकीब येथील पाणीप्रश्न चांगलाच गंभीर झाला आहे. टंचाईचा आढावा घेण्यासाठी गेलेल्या गटविकास अधिकाऱ्यांना बुधवारी महिलांसह गावकऱ्यांनी 'घेराओ' घातला. चिंचोली नकीब येथे दीड महिन्यापासून तीव्र टंचाई जाणवत असून गावकऱ्यांना पाण्याच्या शोधात भटकावे लागत आहे. दरम्यान, टँकरच्या मागणीबद्दल तहसीलदार व गटविकास अधिकारी टोलवाटोलवी करीत आहेत, असा आरोप आहे.
ग्रामपंचायतीने टँकरचा प्रस्ताव तहसीलदार व गटविकास अधिकारी (बीडीओ) यांच्याकडे दाखल केला आहे. परंतु, त्यावर अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. बाबरा गटाच्या जिल्हा परिषद सदस्या संगीता मोटे यांनी चिंचोली नकीबला भेट दिली असता गावकऱ्यांनी त्यांच्याकडे पाणीप्रश्न मांडून तो त्वरित सोडवण्याची मागणी केली. 'याबद्दल तहसीलदारांकडे विचारणा केली असता त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना सांगितल्याचे उत्तर दिले. गटविकास अधिकारी यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी पाणीपुरवठा विभागाचे गणेश सुवर्णकार यांना बऱ्याचवेळा सांगितले, पण ते ऐकत नाहीत, असे सांगितले,' असे संगीता मोटे व काकासाहेब मोटे यांनी सांगितले. पंचायत समितीचे प्रमुख अधिकारी गटविकास अधिकारी असताना एक कर्मचारी ऐकत नसल्याचे सांगणे त्यांना शोभत नाही, अशी प्रतिक्रिया संगीता मोटे यांनी व्यक्त केली.
चिंचोली नकीब हे गाव तीन हजार वस्तीचे आहे. गटविकास अधिकारी शिवाजी माने यांनी गावाला भेट देऊन पाहणी करू, असे जिल्हा परिषद सदस्य संगीता मोटे व पंचायत समितीचे माजी सदस्य काकासाहेब मोटे यांना मंगळवारी सांगितले होते. त्यानुसार ते भेट देण्याकरिता बुधवारी चिंचोली नकीब येथे गेले. तेव्हा महिला व गावकऱ्यांनी 'घेराओ' घालून धारेवर धरले. गावकऱ्यांनी मध्यंतरी झालेल्या पावसाचे पाणी साठवून वापरले, त्यावर दोन तीन दिवस भागले, एवढी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
September 16, 2015, 11:40 am
pramod.mane@timesgroup.com
औरंगाबाद : डॉ. केळकर समितीच्या अहवालाचा आधार घेऊनच मराठवाड्याचा विकास करणे हितकारक असल्याचे मत मराठवाडा विकास मंडळाचे सदस्य व गोदावरी महामंडळाचे सेवानिवृत्त कार्यकारी संचालक शंकरराव नागरे यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'शी बोलतांना व्यक्त केले.
केळकर समितीचा अहवाल राज्य सरकारने स्वीकारला नसल्याने २०१५-१६ या अर्थसंकल्पात सिंचनासाठी कमी अनुदान मिळाले. समितीने काढलेला ५० हजार ४५७ कोटी रुपयांचा अनुशेष सध्याच्या उर्वरित कामावर ८० हजार कोटी खर्च होईपर्यंत दूर होणे जरुरी आहे. अनुशेष अनुदान मिळविण्यासाठी केळकर समितीच्या काही आवश्यक शिफारशी लवकर मंजूर होणे मराठवाड्याच्या विकासासाठी हितकारक आहे, असे नागरे म्हणाले. राज्य शासनाने १९९४ चा सिंचनाचा २४०० कोटी रुपयांचा अनुशेष दूर केल्याचे जाहीर केले आहे. यावर्षी मराठवाड्याला अनुशेषाचे कोणतेही अनुदान प्राप्त न झाल्यामुळे केवळ ८७२ कोटी रुपये प्राप्त झाल्याची धक्कादायक माहिती त्यांनी दिली. या वेगाने पैसे मिळाल्यास मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पाची उर्वरित १४ हजार कोटींची कामे पूर्ण होण्यास दीड दशकांचा कालावधी लागणार आहे, अशी भीती नागरे यांनी व्यक्त केली.
सध्या सिंचनाचा १९९४ चा अनुशेष जरी शिल्लक नसला तरी समितीने २०१०पर्यंत विविध विभागांची माहिती गोळा करून जो असमतोल काढला आहे त्याच्या निर्मूलनाचा विचार होणे अगत्याचे आहे, असे नागरे यांनी सांगितले. धरणातील पाणीसाठा, निर्मित सिंचनक्षेत्र या दोन्ही निकषांचा वापर करून समितीने प्रादेशिक तूट काढलेली आहे. ही तूट ५० हजार ४५७ कोटींची आहे. प्रादेशिक विभागांचा विचार करता मराठवाड्यासाठी १५ हजार ६२९ कोटीची तूट आहे. आज रोजी ८० हजार कोटींची सिंचनाची कामे शिल्लक आहेत. त्यासाठी कर्जरोख्याद्वारे रक्कम उभी करावी लागणार असल्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी औरंगाबादच्या २४ ऑगस्ट रोजीच्या बैठकीत सांगितले होते. या स्थितीत मागास विभागांनी सध्या २०१०चा उपलब्ध असलेला ५० हजार कोटी रुपयांचा अनुशेष प्राधान्याने दूर करण्यासाठी आग्रह धरणे आवश्यक असल्याचे नागरे यांनी सांगितले. लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना यांनी दबावगट तयार करुन आपल्या भागाचा विकास करण्यासाठी खारीचा वाटा उचलावा, असे आवाहन नागरे यांनी केले.
या अर्थसंकल्पात सिंचनासाठी कमी अनुदान मिळाले. समितीने काढलेला ५० हजार ४५७ कोटी रुपयांचा अनुशेष सध्याच्या उर्वरित कामावर ८० हजार कोटी खर्च होईपर्यंत दूर होणे जरुरी आहे. अनुशेष अनुदान मिळविण्यासाठी केळकर समितीच्या काही आवश्यक शिफारशी लवकर मंजूर होणे मराठवाड्याच्या विकासासाठी हितकारक आहे.
- शंकरराव नागरे, सदस्य, मराठवाडा विकास मंडळ
आकड्यातील अनुशेष
यावर्षी मराठवाड्याला केवळ ८७२ कोटी रुपये प्राप्त
मराठवाड्याची १५ हजार ६२९ कोटीची तूट
८० हजार कोटींची सिंचनाची कामे शिल्लक
५० हजार कोटी रुपयांचा अनुशेष दूर करणे आवश्यक
सिंचनाच्या उर्वरित कामांसाठी १४ हजार कोटींची आवश्यकता
कामे पूर्ण होण्यास १५ वर्षांचा कालावधी
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
September 16, 2015, 11:43 am
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
छावणी परिषदेची बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत पथकर नाक्याचे टेंडर व एसीबीच्या जाळ्यात अडकलेले नगरसेवक संजय गारोल यांच्या नगरसेवकपदाबद्दल विषय उपस्थित झाला. परंतु, परिषदेचे अध्यक्ष ब्रिगेडिअर मनोजकुमार यांनी या दोन्ही विषयांवर 'नो कमेंट' म्हणत सभेतील हवाच काढून टाकली. पथकर नाक्याच्या टेंडरवर बैठकीनंतर बंद दाराआड चर्चा करण्यात आली.
छावणी परिषदेच्या बुधवारच्या सभेत सीईओ पूजा पलेचा यांनी विविध विषयांसोबत छावणी हॉस्पिटल, पार्किंग आणि अतिक्रमण हे विषय पटलावर ठेवले. पार्किंगसाठी शुल्क आकारणी करावी, आधीच्या कंत्राटदाराकडून थकबाकी वसूल करावी, असे ठरवण्यात आले. होलिक्रॉस शाळा व त्याच्या समोरील पार्किंगसह सार्वजनिक ठिकाणी होत असलेल्या पार्किंगबद्दल चर्चा करण्यात आली. पथकर नाक्याच्या टेंडरवरून मंगळवारी नगरसेवकांनी आक्षेप घेतले होते. हा विषय उपस्थित होताच दोन तासांपासून सुरू असलेली बैठक थांबवण्यात आली. नंतर बंद दाराआड चर्चा करण्यासाठी अध्यक्ष ब्रिगेडिअर मनोजकुमार, उपाध्यक्ष किशोर कच्छवाह, सीईओ पूजा पलेचा, निघून गेले.
यापूर्वी काही नगरसेवकांनी विकासकामांना निधी देण्याची मागणी केली. मात्र अर्थसंकल्पावर पुन्हा एकदा ३० सप्टेंबरपूर्वी बैठक घेण्याचे ठरवण्यात आले. यावेळी नगरसेवक प्रशांत तारगे, पद्मश्री जैस्वाल, शेख हानिफ, प्रतिभा काकस, मिर्झा रफत बेग व अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
सभेतील निर्णय
अतिक्रमणांचा दर महिन्याला आढावा
हॉस्पिटलमध्ये एका डॉक्टराची भरती
अवजड वाहनांना पार्किंगबद्दल दंड
छावणीत रेस्तराँ उघडण्यास मज्जाव
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
September 16, 2015, 11:48 am
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जयभवानीनगर येथील सुधीर पंढरीनाथ सुरडकर (वय २९) या तरुणाला दारू पाजण्याच्या कारणावरून दोघांनी मारहाण केली. या मारहाणीत डोक्याला मार लागल्याने सुधीर जखमी झाला. रविवारी सायंकाळी हा प्रकार घडला. याप्रकरणी आरोपी अतुल कोळी व त्याच्या मित्राविरूद्ध मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घरातून मोबाइल चोरला
नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी आलेल्या सुवर्णा गणेश तेलतुंबडे (वय २९ रा. भांडूप, मुंबई) यांचा उस्मानपुरा येथील घरातून मोबाइल चोरीला गेला. सोमवारी हा प्रकार घडला. याप्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विवाहितेचा छळ
माहेरून पैशाची मागणी करीत रूहीना शेख वसीम शेख (रा. मंजूरपुरा) या विवाहितेचा सासरच्या मंडळीनी छळ केला. याप्रकरणी तिच्या तक्रारीवरून आरोपी शेख वसीम शेख जिलानी, शेख जिलानी, नसरीन व शाहीन यांच्याविरूद्ध सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिलेचा छळ
सुनीता सतीश कुलकर्णी (वय ४० रा. नवजीवन कॉलनी, एन ११) या विवाहीतेला पती व इतर दोघांनी शिवीगाळ करीत छळ केल्याची घटना घडली. सुनीता कुलकर्णी यांच्या तक्रारीवरून पती सतीश दिगंबर कुलकर्णी, त्यांच्या घरी स्वयंपाक करणारी सविता देशपांडे व अनिल देशपांडे यांच्याविरूद्ध सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुचाकीस्वार ठार
कमलाकर पाटील (रा. नवनाथनगर, हडको) हा दुचाकीस्वार शुक्रवारी बजाजनगरवरून शहरात येत असताना अज्ञात वाहनाने त्याला पाठीमागून धडक दिली. या अपघातात पाटील यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी त्यांचे सासरे भिमराव पाटील यांच्या तक्रारीवरून अज्ञात वाहनधारकाविरूद्ध छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
September 16, 2015, 11:49 am
औरंगाबाद : ट्रक चालकाला लुटणाऱ्या चारजणांच्या टोळीतील तिघा आरोपींना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी १९ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश बुधवारी (१६ सप्टेंबर) दिले.
शेंद्रा औद्योगिक वसाहतीत पहाटेच्या सुमारास चौघांनी ट्रक ड्रायव्हरला धमकावत पैसे लुटण्याचा प्रयत्न केला होता. दोन हजार रूपये लुटून चौघे पसार झाले होते. यानंतर काही अंतरावरील हॉटेलजवळ चौघांनी दुसऱ्या ट्रकचालकाच्या दिशेने मोर्चा वळवला. त्याला लुटण्याचा प्रयत्नात असताना क्लिनर व हॉटेलचालकाने आरडओरड करीत चौघांना पकडण्याचा प्रयत्न केला. यातील एका आरोपीला पकडले. या प्रकरणी चौघांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आला. या प्रकरणी अविनाश संजय नरवडे (वय २२, रा. शहानगर), ज्ञानेश्वर विष्णू तांबे (वय २२, रा. दहीहंडेगल्ली, चिकलठाणा), निलेश लक्ष्मण पडधन (२०, रा .रिसोड, जि. वाशीम, ह.मु.कुंभेफळ) हे अटकेत असून, त्यांचा साथीदार कृष्णा वाडेकर (२४, रा. गोशाळा, चिकलठाणा) हा पसार होण्यात यशस्वी ठरला होता.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
September 16, 2015, 11:49 am
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
छावणी टोलनाक्याच्या कंत्राटदाराला एक लाखाची लाच मागणारा छावणीचा नगरसेवक संजय गारोल याला १८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत, तर प्रत्यक्षात लाच स्वीकारणारा गारोल याचा मेहुणा अजय नायडू याला १५ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष न्यायाधीश एस. एल. पठाण यांनी बुधवारी (१६ सप्टेंबर) दिले.
आरोपी नगरसेवक गारोल हा मंगळवारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागासमोर शरण आला. त्यानंतर त्याला बुधवारी विशेष न्यायाधीश पठाण यांच्या कोर्टात हजर करण्यात आले. या प्रसंगी, आरोपी गुन्हा घडल्यापासून फरार होता. त्यामुळे कंत्राटदाराचे त्याचे संबंध कसे होते, याबाबत व एकूणच गुन्ह्याचा तपास करायचा आहे.
'कॅन्टॉन्मेंट अॅक्ट'नुसार आरोपी हा लोकसेवक असल्यामुळे सर्व बाबींची खात्री करून चौकशी करायची आहे. त्यामुळे आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती मुख्य सरकारी वकील एस. एम. पठाण यांनी केली. ही विनंती ग्राह्य धरून विशेष न्यायाधीश पठाण यांनी १८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. तसेच आरोपी अजय नायडू याला १५ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
September 16, 2015, 11:50 am
औरंगाबाद : कोकेनची तस्करी करणाऱ्या तिघा आरोपींना २९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष न्यायाधीश एस. एस. गोसावी यांनी दिले.
शहरामध्ये कोकेनची तस्करी करणाऱ्या गौरव उर्फ गोपाल हरीश शर्मा, किशोर हरीश शर्मा व सुमीत राजूलाल जैस्वाल यांना १३ सप्टेंबर २०१५ रोजी अटक करण्यात आली. त्यांच्याकडून कोकेनच्या १८ पुड्या जप्त करण्यात आल्या. एकूण चार लाख २४ हजार रुपयांचा माल व ४५ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. तेव्हापासून तिघांना पोलिस कोठडीत ठेवण्यात आले होते. पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्यांना बुधवारी विशेष न्यायाधीश गोसावी यांच्या कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी आरोपी पुणे येथून कोकेन आणत होते व याबाबत तपास करायचा आहे, तिघा आरोपींनी कार कुठून आणली, याची माहिती घेण्यासाठी सात दिवसांची पोलिस कोठडीची विनंती सहाय्यक सरकारी वकील सुदेश शिरसाट यांनी केली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
September 16, 2015, 11:51 am
म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पोलिसांनी खंडणीच्या गुन्ह्यात सहा आरोपींना आज बेड्या ठोकल्या. अटक केलेले सर्व आरोपी बाहेरगावचे आहेत. इंजिनीअरिंग, फार्मसीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे. क्रूरपणे त्यांनी दोन तास भाऊसाहेब शेळके याचा छळ करीत मारहाण केली.
पोलिसांनी पकडलेल्या आरोपीमध्ये रणजीत तुपे याची एक मैत्रिण आहे. तिच्या मोबाइलवर शेळकेने मॅसेज केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. या कारणावरून रात्री संगनमत करून त्याचे घरातून अपहरण करण्यात आले. आरोपींपैकी तुषार राहणे हा बीएससीचे शिक्षण घेत असून मूळचा शिर्डीचा रहिवासी आहे. किरण थोटे परळी वैजनाथचा रहिवासी असून त्याचे इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण झाले आहे. संदीप कुटे हा चिखलीचा राहणारा असून, पैठणगेट भागात बँकिंगचे क्लास करतो. रणजित तुपे हा बाभुळगावचा (ता. खुलताबाद) असून, तोदेखील बीएससीचे शिक्षण घेत आहे. गोपाळ इंगळे पडेगावला राहत असून, फार्मसी कॉलेजला आहे. तसेच यांच्यासोबत पकडण्यात आलेला १७ वर्षांचा विद्यार्थी बारावीचे शिक्षण घेत आहे. शेळकेला मारहाण करीत असताना ओम घेवारे याने मोबाइलवर या सर्व छळाची शूटिंग केली.
पोलिसांनी ही शूटिंग ताब्यात घेतली आहे. त्याला सातत्याने बेल्टने मारहाण करण्यात आली. पोलिस निरीक्षक गोवर्धन कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार शेख अन्वर, समद पठाण, प्रकाश डोंगरे, संतोष मुदीराज, योगेश कुलकर्णी, नवनाथ परदेशी यांनी ही कारवाई केली.
झोपेत असतानाच उचलले
सर्व आरोपी गुन्हा केल्यानंतर आपल्या खोलीवरून जाऊन झोपले होते. ही घटना कळताच पोलिसांनी तात्काळ धाव घेत प्रथम भाग्यनगर येथून तुषार व रणजीतला अटक केली. यानंतर अवघ्या दोन तासात त्यांनी दिलेल्या माहितीवरून उर्वरीत आरोपींना ताब्यात घेण्यात आले. या सर्वांना ते झोपेत असतानाच पोलिसांनी गाठले व अटक केली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
September 16, 2015, 11:55 am
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासन लोकप्रिय घोषणा करण्यातच धन्यता मानते, असे अनेकदा समोर आले आहे. हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्या समग्र इतिहास लेखनाची कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी गेल्यावर्षी केलेली घोषणा हवेतच विरली आहे. यावर काम झाले नसल्याने उद्या या इतिहासाचा पहिला खंड प्रकाशित होण्याची शक्यता मावळली आहे.
१७ सप्टेंबर २०१४ रोजी विद्यापीठात माजी कुलगुरू डॉ. जनार्धन वाघमारे यांच्या उपस्थितीत हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनाचा कार्यक्रम झाला. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी अॅड. भगवानराव देशपांडे, लक्ष्मीनारायण जैस्वाल, सुधाकर देशमुख आजेगावकर, चंदताई जरीवाला यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षीय समारोपात कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी हैदराबाद मुक्तीसंग्रामावर समग्र इतिहास लेखन हाती घेण्यात येईल व पुढील वर्षी याच दिवशी पहिला खंड प्रकाशित करू, अशी घोषणा केली. प्रत्यक्षात मात्र वर्षभरात या घोषणेवर कामच झाले नसल्याचे विद्यापीठातील सूत्रांनी सांगितले. हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्या समग्र लेखनाची प्रक्रिया झालेली नसल्याने या खंड प्रकाशनही उद्या होणे शक्य नाही. विशेष म्हणजे हे काम कोणत्या टप्प्यांपर्यंत आले आहे, याची माहितीही प्रशासनाकडे नाही. यामुळे ही घोषणाच हवेत विरण्याची शक्यता आहे.
हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्या समग्र इतिहास लेखनाची प्रक्रिया सुरू आहे. याबाबत आढावा घेऊन सांगतो.
- डॉ. बी. ए. चोपडे, कुलगुरू
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
September 16, 2015, 11:56 am
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जामा मशिदीच्या काशीफुल उलूम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष; तसेच मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे सदस्य मौलाना रियाजोद्दिन फारुखी (वय ७८) यांचे बुधवारी निधन झाले. नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी ते कायम अग्रेसर असत.
मौलाना फारूखी यांच्यावर गेल्या काही महिन्यांपासून सहारा हॉस्पिटल येथे उपचार सुरू होते. त्यांच्यावर रात्री जामा मशीद दफनभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शहरातील मान्यवरांची उपस्थिती होती. त्यांच्या मागे त्यांची पत्नी, पाच मुली, तीन मुले, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. शहरातील बारूदगर नाला येथे राहणारे मौलाना रियाजोद्दिन फारुखी यांचा जन्म १५ जानेवारी १९३७ रोजी जालना जिल्ह्यातील परतूर येथे झाला. परतूरला प्राथमिक शिक्षण, जालनाला माध्यमिक तर, उच्च माध्यमिक शिक्षण औरंगाबादला झाले. लखनौला जामिया नदवत उलूम येथे आलिमतचे शिक्षण झाले. यानंतर औरंगाबादला १९६४पासून काशीफुल उलूममध्ये काम करीत होते. १९६८मध्ये त्यांच्याकडे संस्थेच्या अध्यक्षपदाचा कार्यभार सोपविण्यात आले. मौलाना रियाजोद्दिन यांनी आपल्या कार्यकाळात महिलांसाठी जमियत तयिबात संस्थाही सुरू केली. शिवाय काशीफुल उलूम संस्थेत धार्मिक शिक्षणासोबत कम्प्युटर शिक्षण देण्याचे काम सुरू केले. काशीफुल उलूम अध्यक्षसोबत मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड, पैगाम ए इन्सानियत फोरम, तब्लीम ए जमात उलेमा काउंन्सिलचे ते सदस्य होते. पैगाम ए इन्सानियत व अन्य संस्थांच्या माध्यमातून त्यांनी समाजाला जोडण्याचे काम केले आहे. त्यांच्या कार्यासाठी नांदेड येथे त्यांना 'फक्र ए मराठवाडा' हा पुरस्कार देण्यात आला.
अध्यक्षपदी राबे हसन नदवी
मौलाना फारुखी यांच्या निधनानंतर काशीफुल उलूम या संस्थेच्या अध्यक्षपदी मौलाना राबे हसन नदवी यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
September 16, 2015, 11:57 am
औरंगाबाद : तरुणाशी मैत्री करून त्याचे सामान व दोन हजार रुपये भामट्यांनी पळवले. संदीप लोखंडे (बुलढाणा) हा तरुण शहरातील समर्थनगर भागात एका लॉजमध्ये काम करून महाविद्यालयात बारावीचे शिक्षण घेतो. सोमवारी रात्री गावाकडे जाण्यासाठी तो मध्यवर्ती बसस्थानकात गेला होता. बसला उशीर असल्याने तो तेथे थांबला. यावेळी एका अनोळखी तरुणाने त्याच्याशी मैत्री केली. गप्पा मारल्यानंतर बसची वाट पाहत संदीपला झोप लागली. ही संधी साधून त्या भामट्याने त्याची बॅग व दोन हजार रुपये घेऊन पळ काढला. काही वेळाने संदीपच्या लक्षात हा प्रकार आला. त्याने या तरुणाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र तो सापडला नाही. संदीपने जवळच असलेली बसस्टँड चौकी गाठून हा प्रकार सांगितला. तेथील पोलिसांनी त्याला मदत करण्याऐवजी क्रांतिचौक पोलिस ठाण्यात जाण्याचा सल्ला दिला. तेथेही त्याची दखल घेण्यात आली नाही. अखेर पोलिस आयुक्तालय गाठून संदीपने आयुक्तांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, मात्र गर्दीमुळे त्यांची भेट होऊ शकली नाही.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
September 16, 2015, 11:59 am
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या मराठवाड्याच टंचाईग्रस्त गावांची तहान भागवण्यासाठी एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांमध्ये शासनाने तब्बल १३९ कोटी रुपये खर्च केले, पण पाण्याचा पत्ताच नसताना नवीन बोअरवेल घेणे, नळ योजनांच्या विशेष दुरुस्तीच्या नावाखाली कोट्यवधी खर्च करूनही टंचाई 'जैसे थे' आहे.
जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून आठ जिल्ह्यांत कोट्यवधी रुपये खर्च करून पाणी अडविण्यात येत आहे. कामे पूर्ण झाली तेथे पाणी साठवण्यात आले. त्याचा पाणी योजनांच्या विहिरींना लाभ होत आहे, मात्र अनेक ठिकाणी पावसाचा पत्ताच नसतानाही नळयोजना बोअरवेल्स यांच्या विषेश दुरुस्तीसाठी मोठा खर्च करण्यात आला आहे. अनेक गावांमध्ये पाणीच उपलब्ध नाही. तेथे पिण्याचे पाणी पोचविण्यासाठी टँकरशिवाय पर्याय नाही, त्यामुळे टंचाई निवारणासाठी सर्वाधिक खर्च टँकरवर करण्यात आला आहे. मराठवाड्यात आतापर्यंत महिन्यांमध्ये टँकरवर ६४ कोटी ४ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. सध्या आठ जिल्ह्यांमधील ८८७ गावे व ४०७ वाड्यांना साडेबाराशे टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
४३ कोटी ५५ लाख मिळाले
टंचाईवर मात करण्यासाठी आठ जिल्ह्यांनी विविध उपाययोजनांसाठी खर्च केलेल्या १३९ कोटी ५४ लाख रुपयांची मागणी शासनाकडे केली होती, मात्र शासनाकडून यातील ४३ कोटी ५५ लाख ९७ हजार रुपयांचाच निधी प्राप्त झाला आहे. ९५ कोटी ९८ लाख ३६ हजार रुपयांची मागणी अद्यापही शासनाकडे प्रलंबित आहे.
या उपाययोजनांसाठी झाला खर्च
दुष्काळी कामांमध्ये टँकर, नळ योजनांची विषेश दुरुस्ती, नवीन विंधन विहिरींची दुरुस्ती, नवीन विंधन विहीर घेणे, तात्पुरत नळ योजना योजना, विहीर अधिग्रहण, चर खोदणे, विहिर खोलीकरण, गाळ काढणे, बुडक्या घेणे, हायड्रंट उभारणे आदींवर हा खर्च करण्यात आला आहे. येत्या काळात पाऊस न पडल्यास या खर्चात मोठी वाढ होणार आहे.
टंचाईसाठी जिल्हानिहाय मागणी
औरंगाबाद ः २५ कोटी ३८ लाख
जालना ः ७ कोटी ९० लाख
परभणी ः ४ कोटी ७४ लाख
हिंगोली ः १ कोटी ५७ लाख
नांदेड ः ९ कोटी ९८ लाख
बीड ः २५ कोटी ९३ लाख
लातूर ः ८ कोटी ४ लाख
उस्मानाबाद ः १२ कोटी ४१
एकुण ः ९५ कोटी ९८ लाख
(निधीची मागणी रुपयांमध्ये)
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
September 16, 2015, 12:01 pm
हायकोर्टाने मुदतवाढीचा आदेश रद्द केला
म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुका एका वर्षापेक्षा जास्त काळासाठी पुढे ढकलण्याचा अधिकार राज्य शासनाला नाही, असे मत व्यक्त करून २३ जुलैचा आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. ए. बी. चौधरी व न्या. इंदिरा जैन यांनी रद्द केला. या निर्णयामुळे राज्यातील बाजार समित्या संचालक मंडळाचा कार्यकाल संपून एका वर्षापेक्षा जास्त झालेल्या समित्यांच्या निवडणुका घेण्यात येतील.
कडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सहकार संस्था संघातील मतदार दत्तात्रय रामराव जेवे व महमद अली अब्दुल रहमद पठाण यांनी बाजार समितीच्या निवडणुका पुढे ढकलण्याच्या राज्य शासनाच्या २३ जुलैच्या आदेशाला औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते. कोर्टाने २३ जुलैचा आदेश रद्द करून कडा बाजार समितीची निवडणूक घेण्याचे आदेश खंडपीठाने दिले. याचिकाकर्त्याची बाजू सतीश तळेकर, यांनी मांडली.
दोन वर्षे निवडणूक टाळली
महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियम १९६३मधील कलम १४(३)(ए )च्या तरतुदीनुसार राज्य शासनाला टंचाई, दुष्काळ, पूर, आग व इतर कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे कृषी उत्पन्न समित्याच्या निवडणुका एकदा ६ महिने पुढे ढकलण्याचा अधिकार आहे. जास्तीत जास्त एका वर्षांसाठी समित्याच्या निवडणुका पुढे ढकलता येतात, मात्र कडा कृषी बाजार समितीच्या निवडणुका दोन वर्षांपेक्षा जास्त काळासाठी नैसर्गिक आपत्तीमुळे घेण्यात आल्या नाहीत.
९ मे २०१३ कडा येथील संचालक मंडळाचा कार्यकाळ संपला.
११ ऑक्टोबर २०१३ निवडणूका पुढे ढकलल्या.
१० एप्रिल २०१४ निवडणुका पुन्हा पुढे ढकलल्या.
३१ डिसेंबर २०१४ अंतिम मतदार यादी प्रसिद्ध
२३ जुलै २०१५ तिसऱ्यांदा निवडणूका पुढे ढकलल्या.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
September 16, 2015, 12:04 pm
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मराठवाड्यातील गंभीर दुष्काळाचे सामाजिक भान ठेवत औरंगाबादमधील सार्वजनिक गणेश मंडळांनी दुष्काळग्रस्तांना मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. दरवर्षी लक्षवेधक देखाव्यांची परंपरा असलेल्या गणेश मंडळांकडून यंदा दुष्काळाची तीव्रता दर्शविणारे देखावे सादर केले जाणार आहेत. वर्गणीतून जमा झालेली ठराविक रक्कम खर्च करून उर्वरित दुष्काळग्रस्त निधीमध्ये देण्यात येणार आहे. दरवर्षीचा झगमगाट टाळून साधेपणावरही भर देण्यात येणार आहे.
गेल्या तीन वर्षांपासून मराठवाड्यात दुष्काळ आहे. सर्वच्या सर्व आठ जिल्ह्यांमध्ये गंभीर परिस्थिती आहे. दुष्काळग्रस्तांना मदतीसाठी हजारो हात पुढे सरसावले आहेत. दहिहंडी उत्सवावरही दुष्काळाचे सावट दिसून आले. अवघ्या महाराष्ट्राचा लाडका बाप्पा गुरुवारी भक्तांच्या भेटीसाठी येणार आहे. एरव्ही गणेशोत्सवाची तयारी महिनाभर आधीपासून केली जाते, यावर्षी मात्र दुष्काळामुळे बहुतांश मंडळांमध्ये साधेपणा दिसून येत आहे. जबरे हनुमान, बुरूड समाज युवक गणेश मंडळ, श्री संस्थान गणपती ट्रस्ट या गणेश मंडळांकडून यंदा दुष्काळाचे देखावे सादर केले जाणार आहेत. जबरे हनुमान गणेश मंडळाने यंदा कुठलाही देखावा सादर न करता जमा झालेला दुष्काळग्रस्तांना देण्याचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवादरम्यान रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर विद्युत रोषणाई, सजावट केली जाते. यंदा या झगमगाटाला फाटा देण्यात आला आहे.
श्री संस्थान गणपती ट्रस्ट हे औरंगाबादचे ग्रामदैवत. ट्रस्टच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. गणेशोत्सव काळात दररोज अन्नदान केले जाते. याशिवाय दरवर्षी परंपरा जपणारा संदेश देणारा देखावा सादर केला जातो. यंदा दुष्काळाची तीव्रता सांगणारा सजीव देखावा सादर करण्यात येणार आहे. जाधवमंडी येथील बुरूड समाज युवक गणेश मंडळातर्फे दुष्काळावर देखावा साकारण्यात येणार आहे. सामाजिक भान ठेवून बहुतांश गणेश मंडळांचा यंदा साधेपणावर भर असणार आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
September 16, 2015, 11:45 am
म .टा. प्रतिनिधी वाळूज
वाळूज औद्योगिक परिसरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू तयार करणाऱ्या एका कंपनीतील ८० कामगारांचे पगार न देता व्यवस्थापक (मॅनेजर) रातोरात गायब झाल्याचा खळबळजनक प्रकार बुधवारी (१६ सप्टेंबर) उघडकीस आला आहे. पाच महिन्याचा पगार मिळणार असल्याने मोठ्या आशेने गेलेल्या कामगारांना कंपनीमध्ये सामानच नसल्याचे लक्षात आल्यानंतर धक्का बसला. पोलिसांनी दखल न घेतल्याने ते गुरुवारी कामगार उपायुक्ताकडे दाद मागणार आहेत.
वाळूज एमआयडीसीतील सेक्टर एल-४५ मधील ऑर्बिट इलेक्ट्रॉनिक इंडिया प्रायवेट लिमिटेड या कंपनीत जवळपास ८० कामगार काम करतात. या कामगारांचा एप्रिल महिन्यापासूनचा पगार कंपनी थकला होता. कामगारांनी पगाराची मागणी केल्यानंतर आज देतो उद्या देतो असे करून व्यवस्थापकाने तब्बल पाच महिने वेळ मारून नेली. त्यावर या माहिन्यात आम्हाला पगार द्या असा तगादा लावल्यानंतर कंपनी व्यवस्थापकांने पगार देण्याचे कबूल केले होते. गेल्या पाच महिन्याचा पगार आज मिळेल या आशेने सर्वच कामगार बुधवारी सकाळी अकराच्या सुमाराला हजर झाले. मात्र कंपनी बंद असल्याने त्यांनी बराच वेळ वाट पाहिली. काही कामगारांनी आत जाऊन पाहणी केली असता कंपनीतील सर्व साहित्य गायब असल्याचे दिसले. त्यानंतर कामगारांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. सर्व कामगारांनी याबाबत पोलिस तसेच कामगार आयुक्तांकडे दाद मागण्याचा निणर्य घेतला आहे. पाच महिन्याचा पगार बुडवून कंपनी व्यवस्थापक पळून गेल्याने कामगारांच्या तोंडचे पाणी पळाले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याचे कामगारांनी सांगितले. पोलिसांनी तक्रार न घेतल्याने ते गुरुवारी कामगार उपायुक्त कार्यालयात जाणार आहेत. दरम्यान, कंपनी व्यवस्थापनाची संपर्क होऊ शकला नाही. यावेळी योगेश कदम, संदीप जाधव, राजेंद्र शिनगारे, शुभम मोरे, अरविंद वाटोरे, दत्ता जमदाडे, बापुराव गितगिने, दत्ता धाबे, नारायण खेडकर, अंकुश शिंदे, पल्लवी वनमाळी, विभा यादव आदींनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
September 16, 2015, 11:53 am
nikhil.nirkhee@timesgroup.com
औरंगाबाद : तब्बल सव्वाशे वर्षांपासून शेतातील वारूळाच्या वस्त्रगाळ अर्थात अतिशय बारीक मातीपासून घरीच गणरायाची मूर्ती तयार करण्याची अनोखी परंपरा जपली आहे अन्वीकर कुटुंबाने. या घराण्यामध्ये कुठल्याही स्वरुपातील गणपतीचा फोटो, मूर्ती किंवा काहीही विकत घेतले जात नाही. पहिली ७५ वर्षे रंगहीन मूर्ती तयार केली जात होती, तर मागच्या ५० वर्षांपासून शेंदूर, काही प्रमाणात इको-फ्रेंडली रंगांचा वापर केला जात आहे.
सिल्लोडपासून दहा किलोमीटरवर असलेले अन्वी हे अन्वीकर कुटुंबाचे मूळ गाव. राजूरचा राजुरेश्वर हे या कुटुंबाचे कुलदैवत. त्यामुळे किमान १२५ वर्षांपासून म्हणजेच यादवराव अन्वीकर यांच्या काळापासून ही परंपरा जपली जात असल्याचे कुटुंबीय म्हणतात. कदाचित यापूर्वीदेखील ही परंपरा असू शकते; परंतु त्याबाबतचे धागेदोरे अन्वीकर कुटुंबियांकडे आजतरी नाहीत. ही मूर्ती तयार करण्याची पद्धतही अतिशय निराळी आहे. अन्वी येथे असलेल्या कुटुंबाच्या शेतातील मुंग्यांच्या वारूळातील वस्त्रागाळ म्हणजेच अगदी बारीक मातीमध्ये कापूस टाकून कुटला जातो. त्यानंतर जी माती तयार होते त्याला 'कस्तुरी' म्हटले जाते. अशा 'कस्तुरी'पासून मोरावर बसलेल्या गणपतीची मूर्ती घरच्या घरी तयार केली जाते. या घराण्यामध्ये मोरावर बसलेल्याच मूर्ती तयार केल्या जातात, हेही एक वैशिष्ट्य. ५० वर्षांपूर्वीपर्यंत रंगहीन मूर्ती तयार केली जात होती. मागच्या ५० वर्षांपासून शेंदूर व तेलाचे मिश्रण लावले जात आहे. अलीकडे काही इको-फ्रेंडली रंगही वापरले जात आहेत. गणेशोत्सवातील सातव्या किंवा नवव्या दिवशी येणाऱ्या वामनद्वादशीला कुटुंबातील मूर्तीचे विसर्जन होते. आता कुटुंब विस्तारले आणि औरंगाबाद शहरापर्यंत विविध कुटुंबीय आले आहेत. मात्र, तरीही सहाव्या पिढीपर्यंत हीच परंपरा कायम आहे, असे पाचव्या पिढीचे प्रतिनिधी मुकुंदराव व मधुरा अन्वीकर यांनी 'मटा'ला सांगितले.
हरितक्रांतीचा पहिला प्रयोग
संपूर्ण अन्वीकर कुटुंब हे प्रगतीशील शेतकरी म्हणून प्रख्यात आहे. शेतीतील असंख्य अत्याधुनिक प्रयोग कुटुंबाच्या शेतामध्ये झाले आहेत. यादवराव अन्वीकर यांचे नातू माणिकराव व पणतू कुमारराव हे कृषीरत्न व कृषीभूषण म्हणून प्रख्यात होते. माणिकरावांच्या पुढाकारनेच व तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या उपस्थितीत अन्वीकर यांच्या शेतात १९६५ मध्ये हायब्रीड ज्वारी व कापसाच्या संकरित बियाण्यांचा पहिला प्रयोग झाला, असे कुटुंबीय म्हणतात. सौरउर्जेवरील पेट्रोल पंप सिल्लोडलगतच्या भरारी फाटा येथे मुकुंदराव चालवतात, हेही विशेष.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧