September 23, 2015, 11:37 am
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गोलवाडी बलात्कार प्रकरणात पोलिसांनी गुरुवारी पहाटे तीसगाव येथून चौथ्या आरोपीला अटक केली. या टोळीने यापूर्वी अनेक जोडप्यांना ब्लॅकमेल करीत लुबाडल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली आहे, मात्र याप्रकरणी अद्याप एकही गुन्हा दाखल झालेला नाही. २४ तासात आरोपींना पकडणाऱ्या पथकाला एक लाख रुपयांचे बक्षिस जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली.
सोमवारी रात्री गोलवाडी येथील मैदानात सोळा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला होता. गेल्या दोन दिवसांपासून युद्धपातळीवर पोलिसांची विविध पथके आरोपींचा शोध घेत होती. मंगळवारी दिवसभर संशयितांची चौकशी करण्यात आली. यावेळी तिसगावातील काही संशयित घरी नसल्याचे आढळून आले. या चौघांचा शोध घेऊन रात्री त्यांना अटक करण्यात आली. प्रमुख आरोपी रुपचंद टेकचंद तिरसे (वय ३२), मच्छींद्र विलास गायकवाड (वय ३२) व शेख सत्तार शेख गफ्फार (वय ३४ सर्व रा. तिसगाव) यांचा यामध्ये समावेश होता. बबन छबु सोनवणे (वय ४० रा. तिसगाव) या आरोपीला पहाटे अटक करण्यात पोलिसांना यश आले. आरोपीपैकी सत्तार, गायकवाड, सोनवणे चारचाकी वाहनांवर चालक म्हणून काम करतात. तर प्रमुख सूत्रधार रुपचंद तिरसे याचा दूध विक्रीचा व्यवसाय असून अवैध दारू विक्री देखील करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सोमवारी रुपचंद व गायकवाड येथील जंगलात होते. तर सत्तार व बबन छावणी येथून देशी दारू पिऊन करून घरी गेले होते. यावेळी रुपचंदने सत्तारला फोन करून 'माल आया है' असा कोडवर्ड वापरला. यानंतर बबनला देखील त्याने फोन केला. हे दोघे दुचाकीवर जंगलात गेले. या ठिकाणी मुलीसोबत असलेल्या मुलाला सत्तार व इतरांनी मारहाण केली. नंतर मुलीवर अत्याचार करण्यात आला. चौकशीमध्ये सत्तारने ही माहिती पोलिसांना दिली.
अशी होती टोळीची गुन्ह्याची पद्धत
तिसगाव परिसरातील हे चौघेही आरोपी मद्यप्राशन करणारे आहेत. गोलवाडी जवळच्या जंगलात सैन्यदलाची सायंकाळी सहा वाजेपर्यंत पेट्रोलिंग होते. त्यानंतर तेथे शुकशुकाट असतो. सायंकाळी सहानंतर मद्यधुंद अवस्थेत हे चौघे नेहमी या ठिकाणी येऊन बसत होते. दुचाकीवर जोडपे जंगलात आल्यास त्यांच्यावर यांची नजर असायची. अर्ध्या रस्त्यात दुचाकीचा लाइट बंद झाल्यास हे जोडपे पतीपत्नी नसल्याचे खात्री पटायची. जंगलात गप्पा मारत बसलेल्या जोडप्याला मारहाण करीत हे चौघे ब्लॅकमेल करून खिशातील ऐवज काढून पसार होत होते. आरोपींनीच ही माहिती पोलिसांना दिली. सोमवारी मात्र सामूहिक बलात्काराचा प्रकार या आरोपींनी केला. या आरोपींनी कोणाला लुबाडल्याप्रकरणी अद्याप पोलिसांत कोणताही गुन्हा दाखल नाही, मात्र त्यांनी यापूर्वी असे प्रकार केले आहेत का याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली.
एका लाखाचे बक्षिस
चोवीस तासांत या गुन्ह्याचा छडा लावण्यामध्ये पोलिसांना यश आले आहे. यामध्ये प्रामुख्याने पोलिस उपायुक्त वसंत परदेशी, एसीपी, बाबाराव मुसळे, रमेश गायकवाड, पोलिस निरीक्षक अविनाश आघाव, छावणीचे चंद्रकांत सावळे, वाळूज एमआयडीसीचे रामेश्वर थोरात, सायबरसेलचे एपीआय राहुल खटावकर, गजानन कल्याणकर, प्रशांत आवारे तसेच इतर कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या सर्वांचा एका कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. तसेच एक लाखाचे बक्षिस पोलिस आयुक्तांनी जाहीर केले.
व्हॉट्सअॅपचा ओळखीसाठी वापर
मंगळवारी अनेक संशयितांची पोलिसांनी चौकशी केली. यामध्ये काही रिक्षाचालकांचा देखील समावेश होता. या आरोपींना देखील संशयित म्हणून पकडण्यात आले. यांची ओळख पटविण्यासाठी पिडित मुलीच्या सोबत असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या मोबाइल व्हॉटसअॅपवर तपास अधिकारी फोटो टाकीत होते. मोबाइलमधील हे फोटो या पिडित मुलीला दाखवण्यात येत होते. या संशयितामधूनच तिने फोटोद्वारे रुपचंद तिरसे आणि इतरांना ओळखले व हेच आरोपी असल्याचे निष्पन्न झाले.
ठेकेदार म्हणून चौकशी
आरोपी शेख सत्तार मंगळवारी दुपारीच मद्यधुंद अवस्थेत घरी झोपला होता. पोलिस निरीक्षक अविनाश आघाव साध्या वेशात त्याच्या घरी गेले. त्याच्या कुटुंबियांना आपण ठेकेदार असल्याचे सांगत सत्तार दोन दिवस कामावर आला नसल्याचे सांगितले. यावर त्याच्या पत्नीने सोमवारी तर कामाला गेले होते, असे सांगितले. त्यांना उठवू का, असे तिने विचारल्यानंतर आघाव यांनी नकार देत त्याच्या घरावर पाळत ठेवली. सायंकाळी इतर आरोपी निष्पन्न झाल्यानंतर सत्तारलाच प्रथम उचलण्यात आले.
२४ तासांत आरोपींना अटक करण्यात आली. डीएनए चाचणी तसेच अन्य तपासावर भर दिला जाईल. लवकरच दोषारोपपत्र दाखल करून फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.
अमितेशकुमार, पोलिस आयुक्त
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
September 23, 2015, 11:57 am
म. टा. प्रतिनिधी, लातूर
शहरातील जुने रेल्वेस्थानक ते हरंगूळ रेल्वे स्थानकापर्यंत असलेल्या समांतर रस्त्याला विलासराव देशमुख यांचे नाव देण्याचा एकमुखी ठराव बुधवारी झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत मंजूर करण्यात आला. शिवाजी चौक ते पाच नंबरपर्यंतच्या मुख्य रस्त्याला डॉ. एपीजे अब्दुल कलाम व शिवाजी चौक ते नवीन रेणापूर नाक्यापर्यंतच्या रस्त्याला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचेही मान्य करण्यात आले.
महापौर अख्तर शेख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेत २७ विषयांवर चर्चा करून मंजुरी देण्यात आली. यावेळी रिपाइंच्या नगरसेविका दीप्ती खंडागळे यांचे स्थायी समिती सदस्यत्व व गटनेतेपद मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रद्दबातल केल्याने त्यांच्या जागी पूर्वीचेच गटनेते चंद्रकांत चिकटे यांची नियुक्ती करण्यात आली. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असल्याने चिकटे यांची नियुक्ती स्थगित ठेवण्याची मागणी रिपाइच्या सदस्य दीप्ती खंडागळे यांनी महापौरांकडे केली. यावेळी खंडागळे यांनी सर्वोच्य न्यायालयात आव्हान दिलेल्या याचिकेची प्रत महापौरांकडे सादर केली. परंतु, सर्वोच्च न्यायालयाची कोणतीही सूचना नसल्याने चिकटे यांची निवड झाल्याचे घोषित केले.
यावेळी शहरातील जुने रेल्वे स्थानक ते हरंगूळ रेल्वे स्थानकापर्यंतच्या रस्त्याला विलासराव देशमुख यांचे नाव देण्याची मागणी विलासराव देशमुख सेंटरचे सचिव अॅड. त्र्यंबकदास झंवर यांनी केली होती. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते मकरंद सावे यांनी सदर रस्त्याला नाव देण्याचा ठराव मांडला.
शिवाजी चौक ते पाच नंबरपर्यंतच्या रस्त्याला डॉ. एपीजे अब्दूल कलाम यांचे नाव देण्याचा ठरावही त्यांनीच मांडला. या ठरावास सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकमुखी मान्यता दिली. शिवाजी चौक ते नवीन रेणापूर नाका या रस्त्याला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची मागणी नगरसेविका सपना किसवे यांनी केली. त्या मागणीलाही मान्यता देण्यात आली.
शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालय बांधकामासाठी बारा हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते. हे अनुदान शहरी भागातील शौचालया साठी तुटपुंजे पडत आहे. यासाठी महानगरपालिकेच्यावतीने प्रत्येक शौचालय लाभधारकास पालिकेच्यावतीने तीन हजार असे एकूण १५ हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. शहरातील झाडांचे जतन करण्यासाठी वृक्ष प्राधिकरण स्थापन करून १५ सदस्यांची समिती गठित करण्याचा ही निर्णय झाला. सदस्य संख्येनुसार ही समिती आठ दिवसात गठित होणार आहे.
आठ दिवसांत माहिती द्या
गेल्या वर्षी महानगरपालिका हद्दीत झालेल्या बेकायदेशीर वृक्षतोडीवर काय कारवाई केली, असा सवाल शैलेश स्वामी यांनी आयुक्त सुधाकर तेलंग यांनी केला. त्यावर बराच गोंधळ होऊन स्वामी यांना सदर माहिती लेखी स्वरुपात आठ दिवसांत देण्याचे सांगण्यात आले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
September 23, 2015, 11:59 am
उस्मानाबाद : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियाना अर्थसहाय्य करण्यासाठी चिमुकल्याचे हात पुढे सरसावले आहेत. लोहारा तालुक्यातील कानेगाव येथील नृसिंह बाल गणेश मंडळाच्या चिमुकल्यांनी खाऊसाठीच्या पैशातून जमा केलेली दोन हजार ३३ रुपये ही रक्कम त्यांनी ड्राफ्टद्वारे अभिनेता नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या नाम फौंडेशनला पाठविली आहे.
सहा ते सात वर्ष वयोगटातील चिमुकल्यांची ही मदत निश्चीतच मोलाची तर आहे. त्याशिवाय ही अनुकरनीय अशी आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियाचे जगण सुसाह्या व्हावे यासाठी अभिनेता नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी सुरू केलेल्या अर्थसहाय्य मिशनमध्ये आपलाही वाटा असावा या भावनेनी चिमुकल्यांनी ही मदत दिली आहे. विशाल ताटे, पवन पुरी, प्रकाश काळे, अभिषेक कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलेली ही भुमिका निश्चीतच कौतुकास्पद आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
September 23, 2015, 12:02 pm
म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
गणेश मंडळांच्या वर्गणीतून वायफळ उत्सवी खर्च करण्यापेक्षा दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या बांधवांना मदत करण्यासाठी पुण्यातील गणेश मंडळांचे सुवा कार्यकर्ते पुढे सरसावले आहेत. श्री चिंतामणी ग्रुप आणि श्री साईबाबा मंदिर मंडळ यांच्यावतीने जिल्ह्यातील निराधार, आत्महत्याग्रस्त १०० कुटूंबांना अन्नधान्याच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे केला जाणार आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील मागील चार वर्षांपासून दुष्काळाने मुक्काम ठोकला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर आणि शेतीशी निगडीत असलेल्या इतर व्यावसायिकांची कोंडी झाली आहे. त्यातून मागील नऊ महिन्यात ११३ जणांचा कर्जबळी गेला आहे. एकीकडे दुष्काळाच्या झळा सोसत संकटात अडकलेला शेतकरी आणि दुसरीकडे उत्सवाच्या नावाखाली लाखो रुपयांची उधळपट्टी, असे विरोधाभासी चित्र असतांना पुण्यातील गणेश मंडळांच्या तरूण कार्यकर्त्यांनी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे येत नवा आदर्श घालून दिला आहे.
जिल्ह्यातील निराधार, आत्महत्याग्रस्त, शेतमजूर, विधवा, परित्यक्ता अशा आर्थिक विवंचनेत अडकलेल्या १०० कुटूंबियांना या मंडळाच्यावतीने दोन महिने पुरेल एवढे अन्नधान्य आणि किराणा सामान त्याचबरोबर मायेची उब देण्यासाठी एक ब्लँकेट वाटप केले जाणार आहे. अन्नधान्याबरोबर शेतकऱ्यांच्या दावणीला असलेल्या जनावरांची गैरसोय होऊ नये यासाठी या मंडळातील कार्यकर्ते चारा वाटप देखील करणार आहेत. गुरुवारी सकाळी १० वाजता सारोळा येथे तेर, तावरजखेडा, कामेगाव, पानवाडी, म्होतरवाडी या परिसरातील ३८ लाभार्थ्यांना मदतीचे वाटप केले जाणार आहे. त्यानंतर रूईभर येथे उस्मानाबाद, बेंबळी, केशगाव परिसरातील ३२ लाभार्थ्यांना मदत दिली जाणार आहे. त्यानंतर लोहारा तालुक्यातील वडगाव, बेंडकाळ, धानुरी, सास्तूर आणि लोहारा परिसरातील गरजूंना लोहारा येथे मदतीचा हात दिला जाणार आहे. तुळजापूर तालुक्यातील दहिटणा येथील १३ लाभार्थ्यांनाही यावेळी मदत दिली जाणार आहे. दुष्काळग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी या तरूण कार्यकर्तांनी घेतलेला पुढाकार गणेश मंडळांना दिशादर्शक ठरेल, असा आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
September 23, 2015, 12:04 pm
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कमी पर्जन्यमानामुळे यंदाही मराठवाड्यावर दुष्काळाची छाया कायम असून मराठवाड्यातील ८ हजार ५२२ गावांची हंगामी पैसेवारही ही ६७ पैशांपेक्षा कमी आल्यामुळे शेतकऱ्यांना देण्याच्या मदतीचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्र सरकारच्या नियमाप्रमाणे शेतकऱ्यांना मदत वाटपासाठी सुमारे तीन हजार कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे.
गेल्या तीन वर्षांपासून मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट असून पावसाअभावी खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यंदा खरीप हंगामात ४३ लाख ९३ हजार हेक्टर क्षेत्रापैकी ३९ लाख ७९ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती, तर १ लाख १५ हजार हेक्टर क्षेत्र हे फळबागांचे आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे खरीप हंगामातील बहुतांश पिकांचे नुकसान झाले असून फळबागांनाही फटका बसला आहे. मराठवाडा विभागातील बीड, लातूर, उस्मानाबाद व परभणी जिल्ह्यात कमी पर्जन्यमानामुळे खरीपाच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. महसूल प्रशासनाकडून १५ सप्टेंबर रोजी खरीप हंगामातील हंगामी पैसेवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये ८ हजार ५२२ गावांची पैसेवारी ही ६७ पैशांपेक्षा कमी आली आहे. विभागात खरीपाची ५ हजार ६८४ गावे असून २ हजार ८३८ रब्बीची गावे आहेत. शासन नियमानुसार एकूण लागवडीखाली दोन तृतीअंश किंवा त्यापेक्षा अधिक असल्यास रब्बीची वाट न पाहता पैसेवारी जाहीर करण्याच्या सूचना आहेत.
सुधारित निकषानुसार मदत
यंदा शेतकऱ्यांना सुधारित निकषाप्रमाणे मदत मिळणार असून यानुसार कोरडवाहूसाठी ६ हजार ८०० रुपये प्रतिहेक्टरप्रमाणे मदत देण्यात येणार आहे. ही मदत दोन हेक्टरच्या मर्यादित ठेवण्यात येणार आहे. ५ एकरपर्यंत या मदतीचा लाभ होणार आहे. त्यासाठी सुमारे ३ हजार कोटी रुपयांची आवश्यकता राहणार आहे. केंद्राच्या नवीन निकषानुसार ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले असेल तर ते नुकसान मदतीसाठी पात्र ठरविण्यात येणार आहे. त्यामुळे ८ हजार ५२२ गावांमधील शेतकऱ्यांना मदत मिळू शकते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
September 23, 2015, 12:09 pm
पालिकेचे पथदिवे 'गणपती बाप्पा'च्या विसर्जनापूर्वी उजळणार
म. टा. प्रतिनिधी, जालना
गेल्या तीन वर्षांपासून अंधारात असलेल्या जालना शहरातील पालिकेचे पथदिवे 'गणपती बाप्पा'च्या विसर्जनापूर्वी उजळणार आहेत. गणरायाला तीन वर्षांनंतर पहिल्यांदाच प्रकाशात निरोप देण्यात येणार आहे. पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या अध्यक्षतेखाली ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि महावितरण कंपनीचे अधिकारी व जालन्याच्या नगराध्यक्षा पार्वताबाई रत्नपारखे यांच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेतला.
वीज वितरण कंपनीचे १३ कोटी रुपये जालना पालिकेला देणे आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून पालिका वीज वितरण कंपनीचे पथदिव्यांचे देयके देत नाहीत त्यामुळेच ही रक्कम थकीत होती. जालना शहर तीन वर्षांपासून अंधारात आहे. या संदर्भात 'मटा'ने वृत्त प्रकाशित केले होते. जालना पालिकेला वीज वितरण कंपनीचे १३ कोटी रुपये रक्कम देणे पूर्ण अशक्यच आहे. पालिकेचे वार्षिक उत्पन्न केवळ दहा कोटी आहे, ही बाब पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी ऊर्जा मंत्र्यासमोर मांडली. यासंदर्भात पालिकेला वीज वितरण कंपनीने दंड व्याज साधारण सहा कोटी रुपये माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. उर्वरीत रक्कम हप्ते पाडून भरण्यात येणार आहे.
जालना शहरात सन २००५ पासून रखडलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे, असे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केले. प्रशासकीय मान्यता नसताही माजी मंत्री छगन भुजबळ, राजेश टोपे यांनी या प्रकल्पाचे भूमिपूजन केले आणि त्यानंतर ५५ लाख रुपये कंत्राटदार कंपनी निलेश कानडे ग्रुप पुणे यांना बेकायदेशीररित्या देण्यात आले. यासंदर्भात पालिकेच्या मुख्याधिकारी दीपक पुजारी आणि कंत्राटदार कंपनी निलेश कानडे यांच्या विरोधात कारवाई प्रस्तावित असून त्यात चौकशी करण्यात येत आहे. मात्र, याच सोबत गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या अवस्थेत या कामाला योग्य गती मिळेल,असे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितले.
गोदावरी नदीवरील लोणीसावंगी बंधाऱ्याच्या कामासंदर्भात पाणी उपलब्धता तपासण्यात येत आहे. यासाठी पाणीपुरवठा, जलसंधारण, ऊर्जा व ग्रामीण विकास, परळीचे थर्मल पॉवर स्टेशनचे अधिकारी यांची संयुक्त समिती स्थापन करण्यात आली आहे. एक महिन्यात ही समिती वस्तुस्थिती पाहणी करून शासनाकडे अहवाल सादर करणार असून तो पर्यंत या बंधाऱ्याच्या कामाला स्थगिती आदेश देण्यात आले आहेत. लोणीसावंगी बंधाऱ्यात केवळ अर्धा टीएमसी पाणी धारण क्षमता निर्माण होऊ शकेल. मात्र, प्रत्यक्षात खर्च तीनशे कोटी रुपयांचा होणार आहे.
नुकसानीचे पंचनामे करणार
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत. गणेश महासंघ जालना शहरात तीन हजार मोठी झाडे लावून त्यांचे संगोपन करणार आहे. जालन्यात पुन्हा एकदा मोठी स्वच्छता अभियान मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळेस लोणीकर यांनी दिली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
September 23, 2015, 12:11 pm
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मराठवाड्यात दुष्काळ असून नगर व नाशिक जिल्ह्यात बऱ्यापैकी पाऊस झाला आहे. या पावसाचे पाणी जायकवाडी धरणाच्या वरील भागातील धरणांमध्ये पाणी अडवून ठेवले आहे. जायकवाडी धरणाचे हक्काचे पाणी पश्चिम महाराष्ट्रातील धरणातून सोडावे, असा ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात बुधवारी सभा झाली. अध्यक्ष श्रीराम महाजन, उपाध्यक्ष दिनकर पवार, सभापती विनोद तांबे, संतोष जाधव, सीइओ डॉ. अभिजित चौधरी, अतिरिक्त सीइओ बेदमुथा, कॅफो उत्तम चव्हाण यांच्यासह सर्व अधिकारी, सदस्य उपस्थित होते. मनसे सदस्य डॉ. सुनिल शिंदे यांनी यासंदर्भात मुद्दा उपस्थित केला. जायकवाडी धरणाचे हक्काचे पाणी पश्चिम महाराष्ट्राने अडविले आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण कायद्यानुसार हे पाणी सोडावे असा ठराव सभागृहात मांडला. त्यास सर्व सदस्यांनी अनुमोदन दिले. जिल्यात गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाने मोठे नुकसान झाले. प्रशासनाने दुसऱ्याच दिवशी पाण्याचे टँकर बंद केले. पाऊस झाला म्हणजे पाणी लगेच उपलब्ध होत नाही. हे टँकर पुन्हा सुरू करावेत, अशी मागणी करण्यात आली. पावसामुळे महामार्गासह जिल्ह्यातील तालुके, खेड्यांना जोडणारा एकही रस्ता वाहतुकीस योग्य राहिला नाही. रस्ते दुरुस्तीसाठी ४० कोटींचा प्रस्ताव तयार करून शासनाकडे हा निधी मागावा, अशी मागणी सभापती संतोष जाधव यांनी केली. सदस्यांनी त्यास सहमती दर्शवून पुढील कारवाई त्वरीत करण्यासंदर्भात निर्णय सभेत घेण्यात आला.
उपकराऐवजी दुसरा पर्याय
जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना जिल्हा परिषद उपकरातून प्रत्येकी २० हजार रुपये मदत करण्याचा प्रस्ताव कृषी समितीने मंजूर केला होता. या प्रस्तावास सर्वसाधारण सभेत मान्यता मिळणे आवश्यक आहे. हा प्रस्ताव आजच्या सभेत आला असता उपकरातून अशी तरतूद करता येत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचारी आपल्या पगारातून दुष्काळग्रस्तांना मदत करणार आहेत. त्याचा पर्याय स्वीकारता येईल, अशी चर्चा झाली. पण निर्णय मात्र झाला नाही.
चुकून राहिला असेल
वैजापूर येथील पंचायत समिती कार्यालयात ५३ हजार ९०० रूपये खर्च करून अग्निप्रतिबंधाचे सात यंत्र खरेदी करण्यासंदर्भातील ठराव ठेवण्यात आला होता. ८ सप्टेंबर रोजी झालेल्या सभेमध्ये हा विषय नसतानाही मान्यतेसाठी का ठेवला असा प्रश्न दीपकसिंह राजपूत यांनी उपस्थित केला. त्यावर सभापती विनोद तांबे यांनी 'सिंचनाच्या सुनामीत विषय राहिला असेल' असे सांगून विषय संपविला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
September 23, 2015, 12:12 pm
औरंगाबाद : अवघ्या दोन दिवसांवर बकरी ईद आली असून यावर्षी बोकडाचीच कुर्बानी द्यावी लागणार आहे. त्यामुळे बोकडांच्या किंमतीत दुप्पटीने वाढ झाली आहे. शहरातील चंपाचौक भागात बोल्टन जातीच्या दोन फूट उंचीच्या बोकडाची किंमत २५ हजार रुपये ठेवण्यात आली आहे. ईद-उल-अज्हा अर्थात बकरी ईद निमित्त बोकडाची कुर्बानी देण्याची परंपरा आहे. यावर्षी गोवंश हत्याबंदी असल्याने बोकडांची मागणी वाढलेली आहे. त्यामुळे कुर्बानीच्या बोकडांची किंमत दुप्पटीने वाढलेली आहे. सहा महिन्यांपूर्वी एका बोकडाला तीन ते चार हजार रुपये मोजावे लागत होते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
September 23, 2015, 12:14 pm
वैजापूरः तालुक्यातील बाजाठाण येथे गेल्या गुरुवारी (१७ सप्टेंबर) झालेल्या रमेश भास्कर चाबुकस्वार (वय ४५) या शेतकऱ्यांच्या खुनप्रकरणी वीरगाव पोलिसांनी आतापर्यंत सहा जणांना अटक केली. त्यांना २५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
जमिनीच्या वादातून दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने बाजाठाण शिवरात रमेश चाबुकस्वार यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून ठार मारले. या प्रकरणी वीरगाव पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दखल करण्यात आला आहे. तपास अधिकारी फौजदार भास्कर सोनवणे यांनी दोन दिवसांत सहा जणांना वैजापूर येथे अटक केली. हिंमत नारायण भोसले, श्रीमंत अण्णासाहेब भोसले, अण्णासाहेब नारायण भोसले, रावसाहेब नारायण भोसले, भारत नारायण भोसले व हनुमंत नारायण भोसले, अशी त्यांची नावे आहेत. हे सर्व श्रीरामपूर तालुक्यातील भामाठाण येथील आहेत. न्यायालयाने त्यांना २५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
September 23, 2015, 12:15 pm
म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
राज्य शासनाकडे प्रस्ताव प्रलंबित असताना व नवीन शिक्षणाचा कायदा लागू नसताना जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी यांनी पंचशील बहुउद्देशीय सेवाभावी या अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थेला नोटीस बजावली. या नोटीसला स्थगिती देण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संभाजी शिंदे व न्या. ए. एम. बदर यांनी दिले.
पंचशील बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे चौकासह राज्यात २३० प्राथमिक शाळा आहेत. २००८पासून पंचशील संस्था शाळेला परवानगी मिळावी म्हणून राज्य शासनाकडे प्रस्ताव दाखल करत आहेत. २०१० मध्येही असाच प्रस्ताव सादर केला आहे.
राज्य शासन या प्रलंबित प्रस्तावावर निर्णय घेत नाही, असा आक्षेप याचिकेत घेण्यात आला आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी पंचशील संस्थेला बेकायदा शाळा चालविल्याबद्दल नोटीस बजावली. एक लाख रुपये दंड ठोठावण्यात येईल व शाळा त्वरित बंद न केल्यास प्रत्येक दिवसाला १० हजार रुपये अतिरिक्त दंड वसूल केला जाईल, असे या नोटीसमध्ये म्हटले आहे. या नोटीसला 'पंचशील'ने औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले. ही नोटीस नवीन शिक्षण कायद्यान्वये देण्यात आली.
अल्पसंख्यांक शाळेला हा कायदा लागू नाही, असा निर्वाळा सुप्रीम व हायकोर्टाने दिला आहे. तरीही नोटीस बजावण्यात आली. ती बेकायदेशीर असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. या याचिकेची प्राथमिक सुनावणी झाली त्यावेळी कोर्टाने नोटीसला स्थगिती दिली. याचिकाकर्त्यातर्फे बी. आर. केदार हे, तर शासनातर्फे सुरेखा चिंचोलकर हे काम पाहत आहेत. या याचिकेची सुनावणी १ ऑक्टोबरला होणार आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
September 23, 2015, 12:16 pm
कन्नडः तालुक्यातील सुमारे तीन हजार लोकवस्ती असलेल्या बनशेंद्रा येथे अतिवृष्टीनंतर मलेरियाची लागण झाली आहे. येथील १५ रुग्ण थंडीतापाने फणफणले आहेत. यातील बहुतांश रुग्ण कन्नड येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. दरम्यान बनशेंद्रा गावातील विजय बाळासाहेब घाटगे (वय ४०) यांना डेंगीसदृश्य रोगाची लागण झाली असून त्यांच्यावर औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. बनशेंद्रा हे गाव हतनूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येते. आरोग्य विभागाकडून येथे एक मलेरिया कर्मचारी नियुक्ती असून तो इतर ठिकाणचा चार्ज असल्याचे सांगून वेळ मारून घेत आहे. बनशेद्रा येथे दोन वर्षांपूर्वी एकाचा डेंगीने मृत्यू झाला आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
September 23, 2015, 12:21 pm
कन्नड : उत्सव हे आनंदाने साजरे करावयाचे असतात, त्यास गालबोट लागेल असे कृत्य कोणीही करू नये. गणेश उत्सव मिरवणूक शांततेत काढावी व बकरी ईद शांतेत साजरी करावी, कोणी कायदा हातात घेतल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी दिला. पोलिस अधीक्षकांच्या उपस्थितीत येथे मंगळवारी (२२ सप्टेंबर) शांतता समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत ते बोलत होते. 'गणेश मंडळांनी मिरवणुकीत कोणीही गोंधळ घालणार नाही याची काळजी घ्यावी,' असे आवाहन त्यांनी केले. बैठकीला उपविभागीय
अधिकारी राजीव नंदकर, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रीतम यावलकर तहसीलदार महेश सुधळकर, पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग, नगराध्यक्ष संतोष कोल्हे, उपनगराध्यक्ष साहेबखाँ पठाण, डॉ. डी. डी. शिंदे, गणेश महासंघाचे पवन सोनवणे, अध्यक्ष सुनील नीळ उपस्थित होते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
September 23, 2015, 12:29 pm
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानांर्गत कौशल्य प्रशिक्षण घेण्याऐवजी तब्बल १०९२ अर्ज मंगळवारी महापालिकेच्या विविध वॉर्डांतून महिलांनी नेले होते. हे अर्ज भरून देण्यासाठी बुधवारी पालिका मुख्यालयात गर्दी झाली होती. मात्र, अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरूच केली नसल्याने उपस्थित अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. महिलांना उत्तरे देऊन थकलेल्या अधिकाऱ्यांनी अखेरीस प्रकल्प कार्यालयास कुलूप लावले.
या अभियानांतर्गत कौशल्य प्रशिक्षण घेण्याची मुभा आहे. स्वतंत्र व्यवसाय थाटण्यासाठी कर्जाचीही तरतूद आहे. विविध वॉर्ड कार्यालयात अर्ज घेण्यासाठी काल महिलांची गर्दी झाली होती. अर्ज वाटपाची तारीख निश्चित होती. पण स्वीकारणे कधीपासून आहे, याची माहिती नव्हती. विलंब नको म्हणून महिलांनी बुधवारी सकाळीच पालिका मुख्यालय गाठून प्रकल्प कार्यालयात गर्दी केली. अर्ज स्वीकारण्याबाबत कुठलीच सूचना नसल्याने उपस्थित अधिकारी, कर्मचारी संभ्रमात पडले. हळूहळू गर्दी इतकी वाढली की मुख्य प्रवेशद्वार बंद करून सुरक्षारक्षकांना पाचारण करावे लागले. दरम्यान, प्रकल्प कार्यालयातही गर्दी वाढली. ध्वनीक्षेपकाच्या माध्यमातून महिलांना परतण्याचे आवाहन केले गेले. जमलेल्या महिला पालिकेच्या कारभारावर संतप्त झाल्या. अर्ज दाखल करण्याची तारीख नंतर जाहीर केली जाईल, असे प्रशासनाने सांगितले. दरम्यान वाढलेल्या गर्दीमुळे कामावर परिणाम होत असल्याचे पाहून प्रकल्प विभागातील कर्मचाऱ्यांना दुसऱ्या विभागात हलवून दुपारनंतर चक्क कुलूप लावण्यात आले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
September 23, 2015, 11:30 am
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मध्य प्रदेशातील उद्योगपतीने लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याप्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित तरुणीने सोमवारी पोलिस आयुक्तांची भेट घेतल्यानंतर हे प्रकरण विशेष पथकाकडे चौकशीसाठी देण्यात आले होते. पीडित तरुणी ही मूळ उत्तरप्रदेशातील रहिवासी आहे. सध्या ती औरंगाबादला राहते.
अहमदाबाद येथील कॉलसेंटरमध्ये काम करणाऱ्या तरुणीची दीड वर्षापूर्वी फेसबुकवर वैभव वैष्णव याच्यासोबत ओळख झाली. मध्यप्रदेशातील इंदूर येथे नोकरीला लावून देतो असे सांगत वैष्णवने तरुणीला इंदूरला बोलावून घेतले. लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर १७ सप्टेंबर रोजी वैष्णव औरंगाबादला आला होता. दरम्यान या तरुणीने शहरातील एका हॉटेलात नोकरीला सुरुवात केली होती. १७ सप्टेंबर रोजी देखील वैष्णवने तिच्यावर कारमध्ये अत्याचार केल्याचा आरोप तिने तक्रारीत केला आहे. यानंतर तरुणीने लग्नाबाबत विचारले असता वैष्णवने तिला नकार देत आपले लग्न जमल्याचे सांगितले.
आपली फसवणूक झाल्यामुळे या तरुणीने पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांची भेट घेतली. यानंतर मंगळवारी रात्री सिटीचौक पोलिस ठाण्यात तरुणीच्या तक्रारीवरून वैष्णववर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती सिटीचौक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नागनाथ कोडे यांनी दिली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
September 23, 2015, 11:31 am
म. टा. औरंगाबाद
वाजवी कर वजा करत कर आकारणी केल्याप्रकरणी आणि विविध करदात्यांची माहिती दडवल्याप्रकरणी मंगळवारी सीए असावा ब्रदर्स फर्मची झडती प्राप्तिकर विभागाकडून घेण्यात आली. दुपारी बारानंतर सुरू झालेली तपासणी रात्री दीडपर्यंत सुरू होती. या दहा तासांत विविध कागदपत्रे, फायली, कम्प्युटरची तपासणी करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
असावा यांच्या कॅनॉट प्लेस आणि ठाकरेनगर सिडको भागात फर्म आहेत. या शिवाय त्यांची कॉमर्स करिअर अॅकॅडमी आहे. या सर्व फर्मची मंगळवारी पहिल्यांदाच चौकशी करण्यात आली. हे वृत्त बुधवारी 'मटा'मध्ये प्रसिद्ध होताच शहरातील सर्व सीए फर्मवर केवळ याच बातमीची चर्चा होती. दिवसभर शहरातील अनेक सीएमध्येही यावर चर्चा सुरू होती. द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडियाच्या औरंगाबाद शाखेने या वृत्ताची गंभीर दखल घेतली. दरम्यान, प्राप्तिकर विभागाच्या सूत्रांनी सांगितले की, 'या झडतीविषयी द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट या संस्थेच्या सर्वोच्च मंडळाला सूचित करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर संस्थेच्या औरंगाबाद शाखेचे अध्यक्ष व सचिवांनीही यासंबंधी माहिती घेतली आहे.'
सीए संघटनेकडून दखल
द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडियाच्या औरंगाबाद शाखेनेही या प्रकरणाची दखल घेतली आहे. या प्रकरणी संस्थेच्या सर्वोच्च मंडळाला सूचित करण्यात आले आहे. संस्थेच्या यंत्रणेनुसार संबंधित सीएवर कारवाई होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी त्या संबंधित माणसावरच कारवाई होऊ शकते, संपूर्ण सीए कम्युनिटी या प्रकरणी दोषी नसल्याचे स्थानिक चेअरमन पंकज कलंत्री आणि सचिव रोहन आचलिया यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
September 23, 2015, 11:32 am
वाहनदुरुस्तीच्या नावाखाली केली वाहनविक्री
औरंगाबाद : वाहनदुरुस्ती केंद्राच्या नावाखाली पैठण येथे अवैधरित्या वाहनविक्री केल्याचे आढळल्याने अतुल होंडा आणि मे. रत्नप्रभा मोटर्स यांचा वाहनविक्री परवाना (ट्रेड सर्टिफिकेट) सात दिवसांकरिता निलंबित करण्यात आला आहे. ही कारवाई प्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयाकडून करण्यात आली.
औरंगाबादमधील या वाहनविक्री व्यावसायिकांनी पैठण येथे वाहन दुरुस्ती केंद्र सुरू केले होते. त्या केंद्रांतून नवीन वाहनांची विक्री होत असल्याची तक्रार आरटीओकडे आली होती. त्यावरून पैठण येथे वाहन दुरुस्ती केंद्राची तपासणी करण्यात आली. तेथे विक्रीसाठी आणलेली दहा ते अकरा वाहने जप्त करण्यात आली. संबंधित डिलर्सकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी पैठणध्ये विनापरवानगी व्यवसाय सुरू केल्याचे स्पष्ट झाले. या अहवालावरून अतुल होंडा आणि मे. रत्नप्रभा मोटर्स या दोन व्यावसायिकांचा परवाना सात दिवसांसाठी निलंबित केल्याची माहिती सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी जी. एस. गवई यांनी दिली.
इतरत्र चौकशी
पैठणमधील घटना समोर आल्यानंतर अनेक ठिकाणी दुरुस्ती केंद्रावरून वाहन विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली आहे. यापुढील काळात तालुका पातळीवर विक्री परवान्यांची चौकशी केली जाणार आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
September 23, 2015, 11:34 am
Ravindra.Taksal@timesgroup.com
औरंगाबादः अनधिकृत बांधकाम, रेखाकंन करणाऱ्या दोन विकासकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यास फुलंब्री पोलिस टाळाटाळ करत आहेत. सिडकोचे मुख्य प्रशासक सुनील केंद्रेकर यांच्या आदेशानुसार नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित विकासकांविरुद्ध २४ दिवसांपूर्वी तक्रार दिली. त्यावर तातडीने कार्यवाही होणे अपेक्षित होती. मात्र, अद्यापही गुन्हा दाखल झाला नाही.
झालरक्षेत्रात कोणत्याही प्रकारचे विकासकाम, इमारत बांधकाम, पुनर्विकास, रेखांकन करण्याकरिता सिडकोची परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र, परवानगी न घेता बांधकामे, रेखांकन करून प्लॉटविक्री होत आहेत, अशा तक्रारी सिडकोला प्राप्त झाल्या. या तक्रारींची दखल घेऊन मुख्य प्रशासक केंद्रेकर यांनी सिडकोचे वरिष्ठ नियोजनकार ए. व्ही. उईके, उपनियोजनकार अभिजीत पवार यांच्या पथकाकडे अनधिकृत बांधकामे, रेखांकन शोधण्याची जबाबदारी सोपवली. पथकाने तपासणी करून कायदेशीर प्रक्रिया पार पाडली आहे. जगदंब गृहसंकुल व प्रगती प्रॉपर्टी यांच्याविरुद्ध महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ नुसार (एमआरटीपी) गुन्हे दाखल करण्याचे निर्देश मुख्य प्रशासक केंद्रेकर यांनी दिले. त्यानुसार या विकासकांविरुद्ध फुलंब्री पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
एमआरटीपी अॅक्टनुसार हा फौजदारी गुन्हा कसा ठरतो, त्यासंबंधी माहिती, स्थळ पंचनामा, तेथील छायाचित्र तक्रारअर्जासोबत जोडले आहे. तक्रार देऊन २४ पेक्षा जास्त दिवस उलटूनही पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, सिडकोचा तक्रार अर्ज प्राप्त झालेला आहे; त्यानुसार लवकरच कार्यवाही केली जाईल, अशी माहिती फुलंब्री पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मारोती पंडित यांनी दिली.
प्रकरण काय?
सिडको पथकाने केलेल्या तपासणीत हर्सूल सावंगी परिसरातील गट नंबर ३९ मध्ये जगदंब गृहसंकुल हा ६० रो हाउसचा प्रकल्प व कृष्णापूरवाडी येथील गट नंबर ६६/२ मध्ये प्रगती प्रॉपर्टीने सुरू केलेल्या प्लॉटिंगला सिडकोची मान्यता नसल्याचे उघड झाले. या दोन्ही ठिकाणी सिडकोच्या अधिकाऱ्यांनी स्थळपाहणी तसेच पंचनाम केला. या दोन्ही विकासकांना नोटीस दिली; त्यांना निर्धारित वेळेत म्हणणे सादर करण्याची संधी दिली. मात्र, कोणतेही उत्तर नाही. त्यामुळे गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
September 23, 2015, 11:36 am
औरंगाबाद : मौलाना आझाद शिक्षण संस्थेच्या मराठवाडा अध्यापक महाविद्यालयामध्ये नियमांना तिलांजली देत डॉ. मिर्झा मेहफुझ बेग, खान वाहेदा हरून व डॉ. उर्मिला अतुल परळीकर यांना अवैधरित्या नियुक्ती देण्यात आली. त्यांच्या नियमबाह्य वेतनासह विविध नियमबाह्य कृतींसाठी सरकारी तिजोरीवर डल्ला मारल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे.
मौलाना आझाद शिक्षण संस्थेतील सर्व प्रकारच्या अवैध निर्णयांना संस्थेच्या अध्यक्षा फातेमा झकेरिया या जबाबदार आहेत. विद्यापीठाचे माजी बीसीयुडी संचालक डॉ. ए. जी. खान हे निवृत्त होऊनही फातेमा झकेरिया यांच्यासोबत कार्यरत आहेत. मराठवाडा अध्यापक महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. दोस्त मोहम्मद खान हे २००७ मध्ये निवृत्त झाले. मात्र, आजही ते प्राचार्य म्हणून कार्यरत असून, त्यांचे वेतन मौलाना आझाद शिक्षण संस्थेतून केले जात आहेत. त्यामुळे संस्थेतील सर्व प्रकारच्या नियमबाह्य कृतींमध्ये त्यांचा सहभाग असल्याचेही फिर्यादीमध्ये म्हटले आहे. मौलाना आझाद शिक्षण संस्थेच्या सर्व प्रकारच्या नियमबाह्य कृतींसाठी औरंगाबाद विभागाचे उच्च शिक्षणाचे तत्कालीन सहसंचालक डॉ. ए. व्ही. किर्दक, डॉ. आर. बी. कान्हेरे, डॉ. मोहम्मद फैय्याझ, डॉ. बळीराम पंढरीनाथ लहाने यांनी सरकारी तिजोरीतून अवैधरित्या निधी मिळवून दिला.
उच्च शिक्षण विभागातील वरिष्ठ लिपिक सय्यद फहिमुद्दीन हा त्याच पदावर व त्याच टेबलवर मागच्या २५ वर्षांपासून काम करीत असून, नियमबाह्य प्रकारांमध्ये सहभागी आहे, तर लिपिक व्ही. जी. बल्लाळ याला सर्व प्रकारच्या गैरव्यवहारांची माहिती असूनही उच्चस्तरीय अधिकाऱ्यांपासून त्याने ही माहिती लपवली म्हणून तोदेखील या प्रकरणात दोषी असल्याचे अशोक गोवर्धन गिते यांनी फिर्यादीमध्ये म्हटले आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
September 23, 2015, 11:41 am
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात मृत (एसटी) झालेल्या एका व्यक्तीच्या नावावर चक्क दुसऱ्याच व्यक्तीला नाव बदलून नोकरी दिल्याची बनवेगिरी समोर आली आहे. यासंदर्भात महामंडळाने कोलारकर समितीची स्थापना केली होती. या समितीने केलेल्या चौकशीत आठ जणांनी बनवेगिरी करून नोकरी मिळविल्याचे समोर आले आहे.
औरंगाबाद एसटी विभागात १९९८ ते २००५ याकालावधीत सेवेत असताना मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्यात आली. या भरतीबाबत काही अधिकाऱ्यांनी संशय व्यक्त केला होता. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीसाठी दीड वर्षापूर्वी यंत्रचालन अधिकारी नंदकुमार कोलारकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली होती. त्यात कामगार अधिकारी, सुरक्षा अधिकारी यांचा समावेश होता. या समितीने काही दिवसांपूर्वी विभागीय नियंत्रक आर. एन. पाटील यांच्याकडे अहवाल सादर केला.
औरंगाबाद विभागात अनुकंपा तत्त्वावर आठ जणांनी बनवेगिरी केल्याचे अहवालात म्हटले आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; भाऊराव देशमुख यांच्या जागेवर अरूण भाऊराव देशमुख यांना नोकरी देण्यात आली. या कर्मचाऱ्याचे खरे नाव रामकृष्ण शेकुजी चव्हाण, असे आहेत. त्याचबरोबर नारायण अर्जून सोनवणे या मृत कर्मचाऱ्याच्या नावावर दुर्गादास नारायण सोनवणे यांना नोकरी देण्यात आली आहे. त्यांचे खरे नाव ज्ञानेश्वर भगवानराव मुळे आहे, असे अहवालात म्हटले आहे.
एसटी महामंडळात आठ जणांची नियमबाह्य भरती झाल्याची माहिती अहवालातून समोर आली आहे. या भरती प्रक्रियेत काही जणांनी बनावट कागदपत्रे सादर करून नोकरी मिळविल्याचे अहवालात म्हटले आहे. या अहवालाच्या आधारे संबंधितांवर कारवाई करण्याच्याची शिफारसही चौकशी समितीने केली आहे, असेही या सूत्रांनी सांगितले. दरम्यान, अद्याप एसटी महामंडळाने याप्रकरणी कोणावरही कारवाई केलेली नाही.
अहवालात दोषी आढळलेले कर्मचारी
अरुण भाऊराव देशमुख (रामकृष्ण शेकुजी चव्हाण), दुर्गादास नारायण सोनवणे (ज्ञानेश्वर भगवानराव मुळे), गजानन लक्ष्मण दळवी (गजानन लक्ष्मण दळवी), गजानन जगनाथ जाधव (गजानन हिंमतराव जाधव), ज्ञानेश्वर वाघ (ज्ञानेश्वर सदाशिव जाधव), मनोहर नारायण चव्हाण (मनोहर जयराम तांबेकर), गणेश गायकवाड (गणेश पांडुरंग जैवळ), सुनील वाघमारे (ज्ञानेश्वर एकनाथ ताजने). हे कर्मचारी सध्या विविध आगारांत कार्यरत आहेत.
(कंसात नोकरी मिळविलेल्या कर्मचाऱ्यांचे खरे नाव देण्यात आले आहे.)
भरती करणाऱ्यांवर कारवाईबाबत प्रश्नचिन्ह
कोलारकर समितीने सादर केलेल्या अहवालात, खोट्या कागदपत्रांच्या आधारे भरतीप्रकरणी तत्कालीन विभागीय नियंत्रक, विभागीय कर्मवर्ग अधिकारी (आस्थापना अधिकारी), आस्थापना पर्यवेक्षक आदींच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. या अहवालानंतर भरती करणाऱ्यांवर कारवाई होईल का, असा प्रश्न चर्चेत आहे.
अनुकंपा तत्त्वावरील भरतीप्रकरणाचा चौकशी अहवाल मिळाला आहे. एसटीच्या नियमानुसार दोषींवर कारवाई करण्यात येईल.
- आर. एन. पाटील, विभागीय नियंत्रक, एसटी, औरंगाबाद
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
September 23, 2015, 11:42 am
औरंगाबाद : बेगमपुरा परिसरातील रेणुका कॉलनी व ताजमहाल कॉलनीतील अनधिकृत प्लॉट विक्रीप्रकरणातील आरोपी राजू तनवाणी व राज आहुजा यांचा जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. गोसावी यांनी बुधवारी फेटाळला. त्यामुळे दोघांची हर्सूल कारागृहात रवानगी झाली आहे.
या प्रकरणातील आरोपी तनवाणी व आहुजा हे दोघे हर्सूल कारागृहात न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. त्यांनी नियमित जामिनासाठी सोमवारी अर्ज दाखल केला होता. दोघांच्या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी झाली व दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत कोर्टाने मंगळवारी निर्णय राखीव ठेवला होता. याप्रकरणी कोर्टाने बुधवारी दोघांचे जामीन अर्ज फेटाळल्याने दोघांची रवानगी हर्सूल जेलमध्ये निश्चित झाली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧