November 17, 2015, 11:23 am
Makarand.Kulkarni@timesgroup.com
औरंगाबादः राज्याच्या स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाने एक वर्षांत ३५०० गावे पाणंदमुक्त करून देशात पहिला क्रमांक मिळविला आहे. वर्षभरासाठी २००० गावांचे उद्दिष्ट घेण्यात आले होते. मात्र त्यापेक्षा जास्त गावे पाणंदमुक्त झाली. मुंबई ते गावापर्यंतच्या यंत्रणेचा यात महत्वाचा वाटा आहे.
स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी गेल्यावर्षी मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर वर्षभरात २००० गावे पाणंदमुक्त करण्याचा मानस जाहीर केला होता. त्यासाठी सर्व यंत्रणेला एकत्रित करून त्यांनी भूमिका समजावून सांगितली. प्रधान सचिव ते ग्रामसेवक या साखळीने सर्व जिल्हा परिषदांमधून काही गावे निवडली आणि या गावांमधून प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. त्यामुळे २००० ऐवजी ३५०० गावे पाणंदमुक्त झाली. यासंदर्भात 'मटा'शी बोलताना मंत्री लोणीकर म्हणाले,'मी वर्षभराचे उद्दिष्ट जाहीर केल्यानंतर २३ जिल्ह्यांचा दौरा केला आणि तिथे स्थानिक अधिकारी, पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. ३२५ स्वच्छता अभियानात सहभागी झालो. किती कुटुंबांना स्वच्छतागृहे नाहीत, याचे सर्वेक्षण केले असता तब्बल ५२ लाख कुटुंब अजून स्वच्छतागृहापासून दूर असल्याचे निदर्शनास आले. वर्षभरात जेवढी गावे पाणंदमुक्त झाली त्यातून १४ लाख कुटुंबांची सोय झाली. मात्र इथे थांबता येणार नाही. ग्रामीण भाग पाणंदमुक्तीचे आमचे उद्दिष्ट आहे. २०१९ पर्यंत राज्यातील सर्व गावे पाणंदमुक्त केली जातील.'
सातत्य टिकवावे लागेल
केंद्रीय पातळीवर झालेल्या तपासणी आणि स्पर्धेत देशात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आला आहे. गेल्यावर्षी सर्वाधिक गावे पाणंदमुक्त केल्याबद्दल हा बहुमान राज्याला मिळाला आहे. हरियाणा दुसऱ्या क्रमांकावर असून पंजाबचा तिसरा क्रमांक आहे. पुढील चार वर्षे पहिला क्रमांक टिकविण्यासाठी स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाला सातत्य टिकवून ठेवावे लागणार आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
November 17, 2015, 11:28 am
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
एपिलेप्सी अर्थात अपस्मारावरील शस्त्रक्रियाही अतिशय परिणामकारक असून, ही शस्त्रक्रिया आता राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेमध्ये होणार आहेत. योजनेअंतर्गत शहरामध्ये पुढील आठवड्यात एक शस्त्रक्रिया होणार असून, दुसरी शस्त्रक्रियाही लवकरच होणार आहे. आतापर्यंत शहरामध्ये अपस्माराच्या रुग्णांवर सुमारे दहा शस्त्रक्रिया झाल्या आहेत आणि सर्व शस्त्रक्रिया उत्तम परिणामी ठरल्याची माहिती 'वर्ल्ड एपिलेप्सी डे'निमित्त मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. पांडुरंग वट्टमवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
'एपिलेप्सी डे'निमित्त मंगळवारी 'औरंगाबाद न्युरोलॉजी असोसिएशन'च्या वतीने विविध तत्थे मांडण्यात आली. अपस्माराचे प्रमाण हे एकूण रुग्णांमध्ये ०.१ ते ०.५ टक्के एवढे असून, औषधी-गोळ्यांनी ७० टक्के रुग्णांचा आजार नियंत्रणात येतो, मात्र त्यासाठी योग्य निदान, योग्य औषधी, औषधांचे योग्य कॉम्बिनेशन, औषधांचा योग्य डोस व कालावधी आणि नियमित औषधीसेवनातून ७० टक्के अपस्माराच्या रुग्णांचा आजार १०० टक्के नियंत्रणात येतो. औषधोपचारांचा उपयोग न होणाऱ्या उर्वरित ३० टक्क्यांपैकी १० ते १५ रुग्णांवर शस्त्रक्रिया केली जाऊ शकते आणि अशा शस्त्रक्रियेचे उत्तम परिणाम दिसून येत आहेत. या शस्त्रक्रियेसाठी सुमारे दीड ते दोन लाखांचा खर्च येतो. शस्त्रक्रियेनंतर आजार नियंत्रणात येतो व कमीत कमी औषधींची गरज राहते. काही केसेसमध्ये औषधी बंददेखील होऊ शकते. त्याचवेळी औषधोपचार व शस्त्रक्रियाही शक्य नसलेल्या रुग्णांमध्ये योग्य आहार व काही विशिष्ट उपचारांनी झटके येण्याचे प्रमाण व तीव्रता कमी करता येऊ शकते, असे डॉ. वट्टमवार यांनी सांगितले.
अचूक निदान आवश्यक
अपस्मारचे सुमारे ३५ ते ४० प्रकार असून, रुग्णाला नेमक्या कोणत्या प्रकारचा आजार आहे, याचे निदान संबंधित रुग्णाची 'केस हिस्ट्री', झटके आल्यानंतर प्रत्यक्षदर्शींचे निरीक्षण, उच्च क्षमतेची एमआरआय, ईईजी तपासणीवरून केले जाऊ शकते. यामध्ये 'केस हिस्ट्री' ही सर्वांत महत्त्वाची असून, त्याशिवाय झटके येण्यासाठी मेंदूचा नेमका कुठल्या भाग जबाबदार आहे, हे कळू शकत नाही, असे मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. आनंद सोनी यांनी सांगितले. अलीकडे 'व्हिडिओ ईजी' ही अद्ययावत तपासणीही उपलब्ध झाल्याचे सांगण्यात आले.
आजार दडवून नका
मधुमेह किंवा हृदयविकार असल्यास सांगितले जाते; परंतु अपस्मार असल्यास तो दडवून ठेवण्याची प्रवृत्ती समाजामध्ये अजूनही दिसून येते. ग्रामीणच नव्हे तर शहरी भागांमध्येही ही प्रवृत्ती दिसते, मात्र लवकरात लवकर आजाराचे निदान व उपचार केल्यास उत्तम रिझल्ट मिळतात, अशी माहिती मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. मकरंद कांजाळकर यांनी परिषदेत दिली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
November 17, 2015, 11:41 am
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
तीन दशकांपासून औरंगाबाद महापालिकेत शिवसेना-भाजपची सत्ता आहे. शिवसेना-भाजपच्याच ताब्यात महापालिकेची सत्ता असली पाहिजे यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जीवाचे रान केले होते. मात्र पालिकेला त्यांचाच विसर पडल्याचे सोमवारी जाणवले.
बाळासाहेब ठाकरे यांचा सोमवारी तिसरा स्मृतिदिन होता. राज्यभरात त्यांना आदरांजली वाहण्याचे कार्यक्रम झाले. महापालिकेत मात्र या कार्यक्रमाचा अधिकारी, पदाधिकारी व नगरसेवकांना विसर पडला. शिवसेना-भाजपचे प्रमुख पदाधिकारी शिवसेनाप्रमुखांना आदरांजली अर्पण करण्यासाठी मुंबईला गेले होते, त्यामुळे महापालिकेत कुणीच पदाधिकारी हजर नव्हते. शिवसेनेचे बहुतांश नगरसेवक शहरात होते. त्यांनी आपापल्या वॉर्डात बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली अर्पण करण्याचे कार्यक्रम घेतले. फार कमी नगरसेवक सोमवारी महापालिकेत फिरकले. पदाधिकारी, नगरसेवक नसल्यामुळे ठाकरे यांना आदरांजली अर्पण करण्याचा कार्यक्रमही पालिकेत झाला नाही. महापालिकेच्या मुख्य इमारतीच्या पोर्चमध्ये जयंती-पुण्यतिथीच्या दिवशी थोरा-मोठ्यांचे फोटो ठेवून आदरांजली अर्पण करण्याची परंपरा आहे. या परंपरेत सोमवारी खंड पडला.
आम्ही पदाधिकारी सकाळीच मुंबईत आल्याने तेथे अधिकाऱ्यांनी अभिवादनाची काय तयारी केली याची माहिती नव्हती. अभिवादनाची सर्व तयारी करण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांवर होती. त्यांनी हे का केले नाही, याचा जाब विचारू
- त्र्यंबक तुपे, महापौर
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
November 17, 2015, 11:47 am
५६२ गावे टँकरग्रस्त; ५२६ टँकरद्वारे पाणीपुरवठा
Ramchandra.Vaybhat@timesgroup.com
कमी पर्जन्यमानामुळे नोव्हेंबरमध्येच मराठवाड्यातील ३७३ गावे व १८९ वाड्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून, नागरिकांची तहान भागवण्यासाठी प्रशासनाकडून ५२६ टँकर पुरविण्यात येत आहे. गेल्या वर्षी विभागामध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी टँकरची संख्या दीड हजारांपेक्षाही अधिक झाली होती. त्याचप्रमाणे यंदाही टँकरची आवश्यकता पडणार आहे. सध्या विविध गावांमधुन टँकरची मागणी वाढत आहे.
मराठवाड्यात यावर्षी पुरेसा पाऊस न झाल्यामुळे भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. परतीच्या पावसाचा प्रदेश म्हणून ओळख असलेल्या विभागामध्ये यावर्षी परतीच्या पावसानेही हुलकावणी दिल्यामुळे पाण्याचे नियोजन बिघडले आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या दमदार पावसामुळे औरंगाबाद, जालना, हिंगोली, लातूर जिल्ह्यांमध्ये टँकरची संख्या घसरली होती, मात्र आता या जिल्ह्यांमध्ये टँकरची संख्या वाढवण्यात आली आहे. सध्या बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे, दोन महिन्यांपूर्वी झालेल्या पावसामुळे अनेक बोअर, विहिरींना पाणी आले होते. आता जलसाठ्यांची पातळी घसरत असून, काही तलाव कोरडे पडले आहेत. त्यामुळे गावांची तहान भागवण्यासाठी टँकरची संख्या वाढवण्यात येत आहे. सध्या विभागात ५२६ टँकरने पाणी पुरवठा केला जात असून, सर्वाधिक १४२ टँकर बीड जिल्ह्यात सुरू आहेत. सर्वात कमी जालना जिल्ह्यात २ टँकर सुरू आहे. पाणीटंचाईमुळे प्रशासनाने विभागातील १८२४ खाजगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
टँकरस्थिती
औरंगाबाद ः ७१
जालना ः २
परभणी ः ३३
हिंगोली ः १
नांदेड ः ७७
बीड ः १४२
लातूर ः २५
उस्मानाबाद ः १४०
एकूण ः ५२६
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
November 19, 2015, 11:00 am
म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री
सध्या तालुक्यात रबीची पेरणी जोरदार सुरू आहे. यंदा तालुक्यातील शेतकऱ्यांनी रबीच्या कांदा लागवडीवर लक्ष केंद्रित केले आहे. यावर्षी जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात चांगला पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी देखील जूनच्या पहिल्याच आठवड्यात उरकून घेतली. पेरणीनंतर पिके जोमात आली, परंतु खऱ्या अर्थाने पिकांना गरज होती तेव्हा पावसाने सुमारे दीड ते दोन महीने दडी मारली. दीड-दोन महिन्यानंतर थोड्याफार प्रमाणात पावसाचा शिडकावा होत राहिल्यामुळे पिके तगली, मात्र उत्पादन घटले. गेल्या सप्टेंबर महिन्यात तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने नद्या, नाले वाहिले व तलाव तुडूंब भरले. यामुले शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत असून खरीप गेले तरी रबी जोरात येईल, अशी अपेक्षा आहे. रबीच्या आशेने शेतकरी पेरणी करत आहे. यावर्षी गहू, हरभरा, मका या पिकांसोबतच कांदा लागवडही मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. कांदा लागवडीमुळे शेताची बेवड तर होतेच त्यासोबत उत्पन्न देखील चांगले मिळते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
November 19, 2015, 11:03 am
म. टा. प्रतिनिधी, पैठण
पैठण नगर पालिकेने ६८ लाख रुपये खर्च करून बांधलेला 'मॉडेल' रस्ता सहा महिन्यातच खचला आहे. पालिकेकडे रस्ता तयार करून घेणारी सक्षम यंत्रणा नसल्याने शहरात रस्त्याची निकृष्ट कामे होत आहेत. त्यात जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी शालिवाहन विकास प्रतिष्ठानतर्फे करण्यात आली आहे.
नगराध्यक्षपदी दत्ता गोर्डे यांची निवड झाल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम शहरातील डॉ. लोंढे हॉस्पिटल ते जिल्हा परिषद शाळा गेट या रस्त्याचे काम हाती घेतले. हा रस्ता शहरातील 'मॉडेल' रस्ता होणार असून त्यानुसार अन्य रस्ते तयार करण्यात येणार असल्याची त्यांनी घोषणा त्यावेळी नगराध्यक्षांनी केली होती. या रस्त्यासाठी नगरोत्थान योजनेतून ६८ लाख रुपये खर्च करण्यात आले. जानेवारीमध्ये सिमेंट रस्त्याचे काम सुरू करून ते एप्रिलमध्ये पूर्ण करण्यात आले. सुरुवातीला रस्त्याचा दर्जा उत्तम वाटला पण तो गेल्या महिन्यापूसन खचण्यास सुरुवात झाली आहे. या रस्त्यावर सहा महिन्यातच जागोजागी खड्डे पडले असून डॉ. लोंढे हॉस्पिटलसमोर तो सहा इंच खचला आहे; रस्त्यावर अनेक ठिकाणी भेगा पडल्या आहे.
'नगराध्यक्ष गोर्डे यांनी गाजावाजा करत हा रस्ता 'मॉडेल रोड' ठरणार असल्याची घोषणा केली होती. मात्र तो केवळ सहा महिन्यातच खचत असून नगराध्यक्ष गोर्डे कंत्राटदारावर कोणती कार्यवाही करणार का,' असा प्रश्न शालिवाहन विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयाजीराव सूर्यवंशी व ज्येष्ठ समाजसेवक बंडेराव जोशी यांनी उपस्थित केला आहे. जिल्हाधिकारी यांनीही या गंभीर विषयाकडे लक्ष देण्याची मागणी या दोघांनी केली आहे. याविषयी, पालिकेचे मुख्याधिकारी राहुल सूर्यवंशी यांच्याशी संपर्क केला असता संपर्क झाला नाही.
नगर पालिकेकडे सक्षम यंत्रणाच नाही
नगर पालिकेकडे रस्ते तयार करून घेणारी सक्षम यंत्रणा नाही. तरीही पैठण आपेगाव विकास प्राधिकरणाअंतर्गत पालिकेला कोर्ट रोडचे काम देण्यात आले. कोर्ट रोडचे काम निकृष्ट होत असल्याची तक्रार सतीश आहेर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. यापुढे प्राधिकरणाची कामे नगर पालिकेमार्फत करू नयेत, अशी मागणी जयाजीराव सूर्यवंशी यांनी केली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
November 19, 2015, 11:04 am
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचा परिसर सध्या पिवळाधम्मक दिसत आहे. समितीमध्ये यंदा मका आवक दुपटीने वाढली आहे. व्यापाऱ्यांनी मका वाळवण्यासाठी तो समितीच्या आवारात पसरून टाकाला आहे.
बाजार समितीमध्ये सध्या दररोज किमान १७०० ते २००० क्विंटल मका आवक होत आहे. औरंगाबाद विभागात एकरी २५ ते ३० क्विंटर मका उत्पादन घेणारे शेतकरी आहेत. गेल्या पाच वर्षांत मका लागवड क्षेत्रात वाढ झाल्याचे दिसते. दरवर्षी मका लागवड क्षेत्रात भर पडत आहे. मका क्षेत्र वाढले तरी मका प्रक्रिया उद्योग नसल्याने शेतकऱ्यांना बाजारपेठेतील भावावर अवलंबून राहावे लागत आहे. यावर्षी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात मका आणला जात असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
ओला मका सुकल्यानंतर त्याचे वजन सुमारे २० टक्क्यांनी कमी होते. त्यामुळे एकतर पूर्णपणे ओला मका विक्री केलेला फायद्यात पडतो, किंवा दीर्घकाळ साठवून तीस ते चाळीस टक्के किंमत अधिक मिळते. पण त्यासाठी साठवण क्षमतेची गरज आहे. यंदा आतापर्यंत तरी साठवणूक केलेल्या मक्याला अपेक्षित दर मिळालेला नाही. अनेक शेतकऱ्यांची निराशा झाली. दरवर्षी नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये जादा आवक होत असल्याने नव्या हंगामातील मकक्याला कमी भाव मिळतो. यावर्षी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये किमान १२४० ते १४०० रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळत आहे. यावर्षी खरीप हंगामात तब्बल दीड महिना पावसाने दडी मारल्याने पिकांना फटका बसला. त्यानंतरही मका पीक समाधानकारक असल्याचे सांगण्यात येते.
दोन गोदाम बांधणार
बाजार समितीत दोन गोदाम उभारण्यात येणार आहे. याची क्षमता सुमारे एक हजार टन एवढी आहे. यंदा मका वाळवला जात असताना गोदाम उभारणीची चर्चा रंगली आहे.
यंदा बाहेरच्या जिल्ह्यातूनही मका कृषी उत्पन्न बाजार समितीत आला आहे. त्यावरून मका उत्पादनात वाढ झाल्याचे लक्षात येते. समितीच्या आवारात ओला मका वाळवला जात आहे.
- हरिश पवार, व्यापारी
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
November 19, 2015, 11:06 am
म. टा. प्रतिनिधी, वाळूज
रांजणगाव शेणपुंजी फाट्याजवळ मंगळवारी रात्री चौघांनी एका कामगाराला बेदम मारहाण करून तीन हजार रुपये व मोबाइल हिसकावून घेतला. वाळूज एमआयडीसीत परिसरातील ही १५ दिवसांतील दुसरी घटना आहे. यामुळे कामागरांमध्ये भीती व्यक्त होत आहे.
एआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरी, लुटमारीच्या घटना वाढल्या आहेत. त्यातील एका चोरीच्या घटनेतील आरोपीस पकडण्यास पोलिसांना यश आले असले तरी त्या रोखण्यात अपयश आले आहे. कांही दिवसांपूर्वी औद्योगिक परिसरातील सेक्टर-सी मध्ये दोन तरुणांना पकडून त्याच्या जवळील मोबाइल हिसकावून घेण्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतांना रांजणगाव फाटा ते एनआरबी कंपनी दरम्यान सचिन रावसाहेब शिनगारे (वय २८, रा. लॉजेस्टिक टर्मिनर कंपनी, एफ-सेक्टर ६९ 69) यांना अंधाराचा फायदा घेत मारहाण केली. त्यांच्याजवळील मोबाइल व ३१०० रुपये काढून घेतले. याप्रकरणी चार अनोळखी व्यक्तींविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रवीण पाटील करीत आहेत.
पोलिसाला धडक
वाळूज पोलिस ठाण्याच्या एका पोलिस हेडकॉन्स्टेबलला सकाळी मॉर्निंग वॉक करताना एका भाजीविक्रेत्या दुचाकीस्वाराने धडक दिली. अहमदनगर-औरंगाबाद रस्त्यावर घडलेल्या या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर घाटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. हेडकॉन्स्टेबल भीमराव सुखदेव शेळके हे सकाळी नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. वाळूज जवळील नवीन शिवराई येथे आल्यानंतर मागून येणाऱ्या दुचाकीस्वाराने शेळके यांना जोराची धडक दिली. त्यामुळे दुचाकीस्वारही खाली पडला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वाळूज पोलिसांनी दोघांना उपचारासाठी दाखल केले. या अपघातात शेळके यांच्या पायाला गंभीर इजा झाली असून दुचाकीचालक गंभीर जखमी आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
November 19, 2015, 11:08 am
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
छावणीच्या नगरसेवकांना थेट निधी देण्याऐवजी विकासकामांना चालना देऊन निधी देण्याचा निर्णय छावणी परिषदेने घेतला आहे. शिवाय परिषदेच्या कारभारात पारदर्शकता आणली जाणार आहे. याबद्दल सीईओ कार्यालयाकडून जनजागृतीही केली जाणार आहे.
छावणी परिसरातील एकूण सात वॉर्डात रस्ते, ड्रेनेज, पाणी यासाठी निधी देताना पूर्वी फार अडचणी येत नसे, निधी तत्काळ जात होता. परंतु, त्या निधीतून विकासकामे होण्याची खात्री नव्हती. त्यामुळे अजूनही यापूर्वी देण्यात आलेला विकासनिधी कुठे गेला हा संशोधनाचा विषय आहे. पूर्वीच्या नगरसेवकांनी निधी वापरलाच नाही. दुरुस्तीसाठीचा ३ कोटी रुपयांचा निधी कोठे व कसा वापरण्यात आला, याची माहिती छावणीतील नागरिकांना चांगलीच आहे. यापूर्वीच्या अनुभव लक्षात घेऊन छावणी परिषद आता दुरुस्तीचा निधीही लवकर दिला जात नाही. गेल्या जुलै महिन्यापासून कोणत्याही कामासाठी निधी देतना परिषदेची परवानगी आवश्यक करण्यात आली आहे. त्यामुळे नगरसेवकांना थेट निधी मिळणे यामुळे बंद झाले आहे. यामुळे कामात पारदर्शकता आली असून कामांचे नियोजन करून आराखडाही सादर केला जात आहे. पण सहजासहजी निधी मिळत नसल्याने नगरसेवक नाराज आहेत.
छावणी परिषदेच्या बैठकीत प्रत्येक कामावर चर्चा होते. कामांचा आराखडा आणि अंदाजपत्रक योग्य वाटल्यासच निधी दिला जातो. नगरसेवकांना त्यांच्या हाती थेट निधी देणे बंद झाले आहे.
-पूजा पलिचा, सीईओ
दुरुस्ती निधीमध्ये पूर्वीच्या नगरसेवकांनी भ्रष्टाचार केला आहे. सुमारे ३ कोटींच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा गाजला होता. आता निधीचे वाटप बैठकीत होणार असल्याने पारदर्शकता येईल.
- मयंक पांडे, नागरिक
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
November 19, 2015, 11:09 am
पहिल्या टप्प्यातील दोन गावांमधील भूसंपादन बाकी
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वेगाने काम सुरू असलेल्या सोलापूर-औरंगाबाद-धुळे राष्ट्रीय महामार्गामुळे संपूर्ण मराठवाड्याच्या वाहतुकीचे चित्र बदलणार असले तरी, पहिल्या टप्प्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील दोन गावामधील भूसंपादन अद्याप रखडले आहे. औरंगाबाद ते धुळे या दुसऱ्या टप्प्यासाठी जिल्ह्यातील भूसंपादन प्रक्रिया वर्षभरात पूर्ण होणार असल्याचे उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर यांनी सांगितले.
राष्ट्रीय महामार्गासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील ४४ गावांमधील ५१३ हेक्टरचे भूसंपादन करण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यामध्ये इतर जिल्ह्यांच्या तुलनेत औरंगाबाद जिल्ह्यात भूसंपादनाची टक्केवारी सर्वाधिक आहे. येडशी ते औरंगाबाद या पहिल्या टप्प्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील चितेगाव व चित्तेपिंपळगाव या दोन गावांत इमारती व घरांमुळे भूसंपादन प्रक्रिया रखडली आहे. पहिल्या टप्प्यासाठी टेंडरही काढण्यात आले असून, रस्त्याच्या कामाला सुरुवातही करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील १७ गावांचे निवाडे झाले असून, ८० टक्के भरपाईही वाटप करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यासाठी प्रशासनाकडे प्राप्त ७७ कोटी ८२ लाख रुपयांपैकी ५८ कोटी ६७ लाखांचे वाटप करण्यात आले आहे.
औरंगाबाद-कन्नडदरम्यान होणाऱ्या ८० किलोमीटर महामार्गासाठी ४४ गावांमधील ५१३ हेक्टर जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे. यामध्ये औरंगाबाद १८, गंगापूर ७, खुलताबाद ८, कन्नड ११ गावांचा समावेश आहे. येडशी ते औरंगाबाद या पहिल्या टप्प्यासाठी जिल्ह्यातील १९ तर औरंगाबाद ते धुळे या दुसऱ्या टप्प्यामध्ये जिल्ह्यातील ४४ गावांचा समावेश असून, दुसऱ्या टप्प्यासाठी प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे तर, गावांचे ३ (ड) व त्यानंतर मूल्यांकन करण्यात येणार आहे. या प्रक्रियेसाठी १ वर्षाचा कालावधी लागणार आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी जमिनीच्या चुकीच्या नोंदी असल्यामुळे भूसंपादन प्रक्रियेसाठी अडचणी येत आहेत.
विद्यापीठात आज व्याख्यान
औरंगाबादः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ताराबाई शिंदे स्त्री अभ्यासकेंद्रातर्फे सिमोन दी बोव्हा व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी (२० नोव्हेंबर) अर्थशास्त्र विभागाच्या सभागृहात दुपारी १२ वाजता 'संशोधनातील वैचारिक आकृतिबंधाचे महत्त्व' या विषयावर डॉ. उमेश बगाडे हे मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आवाहन प्रा. निर्मला जाधव यांनी केले आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
November 19, 2015, 11:11 am
पाणी चोरीच्या आरोपाला शेतकऱ्यांचे उत्तर
म. टा. प्रतिनिधी, पैठण
मराठवाड्यातील शेतकरी जायकवाडीचे पाणी परवानगी न घेता चोरून वापरत असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील केल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. पाणी उपसा करण्याचे परवाने दाखवत शेतकऱ्यांनी विखे पाटील यांच्या विरोधात कायगाव टोक येथे प्रचंड घोषणा देत निदर्शने केली.
गंगापूर तालुक्यातील शेतकरी जायकवाडी धरणाच्या मागील भागातून पाणी उपसा करत असल्याचे चित्रण बुधवारी एका खाजगी वृत्तवाहिनेने दाखवले. या बातमीत प्रतिक्रिया देताना विरोधी पक्ष नेते विखे पाटील यांनी कायगाव टोक परिसरातील शेतकरी विनापरवानगी जायकवाडीचे पाणी चोरून वापरत असल्याचा आरोप केला. त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
कायगाव टोक याभागातील पाणी उपसा करणारे शेतकरी परवानगी व वीज बिल भरल्याच्या पावत्या घेऊन गुरुवारी सकाळी जमा झाले. शिवाय अन्नदाता शेतकरी संघटनेचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने जमले होते. शेतकरी व संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विखे यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. 'नगर जिल्ह्यातील काही मंडळी पैशाचा वापर करून मराठवाड्यातील शेतकरी पाणी चोरत असल्याचा आरोप करत आहे, मात्र मराठवाड्यातील शेतकरी हे रितसर परवानगी घेवून नियमानुसार धरणातील पाणी उपसा करत आहे. सध्या पैठण व गंगापूर तालुक्यातील २००० शेतकऱ्यांना पाणी उपसा करण्याची परवानगी आहे. त्या तुलनेत नगर जिल्ह्यातील शेवगाव व नेवासा तालुक्यातील जवळपास ७००० शेतकरी जायकवाडीतून पाणी उपसा करत आहेत, असे जयाजीराव सूर्यवंशी यावेळी बोलताना म्हणाले.
ड्रोन विमानाने शुटिंगचा आरोप
सुरक्षेच्या दृष्टीकोनातून जायकवाडी धरणाचे फोटो काढण्यास व शुटिंग करण्यास बंदी आहे. मात्र, मराठवाड्यातील शेतकरी पाणी उपसा करत असल्याचे दाखवण्यासाठी काही मंडळींनी जायकवाडी धरणाची ड्रोन विमानाने शुटिंग करून वृत्तवाहिनीवर दाखवले. ही गंभीर बाब असून याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्याकडे करण्यात आली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
November 19, 2015, 11:17 am
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
घरगुती कारणावरून शांताबाई छगनलाल परदेशी (रा. वसंत भवन) या महिलेला वसंतीबाई जगदीश परदेशी या महिलेने मारहाण केली. या मारहाणीत शांताबाईच्या आई तुळसाबाई यांच्या डोक्यात वीट लागल्याने त्या जखमी झाल्या. या प्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तरुणाला रॉडने मारहाण
राजेश प्रकाश घोरपडे (रा. चुन्नाभटी, गांधीनगर) याला करण व चिंटू नावाच्या तरुणांनी लोखंडी रॉडने मारहाण केली. सोमवारी रात्री साडेबारा वाजता वसंत भवन जवळील अमित बीयर बारसमोर हा प्रकार घडला. या प्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धक्का लागण्याच्या कारणावरून हाणामारी
धक्का लागण्याच्या कारणावरून दोघांत हाणामारी झाल्याचा प्रकार सोमवारी दुपारी रजिस्ट्री कार्यालयासमोर घडला. या प्रकरणी आरोपी सय्यद मुस्ताक सय्यद शौकत व सय्यद जावेद सय्यद हुसैन यांच्याविरुद्ध सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विवाहितेस घराबाहेर काढले
विवाहित महिलेला मारहाण करून छळ करीत मुलाला हिसकावून घेत तिला घराबाहेर हाकलण्याचा प्रकार गारखेडा भागातील रेणुकानगर येथे घडला. या प्रकरणी संतोष आसाराम शेजवळ, आसाराम, मंगेश व सासूविरुद्ध मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
November 19, 2015, 11:18 am
औरंगाबाद : शहाबाजारमधील मे. आसिफा मेडिकल अँड जनरल स्टोअर्समधून सुमारे ८५ हजारांचा आक्षेपार्ह औषधी साठा जप्त करण्यात आला आहे. दुकानाचे मालक जाकीउर रहेमान खान मुलिउर खान यांच्यावरही अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली आहे. या दुकानाचा परवाना रद्द करण्यात आला होता. तरीही दुकानातून औषधांची विक्री होत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त वि. तु. पौनिकर यांना मिळाली होती. पौनिकर, सहायक आयुक्त रा. वि. झाडबुके यांच्या मार्गदर्शनाखाली एम. जे. निमसे, पी. डी. हरक, एम. के. काळेश्वरकर यांनी तपास करून कारवाई केली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
November 19, 2015, 11:19 am
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
ग्रामीण गुन्हेशाखेच्या पथकाने अट्टल आंतरराज्य दरोडेखोरांच्या टोळीतील चार जणांना जेरबंद केले आहे. १० नोव्हेंबर रोजी या टोळीने लासुर स्टेशनजवळून देशीदारुचा साठा नेणाऱ्या ट्रकवर दरोडा टाकून ट्रकसहित ८०० बॉक्स पळविले होते. २० लाखांचा हा ऐवज दरोडेखोरांकडून जप्त करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी या संदर्भात पत्रकार परिषदेत माहिती दिली.
नांदेड येथील ट्रकचालक किशोर गणपतराव कोटुरवार व त्यांचे सहकारी सचिन गजभारे या दोघांनी १० नोव्हेंबर रोजी नॅशनल ट्रान्सपोर्टमार्फत कोपरगाव येथील संजिवनी देशी दारुच्या ८०० बॉक्सचा साठा ट्रकमध्ये भरला होता. हा माल घेऊन ते नांदेड येथे जाण्यासाठी निघाले होते. यावेळी लासूर स्टेशनजवळील आरापूर शिवारात तीन पल्सर दुचाकीवर आलेल्या दरोडेखोरांनी त्यांना अडविले. त्यांना पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये बसवून ठार मारण्याची धमकी देण्यात आली. तसेच दारुचा साठा असलेला ट्रक, मोबाइल व रोख रक्कम असा २२ लाखांचा ऐवज पळविला होता. या प्रकरणी सिल्लेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यामध्ये कोपरगाव येथील आरोपींचा हात असल्याची माहिती गुन्हेशाखेचे पोलिस निरीक्षक कांचनकुमार चाटे यांना मिळाली होती. या माहितीवरून कोकमठाण, खडकी, नांदगाव व मनमाड आदी ठिकाणी पथके रवाना करण्यात आली होती. या पथकांना यश आले. पोलिसांनी आरोपी अमोल कचरू पानसरे (वय २०) , रवी वाल्मिक चव्हाण (वय २१) व दीपक कन्हेराम पठारे (वय २१, ता. कोपरगाव) यांना अटक केली. या आरोपींनी अन्य चार साथीदाराच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. परळी येथे ट्रक व दारुचा साठा लपवून ठेवला असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. पोलिसांनी परळी गाठून आरोपी परमेश्वर पंडित आघाव (वय २८ रा. दवणापूर ता. परळी) याला अटक करीत हा मुद्देमाल जप्त केला. आरोपीकडून गुन्ह्यातील कार, दोन कोयते देखील जप्त करण्यात आले. ही कारवाई पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी, अप्पर पोलिस अधीक्षक श्री.जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक कांचनकुमार चाटे, सहायक पोलिस निरीक्षक महेश आंधळे,पीएसआय दीपक सरोदे, दिलीप मगरे, संजय खंडागळे, गणेश मुळे, नवनाथ कोल्हे, संजय घुगे, सागर पाटील, शेख जावेद, जगदाळे आदींनी केली.
आठ दिवसात छडा
या टोळीतील दरोडेखोरांवर इतर ठिकाणी देखील गुन्हे दाखल आहेत. यांचा सूत्रधार पसार होण्यात यशस्वी झाला आहे. रस्त्यावर वाहने अडवून लुटमार करण्यात ही टोळी प्रसिद्ध आहे. गुन्हा एका शहरात करायचा व मालाची विल्हेवाट दुसऱ्या शहरात लावायची अशी या टोळीची पद्धत आहे. आठ दिवसांपासून गुन्हेशाखेचे पथक या टोळीच्या मार्गावर होते. त्यांना छडा लावण्यात यश आले आहे.
या दरोडेखोरांच्या टोळीने अन्य ठिकाणी देखील गुन्हे केले आहेत. त्यांच्या पसार झालेल्या साथीदारांना लवकरच अटक करण्यात येईल. तसेच या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.
- नवीनचंद्र रेड्डी, पोलिस अधीक्षक
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
November 19, 2015, 11:21 am
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वडील अपंग, घरात आई एकटीच, मजुरी करून कुटुंबाचा गाडा ओढणारी. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने कृष्णाला शाळा सोडून हॉटेलमध्ये बाल कामगार म्हणून काम करावे लागले. ही परिस्थिती हॉटेलमध्ये गेलेल्या अजिंठा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शंकर शिंदे यांच्या निदर्शनास आली. कृष्णाच्या शिक्षणाचा हक्क हिरावता कामा नये या हेतूने त्यांनी त्याच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणाचा भार उचलण्याचे ठरवित त्याला शिक्षणासाठी दत्तक घेण्याचा निर्णय घेतला.
अजिंठा पोलिस ठाण्याचे ठाणे प्रमुख म्हणून सहायक पोलिस निरीक्षक शंकर शिंदे कार्यरत आहेत. गुरुवारी दुपारी हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना गोळेगाव येथील खुशी हॉटेलसमोर चहा पिण्यासाठी ते थांबले. यावेळी एक १४ वर्षांचा चुणचुणीत मुलगा चहा घेऊन आला. त्यांनी मुलाची आस्थेवाईकपणे चौकशी केली.
कृष्णा गोळेगावचा रहिवासी असून घरी अपंग वडील व आई आहे. दोन एकर शेती आहे, मात्र आईला मजुरी काम करीत उदरनिर्वाह चालवावा लागतो. 'कृष्णा गोळेगाव येथील गजानन विद्यालयात आठव्या इयत्तेत शिक्षण घेत होता. मात्र, परिस्थिती नसल्यामुळे त्याला शाळा सोडणे भाग पडले. दीडशे रुपये मजुरीवर तो रोजंदारीवर हॉटेलमध्ये कामाला लागला.' त्याची ही कहाणी एकूण निरीक्षक शिंदे यांच्यामधील माणूस जागा झाला. त्यांनी हॉटेल मालकाला बाल कामगार कामाला ठेवल्याप्रकरणी चांगलेच खडसावले.
हॉटेलमालकाने आपण कामावर ठेवणार नव्हतो, परंतु कृष्णाच्या आईने विनंती केल्यामुळे कामावर ठेवल्याची माहिती दिली. निरीक्षक शिंदे यांनी कृष्णाशी संवाद साधल्यानंतर त्याने शिकण्याची आवड असल्याचे सांगितले. त्याच्या कुटुंबीयांशी बोलून निरीक्षक शिंदे यांनी त्याच्या पुढील शिक्षणासाठी दत्तक घेण्याचे ठरवले. यावेळी त्यांना हॉटेल मालक तसेच तेथील सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील मदतीचे आश्वासन दिले.
बाल कामगारांना करणार शिक्षणासाठी प्रवृत्त
दिवाळीच्या सुट्या संपल्यानंतर एपीआय शंकर शिंदे अजिंठा पोलिस ठाणे हद्दीतील शाळांमधील मुलांच्या गळतीचे प्रमाण तपासणार आहेत. याचे कारण शोधल्यानंतर प्रतिष्ठीत नागरिक तसेच व्यापाऱ्यांना आवाहन करण्यात येणार आहे. प्रत्येकी एक मुलगा दत्तक घेऊन त्याच्या शिक्षणाचा भार उचलण्याचा त्यांचा पुढील उपक्रम आहे.
मुलांनी शिक्षण घेणे गरजचे आहे. शिक्षण न घेतल्यास मुले अशा बालमजुरीमधून गुन्हेगारीकडे वळतात. यातच त्याना नैराश्य येऊन व्यसनधिनतेकडे वळण्याचे देखील प्रकार घडतात. त्यांच्या शिक्षणाचा हक्क कोणी हिरावून घेऊ नये या विधायक हेतूने कृष्णाला पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी दत्तक घेतले आहे.
- शंकर शिंदे, सहायक पोलिस निरीक्षक, अजिंठा पोलिस ठाणे
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
November 19, 2015, 11:22 am
औरंगाबाद : विष्णुनगर येथील जानकीभाई पटेल हे समर्थनगर येथील विजय मेडिकलवर औषधी घेण्यासाठी गेले होते. यावेळी ते मोबाइल तेथेच विसरले. मोबाइल विसरल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर ते परत समर्थनगर मेडिकल स्टोअर्सवर आले. मात्र, त्यांना त्यांचा मोबाइल आढळला नाही. या प्रकरणी बुधवारी त्यांचा मुलगा मित्तल याने क्रांतिचौक पोलिस ठाणे गाठून गुन्हा दाखल केला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
November 19, 2015, 11:23 am
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पहाडसिंगपुरा फसवणूक प्रकरणातील साक्षीदार शिवाजी कोरडे यांच्या आत्महत्याप्रकरणी आरोपी व नगरसेवक राजू तनवाणी व आरोपी राज आहुजा यांना बुधवारी (१८ नोव्हेंबर) मध्यरात्री अटक करण्यात आली. त्यांना गुरुवारी कोर्टात हजर करण्यात आल्यावर त्यांना ३० नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायदंडाधिकारी पी. व्ही. हिंगणे यांनी दिले. याच प्रकरणात दोघांना बुधवारी जामीन मंजूर करण्यात आला होता; त्यापूर्वीच त्यांना अटक केली.
शिवाजी कोरडे यांचा भाऊ अमर कोरडे यांनी या प्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दिलेली आहे. फिर्यादीनुसार, पहाडसिंगपुरा भागातील गट क्रमांक ९९/१, ९९/२ येथील जमिनीविषयी ख्याजा अमिनोद्दीन व माधवराव माणिक सोनवणे यांचे जागेसंबंधी वाद सुरू होते. दोघांनी राजू तनवाणी व राज आहुजा यांच्याविरुद्ध जबाब देण्यासाठी शिवाजी कोरडे यांच्यावर दबाव आणला होता, तर तनवाणी व आहुजा यांनी जबाब दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली होती. या दबावाला कंटाळून शिवाजी कोरडे यांनी ६ नोव्हेंबर २०१५ रोजी आत्महत्या केली. पहाडसिंगपुरा प्रकरणातील शिवाजी कोरडे हा महत्वाचा साक्षीदार होता, असेही फिर्यादित म्हटले आहे. त्यावरून आरोपींवर गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, पहाडसिंगपुरा फसवणूक प्रकरणामध्ये दोघांना बुधवारी प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. जामीन होण्यापूर्वीच पोलिसांकडून हस्तांतरणाचा अर्ज सादर करण्यात आला होता. त्यामुळे दोघांना जामीन होण्यापूर्वीच बुधवारी रात्री साडेबाराच्या सुमारास अटक करण्यात आली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
November 19, 2015, 11:24 am
औरंगाबाद : उधार दिलेल्या मालाचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या दुकानदाराला ग्राहकाने मारहाण केल्याचा प्रकार मंगळवारी रात्री दहा वाजता काल्डा कॉर्नर येथे घडला. या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनेश ताराचंद जांगीड (वय २७ रा. सारा प्राईड, काल्डा कॉर्नर) या तरुणाचे प्लायवूड विक्रीचे दुकान आहे. प्रतापनगर येथील विजय साळवे याला त्याने प्लायवुड दिले होते. त्याचे पैसे मागण्यासाठी दिनेश गेला होता. यावेळी साळवे याने पैसे देण्यास नकार देत शिवीगाळ करीत दिनेशच्या वडिलांना मारहाण करीत ठार मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर दिनेशने पोलिस ठाणे गाठून आरोपी विजय साळवेविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल केला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
November 19, 2015, 11:25 am
फोटो काढण्याच्या बहाण्याने २१ हजारांचा ऐवज लंपास
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जेष्ठ नागरिक दांपत्याच्या घरात घुसून २१ हजाराचे दागिने दोन भामट्यांनी लंपास केले. एन-३ भागात बुधवारी भरदिवसा हा प्रकार घडला. सरकारी योजनेसाठी फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटे घरात घुसले. ३० ऑक्टोबर रोजी अजबनगर येथे घडलेल्या घटनेची ही पुनरावृत्ती असून या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंपालाल भिवराज रुनवाल एन-३ मधील प्लॉट क्रमांक ३३२ येथील बंगल्यात कुटुंबीयासह राहतात. बुधवारी दुपारी पावणेबाराच्या सुमारास चंपालाल रुनवाल व त्यांची पत्नी दोघेच घरी होते. यावेळी दोन अनोळखी व्यक्ती त्यांच्या घरात शिरल्या. (वय ३० वर्ष ते ५३ वर्ष.) आम्ही तहसील कार्यालयातील कर्मचारी आहोत, अशी थाप त्यांनी मारली. जेष्ठ नागरिकांना शासनाकडून १२०० रुपये दरमहा मिळणार आहेत. त्यासाठी फोटो काढण्यासाठी आलो असल्याचा बनाव त्यांनी केला. या दोघांना बोलण्यात गुंतवून एकजण त्यांना फोटो काढण्यासाठी किचनमध्ये घेऊन गेला. या दरम्यान दुसऱ्या भामट्याने कपाटातील रोख रक्कम व सोन्याचांदीचे दागिने असा एकूण २१ हजार ३०० रुपयांचा ऐवज काढून घेतला. यानंतर दोघेही भामटे पसार झाले. काही वेळाने हा प्रकार रुणवाल यांच्या लक्षात आला. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजबनगर येथील घटनेची पुनरावृत्ती
अजबनगर येथे ३० ऑक्टोबर रोजी अशाच पद्धतीचा गुन्हा घडला होता. येथील त्रिंबकराव काळे व त्यांच्या पत्नी निर्मलाबाई यांनाही फोटो काढण्याच्या बहाण्याने दोन भामट्यांनी लुबाडले होते. त्यांचे सहा तोळ्यांचे दागिने या घटनेत लंपास करण्यात आले होते. या प्रकरणी क्रांतिचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस अयशस्वी
अजबनगर येथील घटनेचा अद्याप तपास लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही. याच पद्धतीने एन-३ सारख्या उच्चभ्रू वसाहतीमध्ये भामट्यांनी जेष्ठ नागरिकांना लुबाडत पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे. या प्रकरणात इराणी टोळी असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
November 19, 2015, 10:30 am
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे यांनी केलेले परदेश दौरे आणि महापालिकेच्या अस्थापनेवर त्यांचा करण्यात आलेला समावेश या संदर्भात आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी स्वतः चौकशी करून अहवाल सादर करावा, असे आदेश महापौर त्र्यंबक तुपे यांनी दिले. केंद्रेकरांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घालण्याची ग्वाही दिली आहे.
डॉ. नाईकवाडे यांनी केलेल्या परदेश दौऱ्यांना महापालिकेची परवानगी होती का, त्यांनी केलेल्या दौऱ्यांमुळे महापालिकेला व पर्यायाने शहराला काही लाभ झाला आहे हा प्रश्न राज वानखेडे यांनी सभागृहात विचारला. त्यावर सभागृहनेता राजेंद्र जंजाळ यांनी या प्रकरणी लेखा व आस्थापना विभागाकडून खुलासा घेण्याची मागणी केली.
त्यावर बोलताना मुख्य लेखाधिकारी अशोक थोरात यांनी डॉ. नाईकवाडे यांच्या परदेश दौऱ्याची फाईल त्यांच्याकडे आल्याचे सांगितले. 'डॉ. नाईकवाडे यांनी दौऱ्यासाठी एक लाख १५ हजार रुपयांची अनामत घेतली असून खर्च मात्र १ लाख २७ हजार रुपये झाला,' असे उत्तर दिले. हा कॅनडा दौरा अधिकृत होता का, त्यांनी सर्वसाधारण सभेची मान्यता घेतली का, ड्रेनेज-चोकअपच्या कामासाठी दोन- पाच हजार रुपये खर्च करताना आम्हाला नियम दाखवले जातात. मग परवानगी न घेता दौऱ्याला जाणाऱ्या अधिकाऱ्यासाठी लाखो रुपये कसे मंजूर होतात, असा प्रश्न वानखेडे यांनी उपस्थित केला.
नंदकुमार घोडेले म्हणाले, सर्वसाधारण सभेसमोर या दौऱ्याचा विषय यायला हवा होता. त्यांच्या दौऱ्याचे फलित काय हे देखील समोर आले पाहिजे. स्थायी समितीने फक्त खर्चाला मंजूरी दिली, दौऱ्याला जाण्यासाठी सर्वसाधारण सभेची मंजूरी घेणे गरजेचे होते. राजू शिंदे म्हणाले, डॉ. नाईकवाडे यांनी केलेल्या दौऱ्याबद्दल अस्थापना विभागाला माहिती नसेल तर हा दौरा अधिकृत कसा मानायचा. यावर डॉ. नाईकवाडे यांनी खुलासा करण्याचा प्रयत्न केला. पण ते समाधानकारक खुलासा करू शकले नाहीत.
डॉ. नाईकवाडे यांना महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्यात आले, ही बाब देखील असंवैधानिक आहे, असा मुद्या घोडेले, वानखेडे यांनी मांडला. तेव्हा परदेश दौरा व महापालिकेच्या सेवेतील डॉ. नाईकवाडे यांचा समावेश याची चौकशी स्वतः आयुक्तांनी करावी, असे आदेश महापौरांनी दिले.
टीडीआर प्रकरणी देशमुखांना बोलाविले
जागा ताब्यात न घेता व पीआर कार्डावर नोंद नाही याची खातरजमा न करता महापालिकेच्या नगररचना विभागाने टीडीआरचे वाटप केले, असा मुद्या नगरसेवक राज वानखेडे यांनी मांडला. त्यांनी या संबंधीची तीन उदाहरणे सर्वसाधारण सभेत कागदपत्रासह मांडली. नगररचना विभागाचे काम कसे 'डोळे बंद करून' सुरू आहे याचा भांडाफोड त्यांनी केला. तेव्हा टीडीआरच्या सर्व प्रकरणांची माहिती घेऊन माझ्या कडे या, असे आदेश आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी प्रभारी सहायक संचालक ए. बी. देशमुख यांना दिले. या सर्व प्रकरणात आपण स्वतः लक्ष घालू, असे त्यांनी सभागृहात सांगितले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧