हायकोर्ट, पोलिस आयुक्त, महापालिकेचे आदेश धुडकावून शहरात पुन्हा एकदा शुभेच्छांचे फलक झळकत आहेत. चौकाचौकात व महत्त्वाच्या ठिकाणी असे फलक लावण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र, हे आदेश धाब्यावर बसविल्यामुळे शहरात होर्डिंगचे साम्राज्य निर्माण होत आहे.
वाढदिवस, नूतनवर्ष यासह विविध उपक्रमांचे आणि कार्यक्रमांचे होर्डिंग चौकाचौकांमध्ये, मुख्य रस्त्यांच्या बाजूला लावण्यास कोर्टानेच मनाई केली आहे. कोर्टाच्या या आदेशाची अंमलबजावणी राज्याची राजधानी असलेल्या मुंबईपासून केली जाते. औरंगाबादमध्येही दोन वर्षांपूर्वी तत्कालीन पोलिस आयुक्त संजयकुमार यांच्या पुढाकाराने ही कारवाई करण्यात आली. पोलिस आणि महापालिका प्रशासन मिळून विविध चौकांमधील व रस्त्यांच्या बाजूला लावण्यात आलेले होर्डिंग काढून टाकण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यामुळे औरंगाबाद शहर होर्डिंगमुक्त झाले होते. आता पुन्हा या शहरात होर्डिंगचे साम्राज्य निर्माण होऊ लागले आहे. सामाजिक कार्यकर्ते सचिन राठी यांनी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्याने शहरात महत्त्वाच्या ठिकाणी भलेमोठे होर्डिंग लावले आहेत. उड्डाणपूल, पैठणगेट, गुलमंडी अशा महत्त्वाच्या ठिकाणी हे होर्डिंग पाहण्यास मिळतात. या होर्डिंगच्या संदर्भात पालिकेच्या मालमत्ता विभागातून मिळालेल्या माहितीनुसार या विभागातून होर्डिंग लावण्यासाठी कोणालाही कोणत्याही प्रकारची परवानगी देण्यात आली नाही. तर सचिन राठी यांनी मात्र आपण परवानगी घेऊनच होर्डिंग लावले आहेत. ज्यांना परवानगी दाखवणे गरजेचे होते त्यांना दाखवली आहे,
असे उत्तर दिले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट