म. टा. प्रतिनिधी, लातूर
लातूर शहरासाठी कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजनेसाठी उजनी धरणात पाणीसाठा आरक्षित करण्याचा ठराव लातूर महापालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला.
शहरातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांसाठी महापालिकेची विशेष सभा बोलविण्यात आली होती. ही सभा सोमवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर अख्तर शेख होते. या वेळी महापालिका आयुक्त सुधाकर तेलंग यांनी पाणीसाठ्याची स्थिती, करावयाची उपाययोजना सभेपुढे मांडली. आयुक्त म्हणाले, 'मांजरा धरणात २.५ दशलक्ष घनमीटर पाणी शिल्लक असून, ते फेब्रुवारीपर्यंत पुरेल. साई व नागझरी बंधाऱ्यातील पाणी संपले आहे. मांजरा धरण आणि नागझरी बंधाऱ्यात चर खोदून पाणी शोधले जात आहे. भूवैज्ञानिकांच्या अहवालानुसार पाणी लागण्याचा अंदाज आहे.'
शहराला लोकसंख्येच्या प्रमाणात दररोज ६६ दशलक्ष घनमीटर पाण्याची गरज आहे. मात्र दर दहा दिवसांनी नळाद्वारे पाणी दिल्याने सध्या २३ दशलक्ष घनमीटर पाणीपुरवठा केला जात आहे. शासनाकडे उस्मानाबादच्या योजनेतून उजनीचे आठ दशलक्ष घनमीटर पाणी आणण्याचा प्रस्ताव दिला आहे. निम्न तेरणा धरणातून आठ दशलक्ष घनमीटर पाणी आणण्यासाठी २७ कोटी रुपयांची योजना प्रस्तावित आहे. त्याशिवाय भंडारवाडी धरणाच्या जुन्या योजनेतून दीड दशलक्ष घनमीटर पाणी मिळण्याची आशा आहे. शहराला कायमस्वरूपी पाणी योजना होण्यासाठी उजनी धरणातील पाण्यावर लातूर शहरासाठी आरक्षण करणे आणि ६८८ कोटी रुपयांची योजना मंजुरीसाठी पाठविणे आवश्यक आहे, याकडेही लक्ष वेधण्यात आले.
आयुक्ताच्या निवेदनानंतर सर्वपक्षीय नगरसेवकांनी अनेक सूचना केल्या. त्यानंतर सभागृहाने उजनीचे पाणी लातूरला आणण्यासाठी पाण्याचे आरक्षण आणि थेट पाइपलाइनचा प्रस्ताव अमृत योजनेतून सादर करण्याचा ठराव एकमताने मंजूर केला. त्याच सोबत निम्न तेरणा प्रकल्पातून पाणीपुरवठा योजना हाती घेण्यासाठी ही सभागृहाने मंजुरी दिली. विंधन विहिरीची खोली २०० फुटावरून ४०० फुटापर्यंत वाढविण्यासाठी विशेष बाब म्हणून सवलत देण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली. या वर्षातील पाणी टंचाईच्या काळात १०० टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी ४२ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यासही या वेळी मंजुरी देण्यात आली.
या वेळी माजी महापौर स्मिता खानापुरे आणि इतर नगरसेविकांनी सभात्याग करून सभागृहातील सततच्या गोंधळाला चाप लावण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्यानंतर सभागृह सुरू झाले आणि सुरळीत कामकाज झाले. या वेळी झालेल्या चर्चेत लक्ष्मण कांबळे, चंद्रकांत चिकटे, दीपक सुळ, रवी सुडे, शैलेश स्वामी, सुरेश पवार, सपना किसवे, राजकुमार जाधव, डॉ. रुपाली साळुंके यांनी सक्रिय सहभाग घेतला.
मीटरवरून गोंधळ
शहरातील नळाला मीटर बसविण्याचा प्रस्ताव सभाहाने फेटाळून लावला. नळाद्वारे सध्या पाणी देता येणार नाही, पाणीच नाही तर मीटर कशाला? असा प्रश्न उपस्थित केला. तर, जनक्षोभ वाढेल म्हणून काही नगरसेवकांनी मीटरला विरोध केला असल्याचे सभागृह नेते नरेंद्र अग्रवाल यांनी सांगितले. चार तास किंवा अधिक पाणी येते अशा ठिकाणीच मीटर बसविण्याचा प्रस्ताव असल्याचे ते म्हणाले. मीटर महापालिकेकडून घ्यायचे की स्वता: खरेदी करायचे, याची मुभा नळधारकाला देण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही अग्रवाल यांनी स्पष्ट केले. मात्र, विरोधी पक्षांचा मीटरला विरोध नाही, तर त्याच्या खासगीकरणाला विरोध असल्याचे विरोधी पक्षनेते मकरंद सावे यांनी सांगितले. मीटरच्या व्यवहारात नरेंद्र अग्रवाल यांनी दलाली घेतली असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राजा मणियार यांनी केला आणि त्यानंतर प्रचंड गोंधळ झाला. आरोपाला प्रत्युत्तर देताना नरेंद्र अग्रवाल म्हणाले, 'मणियार यांनी त्यांनी केलेले आरोप सिद्ध करून दाखवावेत. मी त्यांना पाच कोटी रुपये दंड देऊन, वाटेल ती शिक्षा भोगण्यास तयार आहे.'
६६ दशलक्ष घनमीटर
लातूर शहराला दररोज आवश्यक पाणी
२३ दशलक्ष घनमीटर
दहा दिवसांआड पुरवठ्यामुळे मिळणारे पाणी
रु. ६८८ कोटी
उजनी-लातूर पाणीपुरवठा योजनेचा खर्च