म. टा. प्रतिनिधी, लातूर
शाश्वत शेती करायची असेल तर मृद व जलसंधारण करून भूजल पातळी वाढविणे गरजेचे आहे. माती व पशुधन यांच्या संवर्धनाकरिता दीर्घकालीन चारा नियोजन करण्यासाठी लातूर तालुक्यातील हरंगुळ (बु) गावातील युवकांनी पुढाकार घेऊन लोकवाट्यातून जलयुक्त शिवार योजनेतंर्गत नाला सरळीकरण, रुंदीकरण व खोलीकरणाचे २५ किलो मीटरचे लांबीचे काम यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. यापुढे चालून त्यांनी नाल्याच्या बाजूला अभिनव उपक्रमतंर्गत वनराई निर्माण करण्याचे कार्य हाती घेतले आहे.
या योजनेसाठी गावातील पोलिस पाटील सूर्यकांत पाटील, संतोष शेळके, गोविंद शेळके, शाम बरुरे, भीमा झुंजारे, महेश पाटील, दयानंद पाटील, रामचंद्र सुडे, सुधीर पाटील, गणेश पाटील, कपील बरुरे, राजकुमार वाघमारे, राम वाघमारे, राम बिर्ले, बालू कैले, विरभद्र लोखंडे, युवराज माळी, विकास कांबळे, वाल्मिक कांबळे, युवराज खरोसे, अमित वाघमारे, दत्ता वाघमारे या युवकांनी परिश्रम घेतले. शासकीय व राजकीयस्तरावर सर्वतोपरी प्रयत्न करुन १० कोटी रुपयांचा आराखडा तयार करुन त्यांच्या मंजुरीसाठी प्रयत्न केले जात आहेत. नाल्यांच्या बाजूला झाडे लावून निर्माण केलेल्या नाल्यातील पाण्याचा थेंब ना थेंब याच भागात जिरवण्या बरोबरच हे नाले अधिक काळ टिकून रहावेत यासाठी ही संकल्पना राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी त्यांना शासकीय पातळीवर कृषी अधिकारी सूर्यकांत लोखंडे यांनी ही मार्गदर्शन आणि वेळोवेळी शासनस्तरावर वेगवेगळ्या योजनांची माहिती देऊन त्यांच्या पुर्ततेसाठी पाठपुरावा केला आहे.
वनराईमुळे पर्यावरण पूरक व शेतकऱ्यांना उत्पन्न देणाऱ्या वृक्षांची लागवड या नाल्याच्या सभोवती केली जाणार आहे. एकूण ५० किलो मीटर अंतरात ही वृक्ष लागवड करणे अपेक्षीत असून त्यासाठी ३ कोटी ४५ लाख रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार हा आरखडा मंगळवारी जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्या समोर सादर करून त्यास मंजूरी घेण्यासाठी हरंगुळ गावात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार पोले यांनी गावातील सर्व उपक्रमांचे कौतुक करून या आराखड्यास मंजूरी देण्यासाठी शासनस्तरावर आपण अधिका-अधिक प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन ही दिले आहे.
जलयुक्त शिवारच्या कामासाठी लोकवाट्या शिवाय जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनीही निधी दिल्याची माहिती सूर्यकांत पाटील यांनी दिली. त्यापैकी लातूरचे खासदार डॉ. सुनील गायकवाड यांनी १० लाख, आमदार अमित देशमुख यांनी १२ लाख रुपये तर आमदार दिलीपराव देशमुख यांनी त्यांच्या निधीतून ५ लाख रुपयांचा निधी दिला आहे. त्याशिवाय गावातील अगदी इतरांच्या शेतात मजुरी करणाऱ्या गजानन माळी सारख्या मजुरांनीही पाचशे रुपयांपासून ते अगदी लाखो रुपयांपर्यत लोकवाटा दिला आहे.
जलयुक्त शिवारच्या झालेल्या कामाचा गौरव करून हरंगुळ गावाचा जलयुक्त शिवार योजनेत समावेश करण्याकामी मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांच्या सहकार्यामुळे या कामासाठी प्रोत्सहनपर ५० लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्र्यानी मंजूर केलेला आहे.
कृषी अधिकारी लोखंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार गावातील पाणी टिकवण्यासाठी रिचार्ज शाफ्ट बोअर नुसार या नाल्यातील पाणी वाहून जाऊ नये यासाठी या भागात पडणारा पावसाचा थेंब न थेंब जमिनीत जिरवण्याचा आमचा प्रयत्न असेल. त्याशिवाय या भागांत १२० बांधबंदिस्ती, अंतर्गत पाणी जिरवण्याचे काम केले जाणार आहे. ३१ सिमेंट बंधाऱ्यांच्या माध्यमातून पाणी आडवले जाणार आहे. यामुळे हरंगुळ शिवारातील १९२७ हेक्टर क्षेत्र वाहित होऊन १२ महिने ओलिताखाली राहणार आहे, असा विश्वास त्यांना वाटतो.
जलयुक्त शिवार अंतर्गत तयार करण्यात आलेल्या नाल्यांपैकी मोठे नाले हे ५० फुट रुंदीचे असून त्यांची खोली साधारण २० फूट इतकी आहे. तर लहानात लहान असलेले नाले हे २५ फुट रुंदीचे असून १५ फुट इतकी आहे. शासनाकडून केल्या गेलेल्या कामांवरती साधारण रुंदी ८ ते १० फुट एवढी असते व खोली ही ५ ते ८ फुटापर्यंत असते.
भविष्यात येथील शेतकर्यांना दुष्काळाचा सामना करावा लागू नये यासाठी उपलब्ध असलेले पाणी ठिबक सिंचन आणि तुषार सिंचनाच्या योजनेतून संबंधित ठिबक आणि तुषार सिंचनाचे सेट उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. त्यासाठी शासनाकडून अल्पभूधारकांना ४५ % अनुदान दिले जाणार आहे तर सर्वसाधारण शेतकर्याला ३५ % अनुदान असेल.