वृक्ष लावा, वृक्ष जगवा आणि विशेष अर्थसह्याद्वारे पेन्शन मिळवा योजना उस्मानाबाद जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार उस्मानाबाद जिल्हा परिषदेने केला आहे. जिल्हा परिषदेचे सीईओ आनंद रायते यांच्या संकल्पनेतून शेतकऱ्यांच्या दृष्टीने लाभदायी व हितकारी शिवाय पर्यावरणाचे रक्षण करणारी अशी ही योजना पुढे आणि असून, या योजनेस संपूर्ण सहकार्य देत ही योजना २६ जानेवारीपासून उस्मानाबाद जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्याचा संकल्प जिल्हा परिषद अध्यक्ष अॅड. धीरज पाटीलसह सर्व पदाधिकारी व सदस्यांनी केला आहे. राज्यात प्रथमतःच अशा पद्दधतीची योजना राबविण्यात येत आहे.
वृक्षांची लागवड करून तीन वर्षे चांगल्या पद्धतीने वृक्ष जोपासना करणाऱ्या शेतकऱ्यांना पेन्शन स्वरूपात अर्थसहाय्य करणारी ही योजना आहे. या योजनेमुळे जिल्ह्यातील पर्यावरणाचे रक्षण करत प्रर्दूषणाचा धोका टळण्यास मदत होईल. शिवाय कालांतराने जिल्ह्यातील पर्जन्यमान वाढण्यास ही मदत होणार आहे.
नापिकी व सततच्या दुष्काळामुळे जिल्ह्यातील शेत जमिनी ओसाड पडू लागल्या. परिणामी शेतकरी व जमीन यांचे नाते तुटण्याची स्थिती निर्माण झाली आहे. यातूनच आत्महत्यासारख्या दुर्दैवी घटनांमध्ये सातत्याने वाढ होऊ लागली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची जमिनीबरोबरची नाळ आबाधित राहावी शिवाय शेतकऱ्यांमध्ये आशादायी वातावरण निर्माण व्हावे, त्यांना अर्थसहाय्य रूपात मदत व्हावी या उद्देशाने जिल्हा परिषदेचे सीईओ आनंद रायते यांच्या संकल्पनेतुन पुढे आलेली वृक्ष लावा... वृक्ष जगवा... पेन्शन मिळवा ही योजना पुढे आली. ही योजना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. या योजनेसाठी रोहयो व वनीकरण विभाग यांची मदत घेतली जाणार आहे.
या नुसार, शेतकऱ्यांनी आपल्या बांधावर वृक्ष लागवड करून या वृक्षांचे तीन वर्षांपर्यंत स्वखर्चाने संगोपन करावयाचे आहे. तीन वर्षांनंतर शेतकऱ्यांना प्रत्येक झाडामागे ठराविक रक्कम पेन्शन स्वरूपात अर्थसहाय म्हणून देण्यात येईल. अर्थसहाय्याची ही मुदत लागवडीपासून ३० वर्षांपर्यंत असेल. वृक्ष लागवड करताना महावृक्ष होणारी शिवाय उत्पन्न देणारी फलोत्पादनाची (चिंच, आंबा आदी) झाडे लावण्यावरच भर देण्यात येणार आहे. जेणेकरून नैसर्गिक आपत्तींच्या वेळी शेतकऱ्यांना फलोत्पादनाचा आधार मिळेल.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट