- गिरीधर पांडे
गाडीकडे जाताना मला औरंगाबाद म्हणालं, 'एक मिनिट थांब. एक गोष्ट कायम लक्षात राहू द्या. आपण नेहमी म्हणतो, काळ आला होता, पण वेळ आली नव्हती.' काळ काही सांगून येत नाही आणि वेळही सांगून येत नाही. मात्र, काळ आणि वेळ न सांगता दोघेही एकाचवेळी आले, तर तो आघात सहन करण्यापलीकडचा असतो. म्हणूनच काळ जरी आला तरी वेळ आपण टाळू शकतो ती हेल्मेट घालूनच. स्वतःचा जीव वाचवाल तरच इतरांसाठी काही करू शकाल. घरी तुमचं कोणीतरी वाट पहातंय हे नेहमी लक्षात ठेवत जा.'
'काय कसं काय, बरं वाटतंय ना आता?'
'कशाचं बरं वाटतंय डोक्याला नुसता हेडेक झालाय राव.' हे उत्तर दिल्यानंतर डोक्यात प्रकाश पडला आपल्या मागे गाडीच्या सीटवर कोणीही बसलेलं नाही, मग हा प्रश्न कोणी विचारला. मागे वळून बघावं म्हटलं, तर डोक्यात हेल्मेट असल्यानं वळताही येईना. गाडी थांबवावी म्हटलं, तर सेव्हन हिलच्या पुलाच्या मध्यावर आलेलो. मागून अनेक चारचाकी, दुचाकींचा मोठा ताफा येत होता. म्हणून गाडी तशीच पुढे नेली तर दुसरा प्रश्न येऊन धडकला,
'सवय झाली का नाही हेल्मेटची?'
आता मात्र आपल्यामागे कोणीतरी नक्की असल्याची खात्री झाली. एव्हाना एसएफएस शाळा पार करून आकाशवाणीच्या सिग्नलपाशी पोहोचलोही होतो. गाडी बाजूला घेत बिग बझारच्या समोरील पार्किंगवर उभी केली. उतरून हेल्मेट काढून मागे बघितलं, तर मागे कोणीच नव्हतं. वाटलं आपल्याला भास झाला असावा. दुपारची वेळ असल्यानं तिथली दुकानं बंद होती, म्हणून त्या दुकानांच्या सावलीत थोडं बसावं वाटलं. बसतानाच पुन्हा एक सल्लावजा वाक्य कानी पडलं.
'सवय नसली की असं होतं कधी कधी!'
आता मात्र जाम हादरलोच. कोण बोलतंय कळेना, पण शेजारीच कोणीतरी बसलं असल्याचं जाणवलं. तेवढ्यात दुसरं वाक्य पुन्हा कानावर पडलं.
'घाबरू नकोस, मीच आहे. तुझ्या शेजारीच बसलोय.'
'तू कोण पण...?' मी घाबरतच प्रश्न केला.
'मी औरंगाबाद.'
'औरंगाबाद?' माझा प्रतिप्रश्न.
'हो औरंगाबाद. तुला मी दिसत नाहीय असं तुला वाटतंय ना, पण तुझ्या आजूबाजूला कुठेही बघ, मी आहेच. आज एखाद्या औरंगाबादकराशी बोलावासं वाटलं म्हणून तुझ्या गाडीवर बसलो. काही दिवसांपासून मी तुमची अवस्था पाहतोय. सगळीकडे कसा बदल झाल्यासारखं दिसतंय.'
आता मात्र खात्री पटली होती की आपल्याशी आपलं शहर औरंगाबादच बोलतंय. धीर करून प्रश्न केला,
'मला भेटला आहेसच, तर काही विचारू का तुला?'
'अरे मी मुद्दामच तुझ्याशी बोलायला आलोय.'
'मग आला आहेसच तर तुझी मुलाखतच घेऊन टाकतो'
'मुलाखत नको, छान गप्पा मारू.'
'तू गप्पा समज, मी मुलाखत म्हणेन औरंगाबादची घेतलेली.'
'बरं ठिक आहे. विचार काय विचारायचंय.'
'माझ्याशीच का बोलावसं वाटलं?'
'गोंधळलेला दिसतो गेल्या काही दिवसांपासून गाडी चालवताना म्हणून.' (औरंगाबादनं हेल्मेटमुळे उडालेला आम्हा औरंगाबादकरांचा गोंधळ बरोबर ओळखला होता. तरीही मी शहाजोगपणे प्रश्न केला.)
'म्हणजे?'
'म्हणजे तुझ्यासारखेच असंख्य आहेत, जे सध्या असेच गोंधळलेले आहेत.'
'गोंधळणार नाही तर काय, विनाकारण हे हेल्मेटचं झेंगट आमच्या माथी मारलंय राव.'
'विनाकारण नाही, तुमच्या सुरक्षेसाठीच आहे ते.'
'हो, पण सक्ती करायची गरज काय होती?'
'कारण सक्तीशिवाय तुम्ही तुमच्याच सुरक्षेकडे दुर्लक्ष करीत होता म्हणून. पण हा बदल चांगला वाटतोय मला.'
'आम्हाला झालेली डोकेदुखी तुला चांगली वाटतीय?'
'डोकेदुखी नाही, अनेकांच्या डोक्यावर सुरक्षा कवच पाहून खूप छान वाटतंय.'
'हो, पण डोकेदुखीचं काय?. सारखं डोक्यावर ओझं असल्यासारखं वाटत रहातं.'
'तुमच्या मनाला अजून ही बाब पूर्णतः पटलेली नाही म्हणून तसं वाटतंय ते. सक्ती नसतानाही काहीजण होतेच ना हेल्मेट वापरणारे. त्यांनी कधी अशी तक्रार केल्याचं ऐकिवात आलंय का तुमच्या. नाही ना.'
'हो, पण आमच्या सुरक्षेची काळजी आम्ही घेतोच ना. मी तर अगदी सावकाश ४० च्या स्पीडच्या वर जातच नाही.'
'सावकाश चालवणारे कमीच तसे, पण गेल्या तीन आठवड्यांपासून सगळ्याच दुचाकींचे स्पीड कमी झाल्याचं जाणवलयं की नाही तुम्हाला.' (स्पीड कमी झाल्याचं त्यानं बरोबर ओळखलं होतं.)
'हो तेवढं झालंय खरं. अरे बाबा डोक्यात हेल्मेट असल्यानं गोंधळल्यासारखं होतं. आपसूकच आमचा स्पीड कमी झाला. तुला काय बदल जाणवलाय आमच्यातला?'
'बराच बदल झालाय आणि तो सुखावहही आहे. सिग्लनवरून निघताना तुम्ही हिरवा दिवा लागण्याचीही वाट पहात नव्हते, ते आता बरंच कमी झालंय. आडव्या तिडव्या गाड्या खासकरून तरुण चालवायचे. त्यांनाही या हेल्मेटनंच भानावर आणलंय. मागे वळून अनेकजण मागील वाहनांचा अंदाज घ्यायचे. आता तुम्हाला हेल्मेटमुळे मागे वळून पाहणं अशक्य झालंय ना, त्यामुळे बहुतांश गाड्यांना दोन्ही बाजूंना आरसे बसवले गेलेत.'
'कारे आणि गाडी चालवताना मोबाइलवर बोलणाऱ्यांबद्दल काय मत झालंय तुझं?'
'त्यावर मत काय द्यायचं, हेल्मेट घातल्याने आता कानाला मोबाइलच लावता येत नाही. गाडी चालवताना माना वाकड्या करून मोबाइलवर हे बोलायचे आणि संकटात मात्र दुसरेच सापडायचे.'
'अरे पण मी ऐकलंय की पोलिसांच्याच मनात ही सक्ती करायची इच्छा नाहीय. ते खरंय का?' मी एक खोचक प्रश्न टाकला.
'हो तुम्ही स्वतःहून हेल्मेट घालायला लागले, तर सक्तीची गरजच काय? त्यांना काय कमी कामं आहेत का? हेल्मेट नसल्यानं अपघातात मरण पावल्याच्या अनेक घटना शहरात घडल्या होत्या. तरी स्वतःहून हेल्मेट घालण्याचं प्रमाण अगदीच कमी होतं. त्यामुळे पोलिसांना यात कटाक्षाने लक्ष घालावं लागलं. मला सांग १ फेब्रुवारीच्या आधी महिनाभर पोलिसांनी हेल्मेटबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली होती का नाही?'
'खूप कार्यक्रम घेतले होते.'
'तरी ३१ जानेवारीला किती दुचाकी चालवणाऱ्यांच्या डोक्यावर हेल्मेट होतं?'
'अरे मुलाखत तुझी आणि तूच मला आता प्रश्न करायला लागलास.'
'एखाद दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलंस तर काय हरकत आहे. सांग ना हेल्मेट सक्तीच्या एक दिवस आधी कितीजण हेल्मेट घालून दुचाकी चालवत होते?'
'कोणीच नाही. त्या दिवशी आम्ही सगळे हेल्मेट खरेदीतच मग्न होतो ना. हेल्मेट घेण्यासाठी रांगा लावल्या होत्या दुकानांसमोर.'
'का, आधीच का हेल्मेट घेता आली नाही तुम्हाला? बरं आता सांग १ फेब्रुवारीला किती जणांच्या डोक्यावर हेल्मेट होते?'
'किमान ७० टक्के औरंगाबादकरांच्या डोक्यावर हेल्मेट होतीच.'
'म्हणजे सक्ती केली म्हणूनच ना. त्याआधीच तुम्ही स्वतःच घातली असती हेल्मेट तर सक्तीची काय गरज होती.'
'हे खरंच आहे, पण रस्ते चांगले नाहीत त्याचं काय?' मी विषय बदलण्याचा प्रयत्न केला.
'होतील ना तेही चांगले होतील. आता बऱ्याच रस्त्यांचं काम सुरू आहेच ना. पैसा मिळतोय तसं ते काम होतंय ना, पण जे तुमच्या हातात आहे ते तर तुम्ही करायला हवं ना. स्वच्छतेच्या बाबतीतही तसंच होतं तुमचं. आपल्याच घराच्या बाहेर कचरा टाकणारे अनेक बहाद्दर होतेच ना. आता किती फरक पडलाय. स्वच्छतेबाबत तुमच्या मनात काहीतरी वाटायला लागलंय ना. किती संस्था, संघटना स्वच्छता करण्यासाठी पुढे सरसावल्या आहेत, ही चांगलीच बाब आहे ना. तुमच्या आरोग्यासाठीच ते चांगलं आहे. स्वतःचंच भलं दुसऱ्यांनी सांगायची आवश्यकता का पडते. डेंग्यू, मलेरियाची साथ आली की तुम्ही आरडाओरड करता, पण डास न होण्यासाठी सर्वत्र स्वच्छता राखायला हवी हे नाही कळत का? कळतं पण वळत नाही, अशी अवस्था आहे तुमची. प्लास्टिकच्या पिशव्यांच्या बाबतीतही तसंच झालं ना. त्या घातक आहेत हे माहिती असूनही कॅरी करायला सोपं म्हणून कॅरीबॅग काहीकेल्या दुकानातून आणि हातगाड्यांवरच्या हटत नव्हत्या. किती संघटनांनी यावर्षी कापडी पिशव्या वाटल्या ते पाहिलं ना. का याआधीच नव्हत्या वाटता येत. आपल्या फायद्याचं काय ते सांगायलाही दुसरा कोणीतरी लागतो, हेच तुमचं मोठं दुखणं आहे. त्यासाठी मग कोणाला तरी हंटर घ्यावा लागतो हातात. तुम्हीच व्यवस्थित नियमानी वागलात तर दुसऱ्यांना व्यवस्थेतील त्रुटींकडे बोट दाखवता येईल तुम्हाला. व्यवस्थित वागायचं तेही कोणासाठी तर तुमच्याच भल्यासाठी ना.'
औरंगाबाद सहज बोलता बोलता गंभीरपणे आपलं मत मांडून गेलं, मर्मावर बोट ठेवून गेलं होतं. बराच वेळ झाला होता. म्हणून 'निघू का म्हणत' त्याचा निरोप घेतला. गाडीकडे जाताना मला औरंगाबाद म्हणालं,
'एक मिनिट थांब. एक गोष्ट कायम लक्षात राहू द्या. आपण नेहमी म्हणतो, 'काळ आला होता पण वेळ आली नव्हती.' काळ काही सांगून येत नाही आणि वेळही सांगून येत नाही, पण काळ आणि वेळ न सांगता दोघेही एकाचवेळी आले तर तो आघात सहन करण्यापलीकडचा असतो. म्हणूनच काळ जरी आला तरी वेळ आपण टाळू शकतो ती हेल्मेट घालूनच. स्वतःचा जीव वाचवाल तरच इतरांसाठी काही करू शकाल. घरी तुमचं कोणीतरी वाट पहातंय हे नेहमी लक्षात ठेवत जा.'
औरंगाबादच्या बोलण्यानं डोकं खरंच सुन्न झालं होतं. आता मात्र ते शांत करण्यासाठी डोक्यावर हेल्मेट घातली ती प्रवासात कायमची वापरण्यासाठीच.
giridhar.pande@timesgroup.com
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट