- विजय चौधरी
जगप्रसिद्ध वेरूळ लेणी व बारावे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर मंदिरासाठी प्रसिद्ध असलेल्या वेरूळसारख्या गावाचा विकास करताना स्थानिक जनतेचे आर्थिक स्थैर्य वाढविण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत. वेरूळला पर्यटनातून सामाजिक, आर्थिक विकास साधण्याची नामी संधी आहे. गरज आहे ती त्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलण्याची...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खासदार आदर्श गाव योजना या धोरणामध्ये शिवसेनेचे राज्यसभा सदस्य खासदार राजकुमार धूत यांनी वेरूळ गाव दत्तक घेतले आहे. त्यासाठी सव्वा दोन कोटी रुपयांचा निधी दिला आहे. पर्यटन राज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांनी वेरूळसह इतरही पर्यटनस्थळे विकसित करण्यासाठी ९०० कोटी रुपयांची योजना असल्याचे जाहीर केलेले आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराच्या विकासासाठी ५० लाख रुपयांची तरतूद केल्याचे जाहीर केले आहे. वेरूळ, म्हैसमाळ, खुलताबाद, सुलीभंजन गावाच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा पर्यटन प्राधिकरणाने तयार केला आहे. त्यासाठी ५०० कोटी रुपयांच्या निधीची मागणी आहे. पहिल्या टप्प्यात १४५ कोटी रुपयांच्या आराखड्याला विभागीय आयुक्तांनी मान्यता दिली आहे. प्राधिकरणाचा प्रारूप आराखडा मंजूर करून अर्थसंकल्पात तरतूद करण्यासाठी पाठविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे झाल्यास वेरूळच्या पर्यटन विकासात एका नव्या पर्वाची भर पडेल. या योजनेचे दृश्य परिणाम दिसावयास काही वर्षांचा कालावधी जावा लागेल.
पर्यटनाच्यादृष्टीने वेरूळचा नियोजनपूर्वक सामाजिक व आर्थिक विकास करता येण्यासारखा आहे. तसे झाल्यास स्थानिकांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होऊ शकेल. देशविदेशातील पर्यटकांना येथे दर्जेदार दळणवळणाची व राहण्याची सोय झाल्यास पर्यटन विकासाला अधिक चालना मिळेल. त्यातून स्थानिक तरुणांना रोजगाराची संधी मिळवून देता येईल. ग्रामीण भागातील तरुणांचे शहराकडे रोजगारासाठी जाणारे लोंढे थांबविता यावेत, या युवा शक्तीला कौशल्य विकासाचे धडे मिळावेत. स्थानिक पातळीवरच चांगला रोजगार मिळावा, त्यासाठी लागणारे आवश्यक कौशल्य त्यांना शास्त्रीय ज्ञानाद्वारे आत्मसात करता यावे यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. वेरूळमध्ये पर्यटन व्यवसायावर अवलंबून असलेल्या कुटुंबांची संख्या मोठी आहे. अर्धवट शाळा सोडलेले तरुण तसेच उच्चशिक्षित रोजगारासाठी औरंगाबादकडे धाव घेतात किंवा स्थानिक कौशल्य व दर्जाअभावी कमी रोजंदारीवर वेठबिगार म्हणून राबतात. त्यांच्यासाठी स्वतःचा व्यवसाय स्थापण्यासह रोजगारासाठी तयार असणाऱ्या असंख्य संधी लक्षात घेऊन पर्यटन व्यवसायातील वेगवेगळे प्रशिक्षण वर्ग सुरू करण्याची गरज आहे. गाइड, आदरातिथ्याचे शिक्षण देऊन स्थानिक बेरोजगारांना प्रशिक्षित केल्यास पर्यटन व्यवसायाला उत्तम दर्जा प्राप्त होईल. उत्तमात उत्तम सोयी सुविधा हीच पर्यटनाची गुरुकिल्ली आहे. स्थानिक तरुणांचा, महिला बचतगटांचा पर्यटनात सहभाग असायला पाहिजे. त्यांना प्रशिक्षित करून उत्पन्नाचे साधन मिळाले पाहिजे. या क्षेत्रात टूर ऑपरेटर्सनी दूरदृष्टी दाखवली, तर वंचित घटकांच्या विकासाचे काम शक्य होऊ शकेल.
शालेय शिक्षणापासून दूर राहिलेल्या व चांगल्या रोजगाराची अपेक्षा बाळगून काम करणाऱ्या सुशिक्षित तरुणांना वास्तविक पायाभूत प्रशिक्षणाची आणि योग्य मार्गदर्शकाची आवश्यकता आहे. पर्यटनातून विकास साधताना सामाजिक विषमतेचेही भान ठेवायला हवे. वेरूळची बेरोजगारी कमी व्हावी, यासाठी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करावयास हवी. पर्यटनाचा विकास होण्यासाठी पर्यटकांना सुविधा उपलब्ध करून देण्याच्या कामात स्थानिक रहिवाशांना सहभागी करून घेतले गेले पाहिजे. पर्यटन उद्योगाच्या माध्यमातून उपलब्ध होणारा पैसा आणि रोजगार लक्षात घेऊन पर्यटन धोरण ठरविण्याची गरज आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट