गायकवाड कुटुंबीय हे औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील जळगाव गावचे. वडील (कै.) नानासाहेब गायकवाड हे शेती करीत होते. संदीप यांचे सातवीपर्यंतचे शिक्षण हे गावातील जिल्हा परिषद शाळेत झाले. त्यानंतर श्रीरामपूर येथे बीएसस्सीपर्यंत मावशीकडे राहून शिक्षण झाले. त्यानंतर सिन्नर येथील 'सारडा पेपर्स लिमिटेड' येथे केमिस्ट म्हणून काम करण्याची संधी मिळाली, मात्र त्यांचे तेथे मन लागत नव्हते. पेपर कंपनीमध्ये आपले भविष्य घडू शकत नाही, अशी धारणा झाल्यामुळे अवघ्या दोन महिन्यांमध्ये ते गावाकडे परतले. नोकरी सोडल्यामुळे कुटुंबीय नाराज झाले. नोकरी करायची नाही तर निदान घरची शेती कर, असे घरच्यांनी सुनावले. काही महिने शेतीही करून बघितली; पण शेतीमध्येही मन रमेना. शेतीपेक्षा औषधी कंपनीमध्ये नोकरी करावी, असे त्यांना वाटत होते. त्यामुळे कुटुंबीयांचे न ऐकता आणि मित्रांकडून भाड्याचे पैसे घेऊन अंगावरच्या कपड्यानिशी औरंगाबाद गाठले, मात्र त्याकाळी मार्केड थंड होते, मंदी होती. शोधूनही औषधी कंपन्यांमध्ये काम मिळत नव्हते. कुठेही जा 'नो व्हॅकन्सी'शी सामना करावा लागत होता. त्याचवेळी वाळूज एमआयडीसी येथील 'संग्राम ऑटो कंपोनन्टस प्रा. लि.'मध्ये लिपिकाची नोकरी मिळाली आणि १९९८मध्ये ८०० रुपये वेतनावर काम सुरू केले.
'ऑटो कंपोनन्टस'ची निर्मिती करणाऱ्या या छोटेखानी कंपनीमध्ये काम करताना आवड निर्माण झाली आणि यापूर्वी कुठेच न रमणारे मन येथे चांगलेच रमू लागले. केवळ लिपिकाचे नव्हे तर ऑटो कंपोनन्टसच्या मॅन्युफॅक्चरिंग, डिसपॅच, डिलिव्हरी, स्टोअरपर्यंतचे सगळे काम ते मनोभावे करु लागले आणि काहीही न मागता ८०० रुपयांचे वेतन 'संग्राम ऑटो'चे मालक मनोज कंक यांनी १२०० रुपये केले. अल्पावधीतच संदीप यांच्यावर डिपार्टमेंट हेडची जबाबदारी सोपवण्यात आली आणि मॅन्युफॅक्चरिंगमधील प्रत्येक बारीक-सारीक कामाच्या अनुभवामुळे आपणही उद्योजक होऊ शकतो, हा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण झाला. मोठी हिंम्मत करत स्वबळावर त्यांनी भागीदारीमध्ये वाळूजमध्ये छोटेखानी युनिट सुरू केले. एक-एक लाखाची गुंतवणूक केली आणि रिक्षा-दुचाकीचे छोटे भाग तयार करण्याचे काम युनिटमनध्ये सुरू केले. एकीकडे नोकरी सुरू होती. काम मिळत गेले आणि युनिटची प्रगती होत होती. दरम्यान, १९९८ ते २००२पर्यंत 'संग्राम ऑटो'मध्ये काम केल्यानंतर उद्योजक श्रीकांत जोशी यांच्या 'श्री इंजिनिअरिंग'मध्ये प्लँट हेड म्हणून संधी मिळाली. झोकून देऊन काम करण्याच्या प्रवृत्तीमुळेच जोशी यांचा विश्वास संदीप यांनी कमावला. नोकरीमध्ये प्रगती होत गेली; पण स्वतःच्या युनिटमध्ये वेळ देणे शक्य होत नसल्याची खंत त्यांना होती आणि त्यामुळे स्वतःच्या युनिटची फारशी प्रगती होत नसल्याचा विचार मनात येऊ लागला. युनिटमध्ये पूर्णवेळ लक्ष घालण्यासाठी २००८मध्ये नोकरी सोडली. युनिट वाढवण्याचा प्रयत्न सुरू होता; पण त्यातून योग्य रिटर्स मिळत नव्हते, नुकसान वाढत गेले, लोकांची देणी-कर्ज वाढत गेले. अनेक प्रयत्न करूनही युनिट तोट्यात गेले आणि कुठलाच पर्याय शिल्लक राहिला नाही म्हणून शेवटी युनिट बंद करुन बाहेर पडण्याचा निर्णय जड अंतःकरणाने घेतला. स्वतःच्या युनिटवर तब्बल ३०-३५ लाखांचा खर्च केला होता. संपूर्ण युनिट विकण्यासाठी तब्बल एक वर्ष लागले आणि त्यानंतरही काही प्रमाणातील कर्ज डोक्यावर शिल्लक होतेच. या काळात नोकरी नव्हतीच; शिवाय देणी शिल्लक होती, घराचे-कारचे हप्ते होते, मुलांच्या शिक्षणाचा व घर खर्चाचा प्रश्न होताच. सगळीकडून कोंडी झाली होती. याच कोंडीमुळे कार विकून टाकली; पण त्यामुळे फारसा काहीही उपयोग झाला नाही. आता नोकरी करण्याशिवाय गत्यंतर नाही, असे वाटून उद्योजक जोशी यांना सगळी हकिकत सांगितली आणि तिथून त्यांच्या आयुष्याचा एक टर्निंग पॉईंट मिळाला.
पुन्हा स्वबळावर भरारी
उद्योजक जोशींकडे नोकरी करण्यासाठी संदीप गेले; पण त्यांनी नोकरीबरोबरच उद्योग-व्यवयाय करण्याचाही पर्याय संदीप यांच्यासमोर ठेवला. उद्योगामध्ये सगळीकडून कोंडी झाली होती, पण तरीही उद्योग करण्याची दुर्दम्य इच्छा होतीच. त्यामुळे जोशींनी संदीप यांना उद्योजक होण्यासाठी प्रोत्साहन देत काम देण्याचा शब्द दिला आणि संदीप यांनी पत्नीचे सोने बँकेत ठेऊन मिळालेल्या ८० हजारांमध्ये रजिस्ट्रेशन केले व शेड डिपॉझिटचे पैसे दिले. दोन मित्रांकडून दोन प्रेस मशीन आणल्या आणि 'निरंजन मेटल प्रेसिंग' नावाने छोटे युनिट कसेबसे सुरू केले. जोशींनी सुरुवातीलाच ४ पार्ट तयार करण्याचे काम दिलेच; शिवाय दोन नवीन मशीन खरेदीसाठी पैसे देऊन एका वर्षानंतर कामातून पैसे वळते करून घेतले. संदीप यांच्या चोख कामामुळेच काम मिळत गेले, वाढत गेले आणि मशीन कमी पडू लागल्या म्हणून संदीप यांनी पुन्हा ४ नवीन मशीन खरेदी केल्या. 'सिद्धी इंजिनिअरिंग' व 'समीक्षा प्रेसिंग'कडून पार्ट तयार करण्याचे काम मिळाले. पहिल्याच महिन्यात ७०-८० हजारांची उलाढाल झाली आणि अवघ्या चार वर्षांतील वार्षिक उलाढाल ७०-८० लाखांवर गेली. जोशींसारखा गॉडफादर मिळाला आणि नोकरी देण्यापेक्षा त्यांनी मला उद्योजक म्हणून घडविले, असे संदीप म्हणत असले तरी त्यामागे संदीप यांची अखंड मेहनत, धोका पत्करण्याची हिम्मत, अथक संघर्ष करण्याचे गुण लपून राहात नाही. संबंधित क्षेत्राच्या प्रत्येक बारीक-सारीक गोष्टीचे ज्ञान मिळवा, किमान २-३ वर्षे नोकरी करुन समृद्ध अनुभव मिळवा आणि त्यानंतरच उद्योजक होण्यासाठी झोकून द्या, असे संदीप आवर्जून सांगतात.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट