Unmesh.Deshpande@timesgroup.com
औरंगाबाद ः शिजवून दिलेल्या भाताचा रंग पिवळा आहे, त्यामुळे त्याला खिचडी म्हणावे. या 'खिचडी'त डाळीचे प्रमाण नगण्य. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे पोषण होते की नाही, असा प्रश्न वांजोळा, धानोरा (ता. सिल्लोड) येथील शाळात देण्यात येणाऱ्या पोषण आहार पाहून पडतो. धानोरा येथील शाळेत चक्क स्वच्छतागृहाशेजारी स्वयंपाकघर उभारले आहे.
सिल्लोड तालुक्यात वांजोळा-धानोरा ही दोन गावे ग्रुप ग्रामपंचायतींची. सिल्लोडच्या पश्चिमेला ही गावे वसलेली. सुरुवातीला वांजोळा गाव. त्यानंतर धानोरा. सिल्लोडपासून वांजोळा नऊ किलोमीटर अंतरावर आहे. वांजोळा फाटा सात किलोमीटर अंतरावर आहे. या फाट्यावर बसने उतरल्यावर गावात जाण्यासाठी दोन किलोमीटर चालत जावे लागते. परदेशी राजपूत, मराठा राजपूत या समाजाची गावात मोठी संख्या आहे. गावाची लोकसंख्या ७५० आहे. चमकाबाई बमनावत या वांजोळा गावच्या ग्रामपंचायत सदस्या आहेत. त्यांचा मुलगा सुभाष बमनावत गावातील विविध कामे करण्यासाठी त्यांना मदत करतो. गावात जिल्हा परिषदेची एकच प्राथमिक शाळा आहे. या शाळेच्या शालेय समितीचे सुभाष बमनावत अध्यक्ष आहेत. या शाळेचे मुख्य केंद्र भराडीला आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीराम महाजन यांच्या मतदारसंघातील वांजोळा, धानोरा ही गावे. त्यामुळे या गावातील शाळांची अवस्था चांगली असेल, विद्यार्थी संख्या देखील इतर शाळांच्या तुलनेत चांगली असेल, असे वाटत होते, पण या दोन्ही गावांतील जिल्हा परिषदेच्या शाळा शेवटचे दिवस मोजत आहेत की काय असे प्रत्यक्ष भेट दिल्यावर वाटते.
चिक्कीचा 'प्रसाद'
दर शनिवारी विद्यार्थ्यांना बिस्किट, शेंगदाणा लाडू, चिक्की, राजगिरा लाडू दिला पाहिजे, असे पूरक पोषक आहाराच्या निकषात आहे, पण विद्यार्थ्यांना फक्त बिस्किटच दिले जाते. एखाद्या शनिवारी सिल्लोडहून येताना मुख्यध्यापिक चिक्कीचे पाकीट आणतात आणि विद्यार्थ्यांच्या हातावर प्रसाद द्यावा तशी चिक्की दिली जाते. पूरक पोषक आहाराच्या निकषानुसार दर शनिवारी विद्यार्थ्यांना फळं दिली पाहिजेत, पण निधीच मिळत नसल्यामुळे फळं दिली जात नाहीत. स्वखर्चाने विद्यार्थ्यांना फळं देणे शिक्षकांना परवडत नाही. त्यामुळे या शाळेतील विद्यार्थी पौष्टिक आहारापासून वंचित आहेत.
खिचडी शिजवणाऱ्या बचत गटाला जिल्हा परिषदेतर्फे दोन-तीन महिन्यांच्या नंतर पेमेंट दिले जाते. पेमेंट मिळाले नाही तर खिचडी शिजवण्याचे काम बंद होईल, या भीतीने शाळेतले दोन शिक्षक बचतगटाचे पैसे देतात. जिल्हा परिषदेकडून बिल आल्यावर ते त्यांचे पैसे काढून घेतात.
दोनच शिक्षक
वांजोळा येथील शाळेची इमारत चार खोल्यांची. विद्यार्थी संख्या मात्र ३१. इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग या शाळेत भरवले जातात. पाचवीचाही वर्ग होता, पण विद्यार्थी नसल्यामुळे तो बंद करण्यात आला. पहिली ते चौथीपर्यंत फक्त ३१ विद्यार्थी असल्यामुळे शाळेचा एक शिक्षक कमी करण्यात आला. पूर्वी या शाळेला तीन शिक्षक होते, आता दोनच शिल्लक राहिले आहेत. त्यात मुख्यध्यापिका ललिता कामे यांचाही समावेश आहे. प्रशासकीय काम सांभाळत त्यांना वर्गातही शिकवावे लागते.
शाळा टंचाईग्रस्त
शाळेत आवश्यक त्या सोई सुविधा नाहीत. शाळेला संरक्षक भिंत नाही. त्यामुळे मोकाट जनावरांचा शाळेच्या आवारात सतत वावर असतो. शाळेला स्वच्छतागृह आहे, पण पाणी नसल्यामुळे त्याचा वापर होत नाही. शाळेत पिण्यासाठीही पाणी नाही. त्यामुळे शिक्षक, विद्यार्थी आपापल्या घरून पाणी घेऊन येतात. विद्यार्थ्यांसाठीचा पोषण आहार शिजवण्यासाठीही बचत गटाच्या महिला घरून पाणी आणतात.
स्वयंपाकघरात मोकाट कुत्री
खिचडी शिजवण्यासाठी शाळेच्याच आवारात एक छोटीशी खोली आहे. या खोलीला दरवाजा नाही. खिचडी शिजवण्यापुरत्या बचत गटाच्या कार्यकर्त्या या खोलीत असतात. त्या गेल्यानंतर तेथे मोकाट कुत्र्यांचाच मुक्काम असतो. खिचडी शिजवण्यासाठीची खोली देखील स्वच्छ नाही. खोलीच्या एका कोपऱ्यात चूल, दुसऱ्या कोपऱ्यात चूल पेटवण्यासाठीच्या तुराट्या. एक मोठे पातेले, दोन-तीन रिकामे पोते असा पसारा. जास्तीत जास्त अर्धा किलोची खिचडी शिजवण्यात आली होती. मुलांची संख्या ३१ आहे, त्यामुळे खिचडी कमीच लागते, असा खुलासा मुख्याध्यापिका कामे यांनी केला. निकषानुसारच खिचडी शिजवली जाते, असा दावाही त्यांनी केला. खिचडीसाठीचे साहित्य जिल्हा परिषदेतर्फे शाळेत पोचवले जाते. बचत गटामार्फत डाळ, तांदूळ, भाजी-पाला निवडला आणि शिजवला जातो. मुख्याध्यापक म्हणून त्यावर देखरेख करण्याचे काम फक्त आम्ही करतो, असे कामे यांनी सांगितले. शिवशंकर महिला बचत गटातर्फे खिचडी शिजवण्याचे काम केले जाते.
डाळ, तांदूळ सुमार दर्जाचे
शाळेत जयदुर्गा महिला बचत गटातर्फे खिचडी शिजवली जाते. त्यासाठी बचत गटाने एका महिलेची नियुक्ती केली आहे. या महिला कर्मचाऱ्याशी चर्चा केली असता, सोमवारी खिचडी शिजविण्याची तयारी केली जात आहे, असे त्यांनी सांगितले. सोमवारी तांदूळ आणि मुगाच्या डाळीची खिचडी करावी लागते. त्यात बटाटे, कांदा, टोमॅटो, कोथंबीर टाकली जाते, असे त्यांनी सांगितले. प्रत्यक्षात तेथे फक्त कोथंबीरच होती. चुलीवर खिचडीसाठीचे पाणी उकळत होते. बाहेर टोपलीत तांदूळ आणि डाळ काढून ठेवण्यात आली होती. त्यांचा दर्जा फारच सुमार होता.
धानोऱ्यातील शाळेला रस्ता हेच मैदान
वांजोळा गावापासून धानोरा हे गाव तीन किलोमीटर अंतरावर आहे. हे अंतर कापण्यासाठी पाच किलोमीटरचा फेरा मारावा लागतो. धानोरा येथे जिल्हा परिषदेची सातवीपर्यंत शाळा आहे. शाळेत १२६ विद्यार्थी आहेत. शिक्षकांची सात पदे मंजूर आहेत. त्यापैकी सहा शिक्षक कामावर आहेत. एकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. धानोरा गावात एक खाजगी शाळा आहे. तेथे पाचवी ते दहावीपर्यंतचे वर्ग आहेत. गावाच्या बसस्थानकाला लागूनच जिल्हा परिषदेची शाळा आहे. स्टँडसमोरून गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूने शाळेची इमारत आहे. शाळेला क्रीडांगण नाही. त्यामुळे मुलांसाठी रस्ता हेच क्रीडांगण आहे. प्रार्थना आणि परिपाठासाठी विद्यार्थ्यांना रस्त्यावरच उभे रहावे लागते. सकाळी साडेनऊ वाजता शाळा सुरू होते तेव्हा गावातील नागरिक शाळेच्या समोर बसस्टँडच्या शेजारी तळठोकून उभे असतात. चहा-पाणी करीत, बिडी ओढत त्यांच्या मोठमोठ्याने गप्पा सुरू असतात. त्याचा शिकवण्यावर आणि शिकण्यावर परिणाम होतो.
पोषण आहाराचा मेनू कागदावरच
धानोऱ्यात विद्यार्थ्यांना दररोज कोणता पोषण आहार दिला पाहिजे याचा चार्ट मुख्याध्यापकांच्या खोलीत ठळकपणे लावण्यात आला आहे, परंतु या चार्टनुसार विद्यार्थ्यांना अभावानेच पोषण आहार मिळतो. सोमवारी तांदूळ आणि मुगडाळीची खिचडी असा मेन्यू होता. सकाळी अकराच्या सुमारास खिचडी शिजवण्यात आली होती. पिवळा रंग होता म्हणूनच तिला खिचडी म्हणायचे. त्यात डाळ असून नसल्यासारखी होती. त्यामुळे खिचडी नव्हे, पिवळा भातच असे शब्द आपसूकच तोंडातून निघतात. खिचडी शिजवताना त्यात भाज्या टाकल्या पाहिजेत. प्रामुख्याने कांदे, बटाटे, टमाटे, कोथंबीर याचा खिचडीत समावेश असावा, असा निकष आहे, पण या शाळेतील खिचडीत हे घटक दिसलेच नाहीत.
स्वच्छतागृहाशेजारी स्वयंपाकघर
शाळेत मुख्याध्यापकांच्या खोलीत पार्टिशन करून पोषण आहाराचे साहित्य रचून ठेवलेले आहे. मुख्य इमारतीसमोर सर्वशिक्षा अभियानाच्या माध्यमातून बांधलेल्या खोल्या आहेत. त्यांच्या मागच्या बाजूला स्वच्छतागृह आहे. त्याला लागूनच खिचडी शिजवण्याची खोली आहे. खोलीच्या शेजारी पाण्याचा हौद आहे. या हौदातील पाणी स्वच्छतागृहांसाठी व पोषण आहार शिजविण्यासाठी वापरले जाते. धानोरा हे गाव भोर्डी नदीच्या काठावर आहे, त्यामुळे या गावाला पाण्याचा प्रश्न भेडसावत नाही. भोर्डी नदी पुढे पूर्णा नदीला जाऊन मिळते.
चिक्की, लाडू, फळांसाठी निधी नाही
खिचडी शिजण्यापूर्वीच या शाळेतील विद्यार्थ्यांची मधलीसुट्टी झाली. या सुट्टीत विद्यार्थ्यांनी घरून आणलेले डब्बे खाल्ले. विद्यार्थी खिचडी केव्हा खाणार, असा प्रश्न शाळेच्या मुख्याध्यापकांना विचारला. त्यावर म्हणाले, 'खिचडीसाठी पुन्हा मधली सुट्टी केली जाते. विद्यार्थ्यांना बिस्किट, शेंगदाण्याचे लाडू, चिक्की, फळं पूरक पोषण आहार म्हणून देण्याचे शासनाचे धोरण आहे, पण हा आहार खरेदी करण्यासाठी जिल्हा परिषद पैसेच देत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना फक्त स्वखर्चाने आणलेली बिस्किटेच दिली जातात. चिक्की, लाडू, फळं त्यांना मिळत नाहीत.
वांजोळ्यातील खिचडी
- कांदे, बटाटे, टोमॅटोचा वापर वापर नाही
- स्वयंपाकघराला दरवाजा नसल्याने मोकाट कुत्र्यांचा वावर
- खिचडी शिजविण्यासाठी घरून आणावे लागते पाणी
- तुराट्यांवर शिजतो रोज शालेय पोषण आहार
- निधीअभावी शनिवारी फळांचे वाटप नाही
धानोऱ्यात सुमार दर्जा
- खिचडीसाठी सुमार दर्जाच्या डाळ, तांदळाचा वापर
- स्वच्छतागृह, स्वयंपाकासाठी एकाच हौदातील पाणी
- विद्यार्थी घरून जेवणाचा डब्बा आणतात
- खिचडी वाटपासाठी शाळेत दोनवेळा मधली सुटी
- पूरक पोषण आहारात केवळ बिस्किटांचे वाटप
शासनाने दिलेल्या वेळापत्रकानुसारच पोषण आाहर दिला जातो. शाळेत विद्यार्थी कमी असल्यामुळे पोषण आहार कमी प्रमाणात शिजवावा लागतो. त्यामुळे त्याचा त्रास होत नाही. गावकरी व बचत गटाचे सदस्य यांचे सहकार्य मिळते. पूरक पोषण आहार मात्र आम्हाला विकत आणून द्यावा लागतो.
- ललिता कामे, मुख्याध्यापिका, वांजोळा शाळा
आहे त्या परिस्थितीत विद्यार्थ्यांना शालेय पोषण आाहर देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. पूरक पोषण आहार शिक्षक येताना घेऊन येतात, पण विद्यार्थ्यांना बिस्किटांशिवाय दुसरे काहीच मिळत नाही. शाळेला संरक्षक भींत असावी, स्वयंपाकघराला दार असावे यासाठी जिल्हा परिषदेत पाठपुरावा केला, पण अद्याप त्याला यश मिळाले नाही.
- सुभाष बमनावत, अध्यक्ष, शालेय समिती वांजोळा
शाळेकडून खिचडी दिली जाते. आम्ही तीच खातो. खिचडी चांगल्या प्रकारे शिजवली जाते की नाही, हे सांगता येणार नाही.
- सोनल जाधव,
विद्यार्थिनी, इयत्ता तिसरी
शाळेत विद्यार्थ्यांसाठी खिचडी शिजवली जाते. विद्यार्थी खिचडी चवीने खातात, पण शाळेसाठी आवश्यक सुविधा अद्याप मिळालेल्या नाहीत. शाळेला सुविधा मिळाल्या पाहिजेत. गावातील आरोग्य उपकेंद्र पूर्ण क्षमतेने चालले पाहिजे.
- दुर्गादास काकडे, उपसरपंच, धानोरा
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट