पर्यटनाला चालना देण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून भरवलेला वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव केवळ स्थानिक महोत्सव ठरला. शहरातील एक खासगी सांस्कृतिक संस्था आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबासाठीच महोत्सव भरवला गेल्याचे चित्र होते. महोत्सवाची रया घालवणारे फिल्मी कार्यक्रम आणि ढिसाळ नियोजनामुळे पर्यटक व सर्वसामान्य रसिकांना महोत्सवापासून दूर ठेवण्यात प्रशासनाला पुरेपूर यश आले.
‘पर्यटन राजधानी’ औरंगाबाद शहराचा लौकिक वेरूळ-अजिंठा या जागतिक वारसास्थळांमुळे आहे. जगभरातील लाखो पर्यटक लेणी पाहण्यासाठी नियमित येत असतात, पण पर्यटन व्यवसायाला चालना देण्यात प्रशासनाला यश आले नाही. पर्यटकांची संख्या वाढवून शहराचा नावलौकिक उजळ करण्यासाठी वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव भरवण्यात आला. देश-विदेशातील पर्यटकांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम घेणे महोत्सवात अपेक्षित असते, मात्र शास्त्रीय आणि लोकसंस्कृतीशी संबंधित दर्जेदार कार्यक्रम घेण्याचा रिवाज आहे. हा आदर्श पायंडा मोडीत काढत प्रशासनाने महोत्सवाचा बट्ट्याबोळ केला. ढिसाळ नियोजनाचा अनुभव रसिकांना पहिल्या दिवसापासून आला. वेरूळ लेणीच्या पायथ्याशी उद्घाटन समारंभाला मोजकेच रसिक उपस्थित होते. विदेशी पर्यटकांची संख्या ७० होती. रसिक नसल्यामुळे नावाजलेल्या कलाकारांना रिकाम्या खुर्च्यांसमोर नृत्य सादर करावे लागले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निघताच बहुतेक गर्दी पांगली. त्यामुळे ग्रेसी सिंग आणि पूर्णाश्री राऊत यांचे नृत्य बघायला शंभर रसिकसुद्धा नव्हते. महोत्सवात शास्त्रीय नृत्य-गायन आणि लोकनृत्य अपेक्षित असते, मात्र अजय-अतुल आणि अदनान सामी यांच्या फिल्मी गाण्यांचा भडीमार करण्यात आला. दोन दिवस हा फिल्मी धुमाकूळ असल्याने जाणकार पर्यटक व रसिकांनी पाठ फिरवली.
कलाग्राम परिसरातील ‘लोकजागर’ कार्यक्रमात शुकशुकाट होता. पर्यटकांपर्यंत महोत्सव पोहचवणे आणि स्थानिकांना सहभागी करून घेण्यात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि महसूल प्रशासन सपशेल अपयशी ठरले. अजय-अतुल ‘कॉन्सर्ट’च्या बनावाने महोत्सवाची पुरती बदनामी झाली. सरकारी पैशातून भरवलेल्या महोत्सवात नागरिक आणि विद्यार्थ्यांना दूर ठेवण्यात आले. महोत्सवात खासगी संस्थांचा हस्तक्षेप थांबवू, असे आश्वासन पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिले आहे.
खासगी संस्थेची लुडबूड
वेरूळ-अजिंठा महोत्सवात जवळपास साडेतीन हजार तिकिटे एका खासगी सांस्कृतिक संस्थेला देण्यात आली. एकगठ्ठा तिकीटे दिल्यामुळे इतर रसिकांना इच्छा असूनही तिकिटे मिळाली नाहीत. तिकीट दर एक हजार आणि पाचशे रुपये असल्यामुळे विद्यार्थी महोत्सवापासून वंचित राहिले. महसूल प्रशासनाने निधीसाठी एका संस्थेलाच महोत्सव आंदण दिल्यामुळे रसिक व कलाकारांमध्ये संताप आहे.
वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात होईल. पुढील काळात कोणत्याही खासगी संस्थेचा समन्वयात सहभाग नसेल आणि पर्यटक-रसिकांसाठी तिकीट उपलब्ध असतील. पर्यटनाला चालना देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू.
- जयकुमार रावल, पर्यटनमंत्री
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट