म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘फटाका दुकानांना लागलेल्या आगीला अग्निशमन दल (फायर ब्रिगेड) जबाबदार आहे. या विभागाचे प्रमुख शिवाजी झनझन यांच्या हलगर्जीपणामुळे हे सगळे घडले. त्यांच्यावर कारवाई करा,’ अशी एकमुखी मागणी महापौर त्र्यंबक तुपे यांच्या उपस्थितीत शनिवारी झालेल्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी केली.
औरंगपुरा येथील जिल्हा परिषद मैदानावरील फटाका मार्केटमध्ये लागलेल्या आगीत १४० दुकाने जळून खाक झाली. या घटनेची दखल घेत महापौर त्र्यंबक तुपे यांनी दुपारी तीन वाजता पालिकेतील दालनात तातडीची बैठक घेतली. बैठकीला उपमहापौर प्रमोद राठोड, स्थायी समितीचे सभापती मोहन मेघावाले, विरोधीपक्षनेते अय्युब जहागीरदार, गटनेते राजू वैद्य, गजानन बारवाल, नासेर कुरैशी, नगरसेवक विजय औताडे, शिवाजी दांडगे, आयुक्त ओम प्रकाश बकोरिया, उपायुक्त अय्युब खान, रवींद्र निकम, मुख्य अग्निशमन अधिकारी शिवाजी झनझन यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांनी झनझन यांच्या कार्यद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करीत घडलेल्या घटनेला त्यांनाच जबाबदार धरले. राजू वैद्य म्हणाले, ‘या सर्व घटनेला अग्निशमन विभाग आणि शिवाजी झनझन जबाबदार आहेत. झनझन यांना कुणाचेही ऐकण्याची सवय नाही. त्यांची मानसिकता फार वाईट आहे. अग्निशमन दलाच्या कार्यालयापासून औरंगपुऱ्यात फक्त दोन मिनिटांत गाडी आली, असे त्यांचे म्हणणे चुकीचे आहे. दोन मिनिटांत गाडी येऊच शकत नाही. झनझन यांचा हलगर्जीपणा या सर्व घटनेला जबाबदार आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करा. कारवाई करणार नसाल, तर आम्हाला बैठकीला बोलावू नका.’ उपमहापौर प्रमोद राठोड यांनीही प्रशासनाला टार्गेट केले. ‘फटाका मार्केटसाठी अग्निशमन दलाची गाडी नव्हती. दुकानांना दिलेले सर्व सिजफायर निकामी होते व बोगस होते. दुकानांना अग्निशमन दलाने कोणत्या आधारे परवानगी दिली,’ असा सवालही त्यांनी केला.
दोषींची गय नाही
महापौर त्र्यंबक तुपे यांनीही दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची सूचना आयुक्तांना केली. यावर बोलताना बकोरिया म्हणाले, ‘या संपूर्ण प्रकरणात जे अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर नक्की कारवाई केली जाईल. कारवाईच्या संदर्भात संशय घेऊ नका. दोषींची गय केली जाणार नाही,’ अशी ग्वाही त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिली.
प्रशासन अपयशीः आयुक्त
फटाके आगप्रकरणात महापालिका प्रशासन अपयशी ठरल्याची कबुली आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. बकोरिया म्हणाले,‘फटाक्यांचा एवढा मोठा बाजार भरलेला असताना तेथे फायर ब्रिगेडची गाडी असायला हवी होती, पण गाडी नव्हती. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल. फटाक्याची दुकाने शहराच्या मध्यवस्तीत असायला नकोत, पण गेल्या अनेक वर्षांपासून औरंगपुरा येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर हे मार्केट थाटले जाते. त्यामुळे महापालिकेनेही परवानगी दिली. पुढच्यावर्षी मात्र फटाका बाजार शहराच्या बाहेर हलविले जाईल. येत्या काळात अशा घटना घडू नयेत म्हणून अग्निशमन दलाचे बंब आणि पाण्याचे टँकर प्रत्येक मार्केटमध्ये उभे केले जातील. आगीच्या प्रकरणात पोलिस आयुक्त, महावितरण अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असती, तर ट्रॅप झाले असते असे त्यांचे म्हणणे आहे. ट्रॅप झालेला नाही. त्यामुळे आग कशामुळे लागली हे लगेच सांगता येणार नाही. चौकशीनंतर काही दिवसांत स्पष्ट होईल.’
उपमहापौर संतापले
‘जास्त बोलू नका, गप्प बसा,’ असे आयुक्त म्हणताच उपमहापौर कमालीचे संतापले. ‘जास्त बोलू नका, असे म्हणून आम्हाला धमकी देऊ नका,’ असे उपमहापौर आयुक्तांना म्हणाले. या शाब्दिक चकमकीमुळे बैठकीत वातावरण तणावाचे बनले होते. बैठक अर्ध्यावर आलेली असताना उपमहापौर प्रमोद राठोड, माजी सभापती दिलीप थोरात यांचे आगमन झाले. खुर्चीवर बसल्यावर राठोड यांनी आगीच्या प्रकरणावरून आयुक्त ओम प्रकाश बकोरिया आणि अग्निशमन विभागाचे प्रमुख शिवाजी झनझन यांना टार्गेट करणे सुरू केले. आपल्या निष्काळजीपणामुळे हे सगळे घडले. प्रशासन कमी पडले, त्यांनी योग्य नियोजन करायला हवे होते. पाण्याचे बंब फटाका बाजारात ठेवायला हवे होते, पण याकडे दुर्लक्ष केले,’ असे राठोड तावातावाने म्हणत होते. या प्रकारामुळे बकोरिया देखील संतापले. ‘जास्त बोलू नका, गप्प बसा’ अशा शब्दांत त्यांनी राठोड यांना बजावले. आयुक्तांच्या अशा बोलण्यामुळे रोठाड अधिकच संतापले. ‘जास्त बोलू नका,’ असे म्हणून ‘तुम्ही आम्हाला धमकवता का,’ असा सवाल त्यांनी केला. ‘लोक आम्हाला शिव्या देतात, आम्हाला बोलण्याचा अधिकार आहे. आम्ही बोलणारच,’ असे राठोड म्हणाले, पण बकोरिया यांनी त्यानंतर या वादाकडे लक्ष दिले नाही.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट